Saturday, July 11, 2026

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली : शहरातील सतत वाढत्या तापमानामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. यात देशातील १४ शहरांचा समावेश असून महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांचाही समावेश आहे. विशेष जगात उष्णतेचा धोका असलेल्या शहरांमध्ये राज्यातील दोन शहरे असून एक तर दिवसाच्या उष्णतेनंतर, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे संध्याकाळी थंड वाऱ्यामुळे आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.जगातील २०५ सर्वात मोठ्या शहरांच्या विश्लेषणानुसार भारत,(India) पाकिस्तान,(Pakisthan) नायजेरिया आणि घाना या देशांमध्ये तीव्र उष्णतेच्या धोक्याची सर्वाधिक शहरे आहेत. सर्वाधिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत जयपूरसारखी प्रमुख पर्यटनस्थळे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रांचाही समावेश असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

‘सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, तीव्र उष्णतेच्या धोक्याच्या दृष्टीने इराकमधील अल बसरा हे शहर जगात प्रथम, तर गुजरातमधील अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अभ्यासात पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सर्वाधिक धोका असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधक व अभ्यासाच्या प्रमुख लेखिका नेथमी जयरत्ने करियावासम यांनी सांगितले की, लोकसंख्येची असुरक्षितता, मर्यादित आरोग्य सुविधा, आर्थिक परिस्थिती आणि उष्णतेशी सामना करण्याची कमी क्षमता यांसारखे घटकही धोका वाढवितात.

५० सर्वाधिक धोकादायक शहरांमध्ये भारतातील १४ शहरांचा समावेश असून, त्यात महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे, तामिळनाडूतील मदुराई आणि चेन्नई, कर्नाटकमधील बंगळुरू, तसेच उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनौ यांचा समावेश आहे. सर्वाधिक धोक्याची ९५ टक्क्यांहून अधिक शहरे दक्षिण, आग्नेय आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकन प्रदेशात आहेत.

या अभ्यासात १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे विश्लेषण करण्यात आले. नागरिकांचे वय, आर्थिक स्थिती, वातानुकूलन सुविधा, तसेच झाडे आणि हरित क्षेत्र यांसारख्या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेचा विचार करून उष्णतेच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यात आले. या संशोधनाच्या सह-मार्गदर्शक आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक राधिका खोसला यांनी सांगितले की, जगभरात वातानुकूलन यंत्रांच्या मागणीत वाढ होत असली तरी अनेकांना ती परवडत नाही. शिवाय, ऊर्जा वापरावर आधारित शीतकरण व्यवस्थेवर अतिनिर्भरता वाढल्यास जागतिक तापमानवाढ आणखी वेगाने होण्याचा धोका होऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >