Friday, August 7, 2026

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

हैलाकांडी : ईशान्य भारतातील आसाम (Assam) राज्यामधून एका अत्यंत भयानक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हैलाकांडी (Hailakandi) जिल्ह्यात एका १६ वर्षीय शाळकरी मुलीवर अमानुषपणे सामूहिक अत्याचार करून तिची विटांनी ठेचून अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका अल्पवयीन मुलासह एकूण पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी केवळ बदला घेण्यासाठी आणि मुलीला 'धडा शिकवण्यासाठी' जाणीवपूर्वक हा कट रचल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.

घरात एकटी असल्याचा फायदा उचलला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना १ ऑगस्टच्या रात्री घडली. त्या रात्री पीडित मुलीची आई आणि तिचा लहान भाऊ गावातील एका कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते, ज्यामुळे मुलगी घरात पूर्णपणे एकटीच होती. उशिरा रात्री जेव्हा आई आणि भाऊ कार्यक्रमावरून परत आले, तेव्हा घराचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी विटांनी ठेचून तिची हत्या केली होती. एवढेच नव्हे तर, नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिच्याच स्वयंपाकघरातील डाळ घुसळण्याचे भांडे वापरून तिच्या गुप्तांगाला गंभीर इजा पोहोचवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ओळखीच्याच ५ आरोपींना बेड्या

घटनास्थळाचा पंचनामा करताना हैलाकांडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी (SSP) अमिताभ सिन्हा यांनी सांगितले की, घरात जबरदस्तीने घुसल्याचे कोणतेही चिन्ह दिसले नव्हते. त्यामुळे हा गुन्हा पीडितेच्या ओळखीच्याच व्यक्तींनी केला असावा, असा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सुरुवातीला तीन संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या चौकशीनंतर उर्वरित दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेले पाचही जण तरुण असून त्यातील एक जण अवघा १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. हे सर्व आरोपी पीडित मुलीच्या आधीपासूनच परिचयातील होते.

'धडा शिकवण्यासाठी' रचला हत्येचा कट

पोलीस चौकशीत या हत्येमागील धक्कादायक कारण उघडकीस आले. पीडित मुलीचे आरोपींपैकी एका १८ वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीचे दुसऱ्याही एका मुलाशी बोलणे किंवा अफेअर सुरू असल्याचा संशय त्या तरुणाला होता. याच रागातून आणि तिला 'धडा शिकवण्याच्या' हेतूने त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने तिची हत्या करण्याची योजना आखली. मुलीच्या आईने आणि भावाने बाहेर जाण्याची माहिती या कथित प्रेमीला आधीच होती. त्याने संधी साधून दोन मित्रांना सोबत घेतले आणि तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याच वेळी त्याचे आणखी दोन मित्र तिथे पोहोचले आणि सर्वांनी मिळून मुलीवर हा जीवघेणा हल्ला चढवला.

POCSO कायद्यांतर्गत कठोर कारवाईची तयारी

याप्रकरणी पोलिसांनी सर्व पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात सामूहिक अत्याचार, हत्या आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील कडक कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या घटनास्थळावरून वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करत असून, न्यायालयात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण आसाममध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. आरोपींना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >