Tuesday, June 16, 2026

India's Growth : भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा काळ

India's Growth : भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा काळ

भारत आज विविध क्षेत्रांत अत्यंत वेगाने विकास करत आहे. अर्थव्यवस्था, सामाजिक सुरक्षा, ऊर्जा, पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान यांसह, विविध क्षेत्रांत देश नवनवी उंची गाठत आहे. भौतिक विकासाच्या या सर्व क्षेत्रात प्रगती करत असताना, हेही महत्त्वाचे आहे, की आपण आपली प्राचीन संस्कृती, इतिहास, वारसा आणि परंपरांना विसरून जाऊ नये.

भारत जगातील अतिप्राचीन मात्र जिवंत संस्कृतींपैकी एक देश आहे, कित्येक शतके, परदेशी आक्रमकांसोबत सुरू असलेल्या संघर्षात, देशाच्या राजकीय सत्तेत बदल होत राहिले, मात्र त्या काळातही, भारत आपली संस्कृती एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीपर्यंत यशस्वीपणे सोपवत राहिला. या काळात झालेल्या राजकीय उलथापालथीत,आपली धार्मिक स्थळे, ग्रंथसंपदा, वाचनालये, विद्यापीठे, सगळ्यांचा विध्वंस करण्यात आला. मात्र तरीही, आपली संस्कृती आणि परंपरा जिवंत राहिल्या. सांस्कृतिक भारतावर दुसरा घाला आमच्या शिक्षण पद्धतीत केलेल्या बदलांमुळे घातला गेला. या हल्ल्यातून, आमच्या अंतर्मनात आपल्याच संस्कृतीविषयी हीन भावना निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

वर्ष २०२४ पासून, मात्र, भारताने आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनासोबतच, सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठे परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली, हे वर्ष आपल्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या प्रारंभाचे वर्ष म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सांस्कृतिक भारत आज आपल्या अभिमानास्पद भूतकाळाचे पुन:स्मरण करत, त्याचे वैभव, त्याची भव्यतेची पुनर्स्थापना करत आहे, त्याचवेळी सामाजिक जीवनात देखील तीच संस्कृती पुन्हा स्थापन केली जात आहे. आज आपले उत्सव, प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारके, खाद्यसंस्कृती, वस्त्र कला, नृत्य, संगीत, शास्त्र, शिल्पकला ह्या सगळ्या गोष्टी जागतिक आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत.भारतीय संस्कृतीची वाढती स्वीकारार्हतागेल्या १२ वर्षांत जगात भारतीय संस्कृती केवळ स्वीकारार्ह ठरली नाही, तर लोकप्रिय होते आहे.

आज सगळे जग, २१ जूनला योग दिवस साजरा करतात. हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर, हे एक प्राचीन भारतीय दर्शनशास्त्र आहे, एक विज्ञान आहे जे आज जगन्मान्य झाले. मानवी आयुष्यात त्याची उपयुक्तता बघा, त्याला जगाने स्वीकारले. आज जगातील अनेक देशात असलेल्या आपल्या वारशाच्या वस्तू, भारतात परत आणल्या जात आहे, त्यांची संख्या देखील, एक अत्यंत रोचक वास्तव आहे. वर्ष २०१३ च्या आधी, केवळ १३ वारसा वस्तू परदेशातून भारतात आणल्या गेल्या. मात्र गेल्या १२ वर्षांत ६४० पेक्षा अधिक वारसा वस्तू, परदेशातून भारतात आणल्या गेल्या आहे. संस्कृतीमध्ये केवळ परंपरांचे पुनरुज्जीवन नाही, तर संस्कृतीची प्रतीक चिन्हे परत आणण्यातही आम्ही गांभीर्य दाखवले आहे. ही प्रतीक चिन्हे, आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, ह्या आमच्या पूर्वजांची कला, शिल्प आणि विविध विषयांच्या ज्ञानाच्या खुणा आहेत, चिन्हे आहेत, ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळते आहे.

दुर्गा पूजा आणि दिवाळी यांसारख्या सामाजिक-धार्मिक उत्सवांना, युनेस्कोने जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली. ही मान्यता, केवळ उत्सवांना नसते, तर त्यामागे असलेल्या संदेशांनाही दिली जाते. विचारांना दिली जाते, जे सांगतात, की असत्यावर कायम सत्याचा विजय होतो. आपल्या प्राचीन इतिहासालाही आज युनेस्कोने मान्यता दिली आहे. त्याचा पुरावा म्हणजे, भारत ४४ जागतिक वारसा स्थळांना मान्यता मिळून, भारत या क्रमवारीत आशियात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ही वारसास्थळे, आपल्या परंपरांचे प्रतीक आहेत, ज्यांच्याकडे बघून, भारतीयांना आपली संस्कृती आणि इतिहासाची ओळख होते आणि त्याविषयी अभिमान वाटतो.

विस्मृतीत गेलेल्या, विखुरलेल्या ज्ञानाचे संकलन भारत बराच काळ परकीय आक्रमकांशी संघर्ष करत राहिला. ज्ञान आणि संस्कृतीचा आदर न करणाऱ्या या परकीय आक्रमकांनी आपल्या देशाच्या अमूल्य ज्ञानपरंपरेचा वारसा असलेली समृद्ध विद्यापीठे, गुरुकुले आणि हस्तलिखितांमध्ये नोंदविलेले ज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दीर्घ कालखंडात आपल्या ज्ञानपरंपरेची अमूल्य संपत्ती असलेली ही हस्तलिखिते विविध मठ, मंदिरे, संस्था आणि घरांमध्ये जतन केली गेली; मात्र कालांतराने ती विस्मृतीत गेली. दुर्दैवाची बाब म्हणजे स्वातंत्र्यानंतरही या हस्तलिखितांचे संकलन करून प्राचीन ज्ञान पुन्हा प्राप्त करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नाही.

आज संपूर्ण देशात ज्ञान भारतम् राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अंतर्गत या हस्तलिखितांची नोंदणी आणि यादी केली जात आहे. अत्यंत आनंदाची बाब म्हणजे देशभरातून आतापर्यंत ८८ लाखांहून अधिक हस्तलिखिते शोधून काढण्यात आली. या ज्ञानसंपदेचे संकलन करण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांचे डिजिटायझेशनही केले जात आहे. या हस्तलिखितांमध्ये नोंदविलेल्या ज्ञानाचे संवर्धन आणि सुरक्षित जतन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसह विविध आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. भविष्यात हा संग्रह आपल्या पुढील पिढ्यांना अध्यात्म, विज्ञान, कला, शिल्पकला आणि इतर अनेक क्षेत्रांतील भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेची समृद्धी आणि उत्कृष्टता यांची ओळख करून देईल तसेच त्या वारशाचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देईल.सांस्कृतिक प्रतीक चिन्हांचे पुनरुज्जीवन भारतातील मंदिरे, किल्ले, मेळावे, ऐतिहासिक वारसास्थळे आपली गौरवशाली संस्कृती आणि इतिहासाच्या प्रतीकाची चिन्हे आहे.

मात्र, दु:खद गोष्ट ही आहे, की स्वातंत्र्यानंतर भारतात या सांस्कृतिक स्थळांची उपेक्षा करण्यात आली. केवळ काही निवडक स्मारकांचा जागतिक पातळीवर प्रचार-प्रसार करण्यात आला. ही मंदिरे, भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला एका सूत्रात बांधून ठेवू शकतात. देशातली धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळे, कित्येक वर्षांपासून, उपेक्षा आणि अव्यवस्था सहन करत आहेत. गेल्या १२ वर्षांत, या स्थळांचा कायापालट करण्यात आला. आज भारतात देशाच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा दिमाखात मिरवणारे, काशी विश्वनाथ धाम, महाकाल कॉरीडोर, केदारनाथ, सोमनाथ यासह विविध मंदिरे आणि तीर्थनगरी यांचा व्यापक विकास करण्यात आला. भक्तांसाठी तिथे सुविधा विकसित करण्यात आल्या, ज्यामुळे आध्यात्मिक पर्यटन वाढण्यासह, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत झाल्या. युवकांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी जागरूकता आली. आज या स्थळांवर येणाऱ्या युवकांची वाढती संख्या, भारतीय संस्कृतच्या पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. या स्थळांचा विकास आणि इथल्या तीर्थयात्रा, यामुळे, युवकांच्या मनांत आपल्या संस्कृतविषयी अभिमानाची भावना जागृत होते आहे.

वारसाही, विकासही आज आपल्या संस्कृतीची प्रतीके असलेली धार्मिक स्थळे, मंदिरे आणि धार्मिक मेळावे हे स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा बनले. आध्यात्मिक पर्यटनात झालेल्या वाढीमुळे स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास तर झाला, शिवाय या शहरांमधील आर्थिक उपक्रमांनाही मोठी चालना मिळाली. परिणामी, तेथील नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली. आज ऋषिकेश, अयोध्या, प्रयागराज, काशी यांसह भारतातील विविध आध्यात्मिक नगरींमध्ये भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी परदेशी पर्यटक येत आहेत. भारतीय संस्कृतीच्या व्यापकतेने आणि समृद्धीने ते प्रभावित होत आहे. यामुळे केवळ भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार होत नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा लाभ होत आहे. आपल्या मुळापर्यंत पोहोचणारा भारत

आज भारत आपल्या प्राचीन वारशाचा अभिमान बाळगत, आधुनिक जगासोबत खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. आतापर्यंत विस्मृतीत ठेवलेल्या आपल्या संस्कृतीच्या पुनर्जागृतीचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे. कित्येक शतके संघर्षात होरपळत असलेला भारत, आज कूस बदलून, आपली प्राचीन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख पुनर्स्थापित करत आहे. भारत जगाला सांगतो आहे, की प्राचीन परंपरा आणि संस्कृतीसोबत, आधुनिकतेचाही अंगीकार केला जाऊ शकतो. येणारा काळ भारताचा आहे. भविष्यात भारताचा विचार, दर्शनशास्त्रे, संस्कृती जगाला नवी दिशा देणारी असेल. (लेखक भारत सरकारचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री आहेत)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा