Monday, July 6, 2026

Kashedi landslide: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Kashedi landslide: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यासह अनेक भागांतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाजवळ दरड कोसळल्याने (Landslide) मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकांकडून दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. ( Mumbai Goa highway news)

दरड कोसळलेल्या ठिकाणाजवळ काही घरे असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. परिसरात अद्यापही जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे प्रशासन सतर्क आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे वरंधा घाटातही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. वारवंड ते उंबर्डे दरम्यान चार ते पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांकडून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

रायगड जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ-आंबेत पुलाजवळ महाड परिसरातून वाहून आलेल्या बार्जेस पुलाजवळ अडकल्या आहेत. पुलाच्या सुरक्षिततेचा विचार करून मंडणगड-म्हाप्रळ-गोरेगाव-माणगाव मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यंत्रणा घटनास्थळी आवश्यक उपाययोजना करत आहेत.

पेण-खोपोली मुख्य मार्गावरही पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तसेच सुधागड तालुक्यातील कानसळ येथे अंबा नदी परिसरात अडकलेल्या 12 कामगारांची स्थानिक प्रशासनाने सुरक्षित सुटका केली आहे.

प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. पूर, दरड कोसळणे किंवा रस्ते बंद होण्याच्या परिस्थितीत संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >