Thursday, June 4, 2026

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

Raigad Crime :  सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा (सागरी) पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत सारळ आदिवासीवाडी ते तिनवीरा दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी संगनमत करून महिलेकडील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने कट रचला. त्यानंतर महिलेचे अपहरण करून तिला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले.

तक्रारीनुसार, आरोपींनी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या मृतदेहाची अज्ञात ठिकाणी विल्हेवाट लावली. संबंधित महिला बेपत्ता झाल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या मनुष्य बेपत्ता क्रमांक ०८/२०२६ च्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात खबरी अहवाल सादर केला तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष अहवाल पाठविण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना ४ जून २०२६ रोजी पहाटे १.३३ वाजण्याच्या सुमारास अटक केली.

याप्रकरणी मांडवा (सागरी) पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), २३८(अ), ६१(२), १४०(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >