Saturday, May 30, 2026

Mumbai : पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी २ हजार ५०० रिचार्ज खड्डे

Mumbai :  पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी २ हजार ५०० रिचार्ज खड्डे

भूजल पातळी वाढवण्याचा महापालिकेचा उपक्रम

मुंबई : वाढते शहरीकरण, सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे आणि भूजल पातळीत होत असलेली घट लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने भूजल पुनर्भरणासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या कडेला सुमारे २,५०० रिचार्ज खड्डे (सोख पिट्स) तयार करण्यात आले असून, त्याद्वारे पावसाचे पाणी थेट जमिनीत झिरपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईनच्या प्रत्येक ४०० मीटर अंतरावर हे खड्डे तयार केले जात आहेत. या खड्ड्यांमध्ये विशेष पाइप बसवण्यात आले असून, त्याभोवती खडी व गिट्टी भरली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी सहजपणे जमिनीत मुरून भूजल साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईतील भूजलाचा अतिवापर आणि वाढत्या काँक्रीटीकरणामुळे नैसर्गिक जलसंचयाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या सर्वेक्षणात काही भागांत समुद्राचे खारे पाणी भूजलामध्ये झिरपल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर भूजल पुनर्भरणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होण्याबरोबरच समुद्राच्या खाऱ्या पाण्याची जमिनीत होणारी घुसखोरी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यातील पाणीटंचाईचा धोका कमी करण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर सिमेंट-काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू असून, आतापर्यंत सुमारे १,१०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. आगामी काळात शहरातील जवळपास सर्व प्रमुख रस्त्यांवर अशाच प्रकारच्या भूजल पुनर्भरण यंत्रणा उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. याशिवाय, शहरातील सुमारे २०० विहिरींच्या परिसरातही रिचार्ज खड्डे तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करून जमिनीखालील जलसाठा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

Comments
Add Comment