Monday, July 27, 2026

Nashik : नाशिकच्या जलसंवर्धन उपक्रमाची ‘मन की बात’मध्ये दखल, प्रधानमंत्री मोदींकडून कौतुक

Nashik : नाशिकच्या जलसंवर्धन उपक्रमाची ‘मन की बात’मध्ये दखल, प्रधानमंत्री मोदींकडून कौतुक

Nashik : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी ( दि.२६) ‘मन की बात’ कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलसंवर्धन उपक्रमांची दखल घेत उल्लेख केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात ‘पाऊस पकडा’ (Catch the Rain) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. लोकसहभाग, विभागीय समन्वय आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जिल्ह्यात जलसुरक्षा बळकट करण्याचे काम सुरू आहे.

या अभियानांतर्गत जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, नाला खोलीकरण व रुंदीकरण, कृत्रिम भूजल पुनर्भरण विहिरी, पर्जन्यजल संधारण, सूक्ष्म सिंचन, जलअर्थसंकल्प, जलकार्यक्षम शेती तसेच जलतारा यांसारखे विविध जलसंवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहेत. वनहक्क कायदा (एफआरए) अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या जमिनींवर मृद व जलसंधारणाची कामे करून त्या जमिनी उत्पादक व शाश्वत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच भूजल पुनर्भरण, पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि जलउपलब्धता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

अभियानाचा उद्देश काय ?

‘पाऊस पकडा’ अभियानाचा उद्देश पावसाचा प्रत्येक थेंब स्थानिक पातळीवर साठवून जलसुरक्षा मजबूत करणे हा आहे. ग्रामपंचायती, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागामुळे जिल्ह्यात जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. या उपक्रमांची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या (Ministry of Jal Shakti) राष्ट्रीय जल अभियानांतर्गत आयोजित ५५ व्या जल मालिकेतील वेबिनारमध्ये वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये त्यांनी ‘जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट पद्धती’ या विषयावर नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध जलसंवर्धन उपक्रमांचे सादरीकरण केले होते.

जलसंवर्धन उपक्रमाची घेतली दखल

‘मन की बात’मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘पाऊस पकडा’ (Catch the Rain) अभियानाचा उल्लेख करत पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री मोदी यांनी गाव, शहर, पंचायत आणि सामाजिक संस्थांनी जलसंवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन करून पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >