पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विस्कळीत झालेले ग्रामीण भागातील जनजीवन आता मूळ पदावर येऊ लागले आहे. पीककापणी, लाकडाच्या मोळी व रानभाज्या विक्री अशा कामांमध्ये आदिवासी पुन्हा रोजगार मिळवू लागला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारे व्यवहार ठप्प झाले होते. पण आता कोरोनाविषयक निर्बंध शिथिल झाले असून रेती, वीट, भाताच्या गिरण्या, आठवडे बाजार असे सारे काही सुरू झाल्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांच्या हातांना पुन्हा एकदा रोजगार मिळू लागला आहे. शाळादेखील सुरू झाल्या आहेत. परंतु, पालक व विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आजही वर्ग ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. उद्योगक्षेत्रही रुळावर आल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र सुखावले आहेत. समुद्रीकिनारी असलेल्या मच्छीमार गावातही सध्या आनंदाचे वातावरण असून मत्स्यधनही चांगल्या प्रमाणात मिळत असल्यामुळे मच्छीबाजारसुद्धा चांगलाच तेजीत आला आहे.
शहरी भागांतही अनेक निर्बंध शिथिल झाले असून दुकाने, हॉटेल्स, वाडापावाच्या गाड्या, चहा व पान टपऱ्या पुन्हा सुरू झाल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची उपासमार आता टळली आहे.