Friday, July 24, 2026

Pandharpur : पंढरपूरमध्ये पोहोचले १५ लाख भाविक, संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल; चंद्रभागेला भक्तिचा महापूर

Pandharpur : पंढरपूरमध्ये पोहोचले १५ लाख भाविक, संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल; चंद्रभागेला भक्तिचा महापूर

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठुरायाचे रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये १५ लाख भाविक पोहोचले आहेत. हा आकडा पुढील काही तासांत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये उत्तम पाऊस झाला आहे. यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. पंढरपूरमध्ये लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला अलोट जनसागर लोटला आहे. पंढरपूर शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून मिळेल त्या ठिकाणी ते तंबू ,राहुट्या उभारून थांबले आहेत.

पंढरपूरमध्ये भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुक्कामाची ही ठिकाणं पूर्ण भरली असून इतर भाविक मिळेल त्या ठिकाणी तंबू ,राहुट्या उभारून थांबले आहेत. राज्य शासनाने यंदाच्या आषाढी एकादशीच्या यात्रेला किमान ३५ लाख भाविक येतील असा अंदाज बांधला आहे. हा अंदाज प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. प्रशासन या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे. वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम यांच्यासह सर्व संतांचे पालखी सोहळे आणि अनेक दिंडी सोहळे पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. पंढरपूरकरांनी इसबावीजवळ पालख्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली. भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर समितीच्यावतीने दर्शनरांगेत जादाची पत्राशेड उभारण्यात आली असली तरी ती अपुरी पडत असून रांग गोपाळपूरच्या पुढे स्वेरी कॉलेजपर्यंत गेली आहे. लवकरच रांग आणखी विस्तारण्याची शक्यता आहे. (Pandharpur)

यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पोलीस कर्मचारी, होमगार्ड, विविध पथकं तैनात आहेत. गर्दीच्या ठिकाणी जास्त बंदोबस्त असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. प्रसादासह विविध वस्तूंची दुकानं सजली आहे. विक्रमी गर्दीमुळे यंदा मोठ्या प्रमाणात उलाढाल होईल असा विश्वास व्यापारीवर्ग व्यक्त करत आहे.

शनिवारी मुख्यमंत्री करणार महापूजा

आषाढी एकादशीची शासकीय महापूजा शनिवारी एकादशी दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह ते महापूजा करणार आहेत. दोन दिवस येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या महासोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी आषाढी दशमी दिवशी चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी वाळवंटाला भक्तिचा महापूर आल्याचे चित्र होते. (Ashadhi Ekadashi)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >