Monday, June 1, 2026

Pratap Sarnaik: स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प;

Pratap Sarnaik: स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प;

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने “स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी” घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री सरनाईक म्हणाले की, “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीद अंगीकारून एसटीने गेली ७८ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड सेवा पोहोचवली आहे. डोंगर-दऱ्या, दुर्गम आदिवासी भाग, ग्रामीण क्षेत्रे, शहर आणि महानगरांना जोडणारी लालपरी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आ

">णि सांस्कृतिक जीवनाची जीवनवाहिनी बनली आहे. एसटीच्या या गौरवशाली प्रवासामागे लाखो अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक आणि प्रवाशांचे योगदान असल्याचे नमूद करत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. अनेक संकटांच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने सेवा देत समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले असून अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला आज सलाम करण्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एसटी परिवाराने यावर्षी “७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प” केल्याची माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील प्रत्येक आगार, बसस्थानक आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहे. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाची सामूहिक जबाबदारी असून “एक वृक्ष – एक जीवन” हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी करणार आहे. यासोबतच “स्वच्छ एसटी – सुंदर एसटी” ही संकल्पना अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक परिसर, एसटी बसेस तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची नियमित स्वच्छता आणि टापटीपपणा राखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळाच्या आर्थिक शिस्तीसाठी इंधन बचतीचे महत्त्व अधोरेखित करत मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचत करण्याचा संकल्प केला आहे. छोट्या-छोट्या बचतीतून मोठी आर्थिक उभारणी शक्य होते. इंधन बचतीमुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

एसटी ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे नमूद करत त्यांनी आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा, आर्थिक शिस्त, हरित उपक्रम, स्वच्छता आणि प्रवासी-केंद्रित सेवा यांच्या माध्यमातून एसटीला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज व्यक्त केली. ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि उत्कृष्ट प्रवासी सेवा यांचा संकल्प करून महाराष्ट्राच्या विकासात अधिक प्रभावी योगदान द्यावे, असे आवाहन करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक तसेच राज्यातील सर्व प्रवाशांना एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “चला, स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि सक्षम एसटी घडविण्याचा निर्धार करूया,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment