नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. गतिरोध दूर करण्यासाठी केंद्र सरकारने केलेले प्रयत्न अपयशी ठरत असतानाच, राम मंदिरातील चढ़ावा चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या स्पष्टीकरणाची मागणी लावून धरली आहे. यावर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेत कोणता मंत्री कधी आणि काय बोलेल हे ठरवण्याचा अधिकार विरोधकांना नाही, असे स्पष्ट करत रिजिजूंनी "ज्या दिवशी अमित शाह उत्तर द्यायला उभे राहतील, त्या दिवशी विरोधकांना त्यांचे उत्तर ऐकणेही कठीण होईल," असा टोला लगावला.
'गृहमंत्री शाहंचे नाव ऐकून विरोधक घाबरतात'
पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून चादर, उशी, ब्लँकेट आणि टॉवेलचा संच ...
संसदेत सुरू असलेल्या गोंधळावर भाष्य करताना किरेन रिजिजू म्हणाले की, केवळ घोषणाबाजी करणे आणि कामकाजात अडथळा आणणे ही विरोधकांची सवयच झाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा उल्लेख होताच विरोधकांची अवस्था बिकट होते. ज्या दिवशी गृहमंत्री संसदेत आपले अधिकृत वक्तव्य करतील, त्या दिवशी विरोधी पक्षाच्या अडचणी अत्यंत वाढतील आणि त्यांना ते उत्तर ऐकणे शक्य होणार नाही. सदनात ज्या खात्याचे काम असते, त्याच खात्याचे मंत्री उत्तर देतात; त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या मंत्र्यांचे वेळापत्रक ठरवण्याचा प्रयत्न करू नये.
परिसीमन आणि महिला आरक्षणावरून काँग्रेसवर निशाणा
केंद्र सरकार आगामी काळात अनेक महत्त्वाची विधेयके पटलावर ठेवणार असल्याचे सांगत रिजिजूंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस खासदारांना संसदेत बोलण्याची संधीच मिळत नाही, कारण त्यांचे ज्येष्ठ नेते केवळ गदारोळ करण्यात व्यस्त असतात. परिसीमन आणि महिला आरक्षण हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. काँग्रेस या विधेयकांना विरोध करून देशातील महिलांची दिशाभूल करत आहे. या महिलाविरोधी भूमिकेची किंमत काँग्रेसला भविष्यात मोजावी लागेल."
'अमित शाह बोलू लागल्यावर विरोधकांना पळून जावे लागेल'
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होऊ शकत नसल्याची खंत रिजिजू यांनी व्यक्त केली. गृहमंत्री अमित शाह सकाळी आल्यापासून उशिरापर्यंत संसदेतच उपस्थित असतात. सदनात कोणत्या मंत्र्याने किती वेळ बोलावे, हे अध्यक्षांच्या संमतीने ठरवले जाते. त्यामुळे विरोधकांनी केवळ नाटकाचा आव आणू नये. जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर देतील, तेव्हा विरोधकांना शांतपणे बसावे लागेल; आणि जर ते उत्तर सहन न होऊन विरोधक सभागृहातून पळून गेले, तर त्यांना आजवर केलेल्या गदारोळाबद्दल देशाची माफी मागावी लागेल.






