Saturday, August 22, 2026

Nashik Crime News : मोबाइलचे नेटवर्क गेले अन् खाते रिकामे झाले, नाशिकच्या कंत्राटदाराचे ५०.४७ लाख गायब

Nashik Crime News : मोबाइलचे नेटवर्क गेले अन् खाते रिकामे झाले, नाशिकच्या कंत्राटदाराचे ५०.४७ लाख गायब

Nashik Crime News : नाशिकमधील एका कंत्राटदाराच्या मोबाइलचे नेटवर्क अचानक बंद पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ५० लाख ४७ हजार रुपये परस्पर वर्ग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली येथे असताना हा प्रकार घडला असून, याप्रकरणी शहर सायबर पोलिसांकडे (Nashik Cyber ​​Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News )

नेमकं प्रकरण काय ?

नाशिकरोड (Nashik Road) परिसरात राहणारे ५८ वर्षीय शील सिंग ओमप्रकाश नेहरा हे बीएसएनएल (BSNL) कंपनीचे कंत्राटदार आहेत. १६ ऑगस्ट रोजी कामानिमित्त ते दिल्लीला गेले होते. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या एअरटेल सिमकार्डचे नेटवर्क अचानक गायब झाले. सुरुवातीला तांत्रिक अडचण असल्याचे वाटल्याने त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी दिल्लीतील स्टोअरमधून नवीन सिमकार्ड घेतले. मात्र, १८ ऑगस्ट रोजी कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी खात्यातून १२ लाख रुपये वर्ग करण्यासाठी अकाउंटंट नितीन जाधव यांनी ऑनलाइन बँकिंगमध्ये लॉगिन केले. त्यावेळी खात्यात असलेल्या सुमारे ५१ लाख रुपयांपैकी केवळ १८ हजार २३६ रुपये शिल्लक असल्याचे समोर आले. प्रकार लक्षात येताच नेहरा यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून खाते फ्रीज केले. (Crime News )

नेटवर्क गेले अन् खाते रिकामे झाले

नेहरा यांच्या मोबाइलचे नेटवर्क बंद पडण्याच्या कालावधीतच बँक खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे आढळले. त्यामुळे मोबाइल क्रमांकाचा ताबा मिळवून ऑनलाइन बँकिंगमध्ये प्रवेश मिळवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकारामागे ‘सिम स्वॅप’ (SIM Swap)चा प्रकार असण्याची शक्यता आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याच मोबाइल क्रमांकाचे दुसरे सिम सक्रिय करून मूळ सिमचे नेटवर्क बंद पाडले असावे, असा प्राथमिक संशय आहे. बँक स्टेटमेंटनुसार (Bank statement) १६ ते १८ ऑगस्टदरम्यान अज्ञात सायबर गुन्हेगारांनी आरटीजीएस (RTGS) आणि आयएमपीएसच्या माध्यमातून तब्बल सात व्यवहार केले. या व्यवहारांतून एकूण ५० लाख ४७ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.

मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असल्याने त्याचा ताबा मिळाल्यास ओटीपी, व्यवहारांचे संदेश आणि इतर महत्त्वाची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू शकते. त्यामुळे नेहरा यांच्या मोबाइल क्रमांकाचा ताबा नेमका कसा मिळवण्यात आला आणि चोरीची रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वळवण्यात आली, याचा तपास सायबर पोलीस (Nashik Cyber ​​Police) करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >