Wednesday, May 27, 2026

Mumbai Railway Food Price Hike Cancelled : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वडापाव, समोसा आणि पफचे दर जैसे थे

Mumbai Railway Food Price Hike Cancelled : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वडापाव, समोसा आणि पफचे दर जैसे थे

मुंबई : मध्य रेल्वेने १ जूनपासून वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे लाखो रेल्वे (Railway) प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून रेल्वे स्थानकांवरील (Railway Station) वडापाव, समोसा आणि इतर लोकप्रिय खाद्यपदार्थांचे दर सध्या तरी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत. या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशावर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार टळला आहे.

मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला वडापाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पावसाळा (Monsoon) असो, प्रवासादरम्यान लागलेली छोटी भूक असो किंवा चटकदार खाण्याची इच्छा असो, वडापाव हा अनेकांचा पहिला पर्याय असतो. मात्र मध्य रेल्वेच्या (Central Railway) स्टॉलवर (Stall) मिळणाऱ्या वडापावच्या किमतीत वाढ होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात १ जून २०२६ पासून वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार वडापाव, समोसा, व्हेज पफ, साबुदाणा वडा यांसारख्या लोकप्रिय पदार्थांच्या किमती वाढवण्यात येणार होत्या. मात्र आता हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला असून पुढील आदेश मिळेपर्यंत जुन्याच दराने खाद्यपदार्थ विक्री करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वे बॅकफूटवर, दरवाढीचा निर्णय रद्द

रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेतल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दरवाढ लागू झाल्यास रोजच्या प्रवासाच्या खर्चात आणखी वाढ झाली असती. येत्या १ जूनपासून वडापाव आणि समोस्याच्या किंमती वाढवण्याचा प्रस्ताव होता. तसेच रेल्वे स्टॉलवर काही नवीन खाद्यपदार्थांचाही समावेश करण्यात येणार होता. मात्र आता पुढील सूचना येईपर्यंत सर्व खाद्यपदार्थ जुन्याच दराने उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

किती वाढणार होते खाद्यपदार्थांचे दर?

अलीकडच्या काळात इंधन आणि गॅसच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण देत मध्य रेल्वेने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. यामुळे रेल्वे स्थानकांवरील अनेक लोकप्रिय पदार्थ महाग होणार होते.

प्रस्तावित दरवाढीनुसार सध्या १३ रुपयांना मिळणारा वडापाव थेट २० रुपयांना मिळणार होता. याशिवाय व्हेज समोसा, व्हेज पफ आणि साबुदाणा वडा यांची किंमतही २० रुपये करण्यात येणार होती. तसेच प्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेली पावभाजी ५० रुपयांना उपलब्ध होणार होती. व्हेज पिझ्झाची किंमतही ५० रुपये निश्चित करण्यात आली होती. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला डोसा ३५ रुपयांना आणि सांबार-चटणीसह दोन इडली ३० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होणार होत्या.

मात्र मध्य रेल्वेने दरवाढीचा निर्णय मागे घेतल्याने हे सर्व प्रस्तावित दर सध्या लागू होणार नाहीत. त्यामुळे वडापावपासून ते इतर खाद्यपदार्थांपर्यंत सर्व वस्तू जुन्याच किमतीत उपलब्ध राहणार आहेत. परिणामी, रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून 1 जूनपासून होणाऱ्या संभाव्य दरवाढीपासून त्यांची सुटका झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >