संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी संगमनेर नगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. नगरसेवक शैलेश कलंत्री आणि नगरसेवक योगेश जाजू यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करत प्रशासकीय कारभाराचा पाढा वाचला.
म्हाळुंगी नदी आणि नदी किनाऱ्याचा परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर प्रभागातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्यामुळे नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत. या कामांबाबत वारंवार मुख्याधिकाऱ्यांना भेटून आणि निवेदने देऊनही कोणतीही हालचाल होत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. अखेर बुधवारी सकाळी नगरसेवक शैलेश कलंत्री आणि नगरसेवक योगेश जाजू यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना कामांबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. आंदोलनादरम्यान नगरसेवक आक्रमक झाले होते. शहरात समस्यांचा डोंगर साचला आहे, मात्र अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कामे सांगूनही जर ती मार्गी लागत नसतील, तर अशा ठिकाणी बसून उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दालनातून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
या आंदोलनानंतर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. चर्चेअंती त्यांनी नदीवरील पाण्याच्या डबक्यांचा प्रश्न मार्गी लावला. तसेच प्रशासकीय पातळीवर तांत्रिक अडचणींमुळे काही कामे थांबली असून ती लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.
नगरसेवकांचा इशारा
आम्ही आंदोलन केल्यानंतर मुख्याधिकारी यांनी त्वरित त्यावर कारवाई केली, परंतु आज जे काही आंदोलन करण्यात आले, हा तर फक्त ट्रेलर आहे. यापुढे जर पुन्हा नागरिकांच्या समस्या सोडवण्यास नगरपालिकेने असमर्थता दाखवली तर आणखी तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा नगरसेवक कलंत्री आणि जाजू यांनी दिला आहे.







