Monday, July 6, 2026

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या सहा दिवसांत विविध घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. झाडे कोसळणे, उघडे मॅनहोल आणि घर कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Mumbai heavy rain)

३० जून रोजी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर झाडांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

२ जुलै रोजी साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पावसाळ्यात मॅनहोल सुरक्षेबाबत प्रशासनावर टीका झाली.

४ जुलै रोजी गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये झाड कोसळल्याने १८ वर्षीय तरुणाचा जीव गेला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

५ जुलै रोजी कुर्ला पश्चिम येथील नौपाडा परिसरात एका दुकानावर मोठी झाडाची फांदी कोसळली. या दुर्घटनेत ६३ वर्षीय युनूस कुंदावाला यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याच दिवशी मानखुर्दमध्ये घर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य राबवले.

सलग घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे मुंबईतील पावसाळी सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी मुसळधार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >