Monday, June 8, 2026

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसचे १४ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसचे १४ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरही 'तृणमूल काँग्रेस' पक्षाला सर्वात मोठे खिंडार पडले आहे. सोमवारी (८ जून ) नवी दिल्लीत एकीकडे 'इंडिया' आघाडीची बैठक सुरू असतानाच, दुसरीकडे तृणमूलच्या तब्बल १४ बंडखोर खासदारांचा गट भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बैठकीला पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी देखील उपस्थित होते.

सोमवारी दुपारी अचानक दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे थेट भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील एकूण खासदारांपैकी तब्बल १४ बंडखोर खासदार या गुप्त बैठकीला उपस्थित होते.या ऐतिहासिक बंडामध्ये त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लव कुमार देव हे देखील महत्त्वाची भूमिका बजावत असून, ते तृणमूलच्या खासदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी मध्यस्थी करत आहेत. या १४ खासदारांच्या बंडामुळे लोकसभेत तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी हे खासदार भाजपला थेट पाठिंबा देण्याची किंवा अधिकृतपणे पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप नेत्यांच्या घरी चाललेल्या या महाबैठकीपूर्वी दिल्लीत आणखी एक नाट्यमय घटना घडली होती. सकाळीच राज्यसभा खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देणारे तृणमूलचे ज्येष्ठ नेते सुखेंदु शेखर राय यांच्या निवासस्थानी ५ प्रमुख खासदारांनी गुप्त भेट घेतली होती.या बैठकीला शर्मिला सरकार (बर्धमान पूर्व), प्रसून बॅनर्जी (हावडा), जगदीश बसुनिया (कूचबिहार), कालिपद सोरेन (झारग्राम), अरूप चक्रवर्ती (बांकुरा) हे खासदार उपस्थित होते. सुखेंदु शेखर राय यांच्याशी सखोल चर्चा केल्यानंतर हेच खासदार आता इतर सहकाऱ्यांसह सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीला पोहोचल्याचे समजते.

ममता बॅनर्जींची अस्तित्वाची लढाई

राज्यसभेत एक दशकाहून अधिक काळ पक्षाचा मुख्य चेहरा राहिलेले सुखेंदु शेखर राय यांनी सोडलेली साथ आणि त्यानंतर लोकसभेच्या १४ खासदारांनी पुकारलेले बंड यामुळे तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात पूर्णपणे एकट्या पडल्या आहेत. बंगालमधील बंडखोर आमदार आणि नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी आधीच दावा केला आहे की, "ममता बॅनर्जी यांची आमदारांवरील पकड पूर्णपणे ढिली झाली असून, अनेक टीएमसी आमदार आमच्या संपर्कात आहेत. आधी बंगालमधील सत्ता जाणे, त्यानंतर आमदार फुटणे आणि आता थेट संसदेतील खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याने तृणमूल काँग्रेससमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment