Friday, May 22, 2026

'Deool Band-2' Movie : ‘देऊळ बंद २’चा महाराष्ट्रभर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

'Deool Band-2'  Movie : ‘देऊळ बंद २’चा महाराष्ट्रभर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

मुंबई : महाराष्ट्रभर ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा गजर घुमवत बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ने बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री केली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या या सिक्वेललाही प्रेक्षकांचा तितकाच जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, पारंपरिक शुक्रवारऐवजी चित्रपट गुरुवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. गुरुपुष्यामृत योग साधत सकाळी ६ वाजताच चित्रपटाचा पहिला शो सुरू झाला आणि पहाटेपासूनच थिएटरमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल झाल्याचं चित्र होतं. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, जळगाव, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘देऊळ बंद २’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी १,१७५ शोजमधून तब्बल २.४५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन २.८९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही ओपनिंग अत्यंत दमदार मानली जात आहे.

मुंबईतील भांडुप, कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळसारख्या मराठीबहुल भागांमध्ये चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. अनेक थिएटरमधील सर्व शो हाऊसफुल्ल झाले असून तिकीट खिडक्यांवर प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. ‘बुक माय शो’सारख्या ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्मवरही तिकिटांसाठी मोठी झुंबड उडाल्याचं दिसून आलं.

सोशल मीडियावरही ‘देऊळ बंद २’ची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटातील भावनिक प्रसंग, प्रभावी संवाद, दमदार कथानक, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे. अनेकांनी हा चित्रपट श्रद्धा, भावना आणि वास्तव यांचा उत्तम संगम असल्याचं म्हटलं आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे चित्रपट अधिक परिणामकारक ठरत असल्याचं बोललं जात आहे. तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकले असून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. त्यांच्या संवादफेकीतून आणि भावनिक अभिनयातून श्रद्धेची ताकद प्रभावीपणे पडद्यावर दिसून येत आहे.

वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, दमदार पार्श्वसंगीत आणि भव्य सादरीकरणामुळे चित्रपट अधिक उठावदार ठरत आहे.

चित्रपट प्रदर्शित होताच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा यंदाच्या मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि संभाव्य ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याची चर्चा सिनेवर्तुळात रंगली आहे.

विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी राज्यभरातील जवळपास ५०० सिनेमागृहांमध्ये चित्रपटाचे २ हजारांहून अधिक शो प्रदर्शित करण्यात आले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये तर ‘देऊळ बंद २’चे तब्बल २५ शो हाऊसफुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे. मराठी चित्रपटाला मिळालेला हा प्रतिसाद विक्रमी मानला जात असून, चित्रपटाच्या लोकप्रियतेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीप्रमाणे पारंपरिक रिलीज पद्धतीला छेद देत ‘देऊळ बंद २’ला गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा प्रयोग करण्यात आला आणि विशेष म्हणजे या प्रयोगालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मराठी सिनेमातील सर्वात चर्चित आणि दमदार ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘देऊळ बंद २’चं नाव घेतलं जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >