Wednesday, July 8, 2026

Nashik : चोर चावडी धबधब्यात पुन्हा दुर्घटना ; १८ वर्षीय तरुण खोल डोहात बेपत्ता ; शोधमोहीम सुरूच

Nashik : चोर चावडी धबधब्यात पुन्हा दुर्घटना ; १८ वर्षीय तरुण खोल डोहात बेपत्ता ; शोधमोहीम सुरूच

Nashik : देवळा तालुक्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या चोर चावडी धबधब्यावर (Chor Chavdi Waterfall) पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे. ऋषिकेश शशीकांत संसारे (वय १८, रा. वडगाव पांगू, ता. चांदवड) हा तरुण मंगळवारी (७ जुलै) रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता धबधब्याच्या खोल डोहात बुडाल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बचाव पथकाने अथक प्रयत्न करूनही त्याचा शोध लागू शकला नाही. आज सकाळपासूनच एनडीआरएफच्या (NDRF) मदतीने पुन्हा शोधमोहीम सुरु असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं ?

ऋषिकेश (Rishikesh Shashikant Sansare) हा आपल्या सात ते ८ मित्रांसह दुचाकींवरून चोर चावडी धबधबा पाहण्यासाठी आला होता. मंगळवारी दुपारी सर्वजण धबधबा परिसरात फिरत असताना सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास त्याचा पाय घसरून तो खोल डोहात पडला. त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणांतच तो पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. नंदा पाटील, पोलीस कर्मचारी नितीन बाराहाते, राहुल शिरसाठ, मौरेदादा, होमगार्ड तसेच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर चांदवड पोलीस ठाण्याचे (Chandwad Police Station) पोलीस निरीक्षक कैलास वाघ, चांदवडचे प्रांताधिकारी कडलग, देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मंडळ अधिकारी गजानन डोके, तलाठी तसेच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेत होते.

सततच्या पावसामुळे शोधमोहिमेत अडथळा

बचावकार्यासाठी मालेगाव येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने सुमारे दोन ते अडीच तास डोहात शोधमोहीम राबवली. मात्र डोहाची मोठी खोली, सततचा पाऊस, अंधार आणि डोंगराळ भागातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे संबंधित तरुणाचा शोध लागू शकला नाही.

सकाळपासून शोधमोहीम सुरु

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफच्या पथकाला दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने व्यापक शोध व बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशी माहिती मिळत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात धबधबे, खोल डोह आणि धोकादायक पर्यटनस्थळांवर जाताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >