Wednesday, June 17, 2026

Megablock Update : रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लकविषयी मोठी बातमी

Megablock Update : रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लकविषयी मोठी बातमी

मुंबई : नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा (NEET-UG 2026 Re-Exam) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या फेरपरीक्षेच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवार २१ जून रोजी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक नसतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. याचा मोठा फायदा रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना होणार आहे.

रविवार २१ जून रोजी लोकल रविवारच्या वेळापत्रकाऐवजी नियमित वेळापत्रकानुसार धावतील. यामुळे प्रवास करणे सोपे होणार आहे. पश्चिम रेल्वे रविवारी जम्बो ब्लॉक घेणार नाही, लोकल रविवारच्या वेळापत्रकाऐवजी नियमित वेळापत्रकानुसार धावतील; अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. तसेच नीटची फेरपरीक्षा असल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, नातलग यांना त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण नेटवर्कवर कुठेही मेगाब्लॉक घेणार नसल्याचे मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जाहीर केले आहे.

नीट यूजी २०२६ फेरपरीक्षेच्या केंद्रांवर येणे - जाणे सोपे व्हावे यासाठी फेरपरीक्षेच्या दिवशी म्हणजेच रविवार २१ जून रोजी मेगाब्लॉक घेणार नसल्याची ग्वाही पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनाने दिली आहे. यामुळे रविवारी प्रवासाचे नियोजन करत असलेल्या सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

याआधी ३ मे २०२६ रोजी देशभर नीट यूजी २०२६ परीक्षा झाली. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही तासांनी पेपरफुटीची माहिती समोर आली. अखेर ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द केल्याचे १२ मे रोजी जाहीर करण्यात आले. यानंतर फेरपरीक्षेची घोषणा करण्यात आली. घोषणेनुसार आता रविवार २१ जून २०२६ रोजी नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा होत आहे. ही परीक्षा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मुलं, त्यांचे पालक आदी मुंबईत येत आहेत. या विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये आणि रविवारी परीक्षा केंद्रावर जाणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारचे नियोजीत मेगाब्लॉक रद्द केले आहेत. मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गांवर मेगाब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

नीट फेरपरीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी केंद्र सरकारकडून टेलिग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षेआधी प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे खोटे दावे, फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर आळा घालण्यासाठी भारतातील टेलिग्रामवरील प्रवेश २२ जूनपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. तसेच मेसेज एडिट करण्याची सुविधाही ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. नीट यूजी २०२६ फेरपरीक्षेप्रकरणी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन एनटीएने विद्यार्थ्यांना केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा