Thursday, August 20, 2026

Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांचा वारसा आता भित्तिचित्रातून उलगडणार, अभिनव भारत मंदिरासाठी २.५० कोटींची मंजुरी

Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांचा वारसा आता भित्तिचित्रातून उलगडणार, अभिनव भारत मंदिरासाठी २.५० कोटींची मंजुरी

Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) आणि नाशिक यांचे नाते ऐतिहासिक आहे. सावरकरांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराच्या (Abhinav Bharat Mandir) विकासाला आता वेग येणार आहे. नाशिक जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांच्या अनुदानातून अभिनव भारत मंदिरातील उर्वरित कामांसाठी २ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी ही मान्यता दिली आहे. या कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) माध्यमातून करण्यात येणार आहे. मंजूर निधीचा वापर केवळ प्रशासकीय मान्यता प्राप्त अंदाजपत्रकातील कामांसाठीच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

स्वा. सावरकरांनी रुढ केलेल्या शब्दांची ‘वॉल’

अभिनव भारत मंदिराच्या (Abhinav Bharat Mandir) विकासकामांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना आणि भाषिक योगदानाला विशेष स्थान देण्यात येणार आहे. सावरकरांनी रूढ केलेल्या शब्दांची विशेष ‘वॉल’ अर्थात भित्तिचित्र उभारण्यात येणार आहे. त्यातून सावरकरांचे मराठी भाषेतील योगदान नागरिकांसमोर मांडले जाणार आहे. मराठी भाषेला समृद्ध आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीच्या कार्याला महत्त्व आहे. त्यांच्या लेखन आणि संपादकीय कार्यातून अनेक मराठी शब्द प्रचलित झाल्याचे मानले जाते.

सावरकरांच्या ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ या महत्त्वपूर्ण ग्रंथासह विविध साहित्यिक संकलनांमध्ये त्यांच्या कार्याशी संबंधित अनेक शब्दांचा उल्लेख आढळतो. यामध्ये महापौर, संसद, दूरध्वनी, चित्रपट, आदेश, दिनांक यांसारख्या शब्दांचा समावेश आहे. दैनंदिन प्रशासन, पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनात या शब्दांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाला आहे. संस्कृत धातूंवर आधारित नवीन शब्द निर्माण करण्याबरोबरच सावरकरांच्या भाषाशुद्धी अभियानामुळे फारसी, अरबी आणि इंग्रजी भाषेतील प्रचलित शब्दांना पर्याय म्हणून अनेक भारतीय व स्थानिक शब्दांचे पुनरुज्जीवन, प्रमाणिकरण आणि राज्यातील प्रशासकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात पद्धतशीरपणे वापर करण्यास चालना मिळाली.

अभिनव भारत मंदिरासाठी २.५० कोटींची मंजुरी

दरम्यान, राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच अभिनव भारत मंदिराला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अभिनव भारत मंदिरातील उर्वरित कामांसाठी २ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >