Sunday, December 28, 2025

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू युद्ध जिंकण्यासारखे अशी प्रवाशांची भावना होती. तिकीट खिडकी उघडताच काही सेकंदांत जागा फुल्ल होणे, दलालांचा सॉफ्टवेअरद्वारे गैरवापर आणि सामान्य प्रवाशांची निराशा या सगळ्यावर आता रेल्वेने थेट घाव घातला आहे. ‘डिजिटल हॅकर्स’ना पूर्णपणे रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ई-तिकीट प्रणालीत आतापर्यंतची सर्वात कडक सुरक्षा योजना लागू केली आहे.

रेल्वे बोर्डाच्या नव्या निर्देशांनुसार, आगाऊ आरक्षण कालावधीत म्हणजे प्रवासाच्या ६० दिवस आधी तिकीट बुकिंगच्या पहिल्या दिवशी संपूर्ण नियंत्रण आधार-सत्यापित आयआरसीटीसी खात्यांनाच दिले जाणार आहे. पूर्वी आधारची अट काही मिनिटांपुरती मर्यादित होती, मात्र आता ही मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आता तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांपर्यंत म्हणजे १२० मिनिटे नॉन-व्हेरिफाइड खाती बुकिंग करू शकणार नाहीत. एवढेच नव्हे, तर बुकिंगच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत फक्त आधारशी लिंक आणि सत्यापित खातीच तिकिटे बुक करू शकतील. हा आदेश १८ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.

हा कठोर निर्णय का? कारण तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल बनावट आयडी आणि ऑटोमेशन सॉफ्टवेअर वापरून काही सेकंदांत हजारो तिकिटे बुक करत होते. आधार लिंकिंगमुळे एका व्यक्तीची खात्रीशीर ओळख पटणार असून, बल्क बुकिंगवर प्रभावी आळा बसणार आहे.

या बदलाचा थेट फायदा सामान्य प्रवाशांना होणार आहे. सणासुदीला किंवा सुट्ट्यांमध्ये महिने आधी नियोजन करणाऱ्यांना आता दलालांऐवजी थेट प्रणालीतून कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे. मात्र प्रवाशांसाठी एक स्पष्ट इशारा आधारशिवाय प्रवेश नाही.

तुमचे आयआरसीटीसी खाते आधारशी प्रमाणित नसेल, तर बुकिंगच्या पहिल्या दिवशी तिकीट बुक करता येणार नाही. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना केवायसी आणि आधार लिंक तत्काळ पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment