मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये सुद्धा एकदा असेच काहीसे घडले होते. मुंबईतील जुहू येथील परिसरात रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसला होता. तो अतिशय सुमधुर आवाजात सतत गाणी गात होता. त्या रस्त्यावरुन येणारे जाणारे लोक त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध होत होते. सर्वांना तो एक सामान्य भिकारीच वाटत होता, पण प्रत्यक्षात तो गायक सोनू निगम होता. आपल्या विशेष गायन शैलीमुळे सोनू निगम नेहमीच प्रेक्षकांच्या गळ्यातील तायीद बनला आहे. (Sonu Nigam)
रस्त्यावर गाणाऱ्या गरीब गायकाचे रूप घेऊन सोनू निगमने एक प्रयोग करण्याचे ठरवले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून तो भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर बसला होता. त्याने सलग तीन तास २५ गाणी गायली आणि या काळात अशी एक घटना घडली जिने सोनू निगमचे मन हेलावून सोडले. सोनू निगमने ही वेशभूषा अशी काही केली होती ज्याने कोणालाही त्याची खरी ओळख पटणं शक्य नव्हते. तो हातात हार्मोनियम घेऊन रस्त्याच्या कडेला बसला आणि ते वाजवत गाऊ लागला. हा एक सामाजिक प्रयोग होता जो त्यावेळी 'बीइंग इंडियन' या प्लॅटफॉर्मने सादर केला होता; त्यांनी नंतर यावर आधारित द रोडसाइड उस्ताद नावाचा एक व्हिडिओही प्रदर्शित केला.
एका मुलाखतीत सोनू निगमने सांगितले, "मी हे काही पूर्व-नियोजनासह केले नव्हते. पुढे काय होईल याची मला कल्पना नव्हती, कारण यापूर्वी कोणीतरी असे काही केल्याचे आम्ही कधीच पाहिले किंवा ऐकले नव्हते. या प्रयोगानंतर होणाऱ्या परिणामाबद्दल मी थोडासा अस्वस्थ होतो; तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरू शकला असता किंवा कदाचित कोणाच्याही लक्षात न येता दुर्लक्षितही राहिला असता. जरी त्या क्लिपमध्ये मी केवळ चार मिनिटे गाताना दिसत असलो, तरी प्रत्यक्षात मला तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकी एक तास गावे लागले होते. मी अनेक गाणी गायली. रस्त्यावर बसून गाणे हा एक वेगळाच अनुभव होता. आजूबाजूचा गोंगाट आणि रहदारी असताना, कोणत्याही मायक्रोफोनशिवाय माझ्या आवाजाद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे हे एक मोठे आव्हान होते. हे काम थोडे धाडसाचेही होते. जेव्हा लोक माझ्याभोवती जमा होऊ लागले, तेव्हा मला सर्वात जास्त काळजी याची वाटत होती की, ये-जा करणाऱ्या लोकांना मी 'सोनू निगम' आहे हे समजू नये. तसे झाले असते तर ती एक अवघडल्यासारखी किंवा लाजीरवाणी परिस्थिती निर्माण झाली असती." (Sonu Nigam)
या काळात सोनू निगमबाबत एक हृदयस्पर्शी घटना घडली. एक मुलगा त्यांच्याजवळ आला, त्याने त्यांचा हात धरला, आधी त्यांनी काही खाल्ले आहे का हे विचारले आणि मग हळूच त्याच्या हातावर १२ रुपये ठेवले. सोनू निगमने ते १२ रुपये फ्रेम करून आपल्या ऑफिसमध्ये ठेवले. या घटनेबद्दल सांगताना सोनू म्हणाला, "त्या मुलाने माझा हात धरला आणि विचारले, 'काका, तुम्ही नाश्ता केलात का?' माझा हात धरलेला असतानाच त्याने हळूच माझ्या हातावर १२ रुपये ठेवले. मला असे वाटले की जणू मी लाखो रुपये कमावले आहेत. मी ते रुपये फ्रेम करून माझ्या ऑफिसमध्ये लावले." (Sonu Nigam)
नंतर, सोनू निगमने त्या मुलाचा पत्ता शोधून त्याला घरी बोलावले. त्याचे नाव शाहबाज होते. आपण ज्या व्यक्तीला भेटायला जाणार आहोत, ती व्यक्ती खुद्द सोनू निगमच आहे. ज्यांना भिकारी समजून त्याने १२ रुपये दिले होते. याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. सोनू निगमला भेटल्यावर शाहबाज खूप भावूक झाला होता. असेही सोनू निगमने सांगितले.






