मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते विजय निकम यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमा व मालिकांमध्ये भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. विजय यांनी ५५ वर्ष पालिकेत नोकरी केली. मात्र, सिनेमामुळे त्यांनी सर्व काही गमावलं. विजय यांनी आई आणि बायकोचे दागिने विकले, शेतजमीनही विकली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विजय यांनी त्यांच्या या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. (Vijay Nikam)
एका मुलाखतीदरम्यान विजय निकम यांनी सांगितले की, 'मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो. आता मी त्या प्रसंगावर हसू शकतो, पण जेव्हा हे घडलं त्यावेळी ते फारच दुःखद होतं. पण माझ्या कुटुंबानं मला खूप सपोर्ट केला. मला असं वाटायचं, मी नाटक लिहितोय, दिग्दर्शन करतोय ते प्रेक्षकांना आवडतंय. याचा अर्थ मी सिनेमासुद्धा करेन, जो नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. पण तोच मूर्खपणा ठरला. स्वतःवरचा अति विश्वासामुळे मला लक्षात आलं नाही की, सिनेमा वेगळ्या अभ्यासाचा, आयुष्यभराचा विषय आहे. आयुष्य गेलं तरी सिनेमात इतकं शिकण्यासारखं आहे. मी जे काही केलं ते सोडून बाकी कोणत्याही गोष्टीसाठी आलेल्या प्रेक्षकांनी वाईट म्हटलं नाही. मी लिहिलं होतं बरं. भूमिका चांगल्या होत्या, एडिट केलं होतं. मला निसर्गतः चांगलं एडिट येतं. पण सिनेमाचं दिग्दर्शन नावाची गोष्ट मला त्यावेळी येत नव्हती. आता मला त्यावेळेपेक्षा जास्त येते. मास्टर, क्लोज एवढंच येत होतं. पण सिनेमा म्हणून जो भाव पोहोचवायचा ते नव्हतं. हा बदल कालांतराने होत गेला'.
विजय निकम पुढे म्हणाले की, 'दोन सिनेमे, घेतलेलं कर्ज, शेती विकणं, दागिने विकणं, अशा इतरांच्या कथा ऐकलेल्या मी आणि मला त्यावर हसू यायचं. ज्यांना एकेकाळी हसायचो तेच आज मी केलं आणि त्याच अवस्थेतून मीही गेलो.चित्रपट निर्मितीचा मोह अनावर होऊन कोणीही हे असं पाऊल उचलू नये. हे आपलं क्षेत्र नाही, असं मला वाटलं. मी जर २ रुपये घातले तर किमान २ रुपये परत मिळवण्यासाठी काय करायचं, तेवढीतरी अक्कल पाहिजे, मला तीही नव्हती. निर्माता म्हणून मी आणि माझ्या मुलानं सगळं काही केलं. शेड्यूलिंगपासून, जेवणाची सोय, पाण्यापर्यंत सगळं मी आणि माझ्या मुलानं केलं. हे सगळं जुळून आलं. दिग्दर्शनात, कॅमेरामनशी सगळं व्यवस्थित केलं. पण दिग्दर्शनातील बारकावे मला मुळीच गवसले नाहीत.(Vijay Nikam)
'त्यावेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा इतर कोणत्या माध्यमातून सिनेमा विकण्याची बुद्धीही झाली नाही. बिझनेस माइंड असावा लागतो किंवा बोलण्यात, वागण्यात, समोरच्याचा इगो सुखावेल असं बोलता येणं, त्याच्याकडून काम काढून घेता येणं, खोटी स्तुती करता येणं, या सगळ्या गोष्टी आजतागायत जमत नाहीत. माझं कोणाशीही वाकडं नसतं आणि मी कोणाचाही अनादर करत नाही. कोणाचा अहंकार सुखावेल असं मला वागत येत नाही, त्यामुळे अनेक माणसं दुरावली, अनेक माणसांनी धडा शिकवायचं ठरवलं. काही लोकांनी चुकीचे सल्ले दिले. मी त्यावेळेस पैसे घेतले असते तर माझं नुकसान झालं नसतं. (Vijay Nikam)
'एक काळ असा होता की घरात तीन लाख रुपये शिल्लक होते आणि साडेतीन लाखांचं कर्ज होतं. पण माझ्या कुटुंबानं काय केलंस हे असं कधीच म्हटलं नाही. बायको फक्त म्हणाली, सांगितलं होतं आपल्याला माहिती नसलेल्या क्षेत्रात पडू नका माझ्या ग्रॅज्युएटी फंडमधील ७० टक्के रक्कम गेली, शेती गेली, आईचे आणि बायकोचे थोडे थोडे दागिने गेले.' असं विजय निकम यांनी शेवटी सांगितलं. हे प्रकरण काहीसं 'तेलही गेले, तूपही गेले हाती आले धुपाटणे'च म्हणता येईल. (Vijay Nikam)






