Monday, August 3, 2026

Uddhav Thackeray : पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरून 'मातोश्री'त जोरदार राडा; दोन गट भिडले

Uddhav Thackeray : पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरून 'मातोश्री'त जोरदार राडा; दोन गट भिडले

उद्धव ठाकरेंसमोरच शाब्दिक बाचाबाची

मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी सोमवारी पार पडलेल्या बैठकीत कल्याण आणि ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून आला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरून दोन गट आमनेसामने आल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दोन्ही गटांत जोरदार शाब्दिक बाचाबाचीही झाली.

पक्षातील फुटीनंतर संघटन बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून विविध मतदारसंघांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 'मातोश्री'वर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

बैठक सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या हकालपट्टीचा विषय ऐरणीवर आला. पक्षातील जुने पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त झालेले पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत मतभेद या वेळी चव्हाट्यावर आले. हकालपट्टीची कारवाई योग्य की अयोग्य यावरून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढला आणि बैठकीतच एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली.

हा प्रकार पाहून उद्धव ठाकरे अत्यंत संतापले. त्यांनी वाद घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना झापताना कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे उदाहरण दिले. "देशातील एक तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत आहे आणि तुम्ही इथे आपसात भांडत आहात? तुमच्या अशा वागण्याला काही अर्थ आहे का," असा सवाल करत ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र काम करण्याचा किंवा पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला.

लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा राजीनामा

दरम्यान, या बैठकीच्या काही वेळ आधीच पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाला वेळ देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले असले तरी, कल्याणमधील या राजीनाम्यामुळे आणि मातोश्रीवरील राड्यामुळे ठाणे-कल्याण भागातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >