एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र; बहुजन विकास आघाडीला विलीनीकरणाचा प्रस्ताव
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र फाटक इच्छुक असतानाच, आता हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’चे (बविआ) युवा नेते क्षितिज ठाकूर यांचे नाव अचानक शर्यतीत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मतांची गोळाबेरीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ‘बविआ’ला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव दिल्याची खात्रीलायक माहिती असून, या नव्या ‘धक्कातंत्रा’मुळे ठाणे विधानपरिषदेचा अंतिम उमेदवार कोण? यावरून सस्पेन्स वाढला आहे.
https://prahaar.in/2026/05/26/exemption-from-code-of-conduct-for-farmer-loan-waiver-central-election-commission-approves/
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांनी मंगळवारी थेट ‘बविआ’चे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपने ठाणे विधानपरिषदेवर आधीच दावा ठोकून शिवसेनेला विरोध दर्शवला होता. मात्र, ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी मोठा ‘गेमप्लॅन’ आखला आहे. वसई-विरार महापालिकेत ‘बविआ’चे तब्बल ७१ नगरसेवक असून पालघर जिल्ह्यातही त्यांची मोठी ताकद आहे. हा ७१ मतांचा कोटा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. रवींद्र फाटक यांनी घेतलेली ठाकूर पिता-पुत्रांची भेट याच रणनीतीचा भाग मानली जात आहे.
https://prahaar.in/2026/05/26/eknath-shinde-fadnavis-shiledar-in-the-field-to-persuade-eknath-shinde/
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर बहुजन विकास आघाडीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचे ठरवले, तर रवींद्र फाटक यांच्या जागी क्षितिज ठाकूर यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, फाटक आणि ठाकूर यांच्यापैकी अंतिम उमेदवार कोण असणार, याचा अंतिम निर्णय स्वतः एकनाथ शिंदे घेतील.
नुकतेच बच्चू कडू यांच्या ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण करून घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आता दुसरा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘बविआ’ला आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच वसई आणि नालासोपारा मतदारसंघात भाजपच्या हातून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. अशा बदललेल्या समीकरणात, अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या ‘बविआ’ला शिवसेनेत विलीन करून घेत पालघर आणि ठाणे जिल्ह्यात भाजपला शह देण्याची शिंदेंची ही मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे. हे विलीनीकरण झाल्यास राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते.
https://prahaar.in/2026/05/26/bakri-eid-2026-tension-in-mira-road-before-bakri-eid-dispute-over-keeping-goats-in-society-direct-blade-attack-on-youth/