Monday, May 4, 2026

Minister Ashish Shelar : 'उबाठा'ची साथ म्हणजे पराभवाची गॅरंटी

Minister Ashish Shelar : 'उबाठा'ची साथ म्हणजे पराभवाची गॅरंटी

मंत्री आशिष शेलार यांचा टोला; तीन राज्यांतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांचे अभिनंदन

मुंबई : "विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाच पुन्हा एकदा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधक हे केवळ बहाणेबाज असून, त्यांना स्वतःचा पराभव पचवता येत नाही", अशी खरमरीत टीका भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी केली. तसेच, ‘जो-जो उबाठा गटासोबत गेला, त्याचे राजकीय पानिपत झाले’, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि आसाम या तीन राज्यांत मिळालेल्या विजयाबद्दल मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. पश्चिम बंगालमधील विजयाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या ‘एसआयआर’च्या मुद्द्यावर शेलार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये जर एसआयआरचा प्रभाव होता, तर केरळमधील निकालांना विरोधक काय म्हणणार? त्यांनी सर्वप्रथम आरशात पाहावे. विरोधक हे अत्यंत डरपोक आणि रडके आहेत. वस्तुस्थितीचा सामना करण्याची त्यांची तयारी नसते, त्यामुळेच ते पराभवाचे खापर सरकारी यंत्रणांवर फोडण्याचा प्रयत्न करतात. पराभवाचे खापर फोडण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे", असे ते म्हणाले.

'उबाठा'च्या संगतीचा परिणाम

‘उबाठा’ गटाच्या राजकीय भूमिकांवर निशाणा साधताना आशिष शेलार यांनी अनेक दाखले दिले. "तामिळनाडूत स्टॅलिन यांची बाजू घेणे असो, किंवा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना दिलेला पाठिंबा असो, जो-जो उबाठासोबत गेला त्याचा पराभव झाला हे स्पष्ट चित्र आहे. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल हे महायुतीच्या विकासाच्या राजकारणावर जनतेने दिलेला कौल आहे," असे सांगत शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा