कोळसाटंचाईचे संकट गडद

मुंबई (मुंबई) : कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

वापर काटकसरीने करा

ग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

उद्यापासून सर्वसामान्य साधणार थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने सामान्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून पुन्हा भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसाठी सहकार विभाग सुरू होत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याचे भाजप पक्षाने जाहीर केले आहे.

उद्यापासून सर्व केंद्रीय मंत्री वेळापत्रकाप्रमाणे भाजप मुख्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. कार्यकर्ते आणि सामान्यांच्या समस्या सोडवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पहिल्या आठवड्याच्या वेळापत्रकांमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव या केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून जीवघेणा प्रवास टाळा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आमदार नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून, खड्डे तातडीने भरण्याबाबत दिवाळीपूर्वी ठोस पावले उचला. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. एखादा पेंग्विन कमी पाळा. पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, असा टोलाही त्यांनी पत्रातून लगावला आहे.

मुंबईकरानी गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगरपालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती, परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय की, एखादा पेग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, असे नितेश यांनी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

कराचा पैसा खड्ड्यात घातला की क्रॉन्ट्रक्टर्सच्या घशात?

आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपानं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरूण विचारायला जातात, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेंव्हा आमच्यावर दंडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

म्हणूनच आयुक्तांना आमची भीती?

महानगरपालिकेतील सत्ताधारी सेना काँट्रॅक्टरधार्जिणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल, तर लोकशाही मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे; परंतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्चाच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत.

याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही काँट्रॅक्टरच्या संगनमताने सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची आयुक्तांना भीती वाटतेय, असे राणे यांनी नमूद केले आहे. सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवा. अन्यथा, मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरू, असं नितेश राणेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

विमानतळाबाहेर रस्त्यांवरील खड्डे बघायचे का?

अपुऱ्या सोयीसुविधांवरून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची ठाकरे सरकारवर टीका

संतोष राऊळ

चिपी : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ उद्घाटन हा माझ्यासह संपूर्ण कोकणवासीयांसाठी अविस्मरणीय दिवस आहे. माझ्यासह केंद्र सरकारने विमानतळ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. विमानसेवेचा शुभारंभ झाला तरी इथे एअरपोर्टला मुबलक पाणी नाही. अव्याहत वीजपुरवठा नाही. चांगला रस्ताही नाही. हा कसला विकास? विमानतळाचे उद्घाटन झालं, पण उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? हे खड्डे पाहावेत का? विमानतळाचं उद्घाटन करण्यापूर्वी हे रस्ते आणि बाकीच्या गोष्टी एमआयडीसीने करायला पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली. सिंधुदुर्गात काही ठिकाणी पायाभूत सुविधा आहेत. त्याचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव तिथे येऊच शकत नाही, असे सुनावले. विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला आलेल्या सर्वांना दीर्घ व उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करत त्यांच्या ईडापीडा दूर कर, असे मी इथल्या देवदेवतांना गाऱ्हाणं घालत असल्याचे राणे यांनी म्हटले.

बहुप्रतीक्षित चिपी येथील ‘सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. या उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री उदय सामंत, परिवहनमंत्री अनिल परब, कृषीमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. अध्यक्षा संजना सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडले गेले होते.

इथे येऊन राजकारण करू नये असे मला वाटत होते. जावे, शुभेच्छा द्याव्यात, चिपी विमानतळावरून उडणारं विमान डोळे भरून पाहावे, या उद्देशाने मी आलो होतो. विमान पाहून आनंद वाटला. १९९० मध्ये मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की सिंधुदुर्गमध्ये तू जा, तुला मागणी आहे. मी मालवणमध्ये निवडून आलो. मी जिल्ह्यातल्या अडचणी जाणून घेतल्या. फेब्रुवारीनंतर जिल्ह्याला पाणी नव्हतं. पुरेसे रस्ते नव्हते. महामार्गाची दुर्दशा होती. अनेक गावांना वीज नव्हती. यानंतर या भागाचा विकास मी केला. असं मी म्हणतो, लोक समजून घेतील नेमकं कुणी विकास केला? उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन मी हे केलं. त्यावेळी शिवसेना असल्याने. साहेबांचं श्रेय आहे. सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना तो रन्स नव्हे तर बॅटला क्रेडिट द्यायचा. मला सामान्यांसाठी काम करणं आवडते, असे राणे पुढे म्हणाले.

व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांनीच केला होता विरोध; राणेंनी दाखवली कात्रणे

नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात विमानतळाच्या भूमिपूजन प्रसंगी विरोध करणाऱ्यांचे वृत्तपत्रातील कात्रणे उपस्थितांना दाखवली.

१५ ऑगस्ट २००९ रोजी मी आणि सुरेश प्रभू विमानतळाचे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो. यावेळी काही जण या विमानतळाला विरोध करत होते. यातील काही मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सिंधुदुर्गात हायवेच्या चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे.

हे काम देखील काहींनी अडवून, अगोदर आमचं भागवा, असं सांगितलं.रेडी फोर्टला महिन्याला जाऊन काय गोळा करतात? या व्यक्ती कोण आहेत, ते उद्धवजी तुमच्या सहकाऱ्यांना विचारा. सी-वर्ल्ड प्रकल्पालाही याच लोकांनी विरोध केला. अजित पवार अर्थमंत्री मी १०० कोटी आणून दिले होते. मात्र ते काम काही झाले नाही. तुम्ही समजता तसं इथे काही नाही, याठिकाणची परिस्थिती अतिशय वेगळी आहे, असं सांगून राणेंनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार

केंद्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय माझ्याकडे आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत ८० टक्के उद्योग येतात. या खात्यामार्फत राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. पुढील ८ ते १० दिवसांत एमएसएमईचे अधिकारी सिंधुदुर्गात येणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास करून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या जातील, असे केंद्रीय मंत्री राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राशी रक्ताचे नाते : ज्योतिरादित्य शिंदे

‘माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझं एक पारंपरिक आणि रक्ताचं संबंध आहे. माझे सिंधुदुर्गासोबतही संबंध आहेत. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचं प्रतिक आहे. मी ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते. शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आमच्या मराठ्यांचा गौरव क्षण आहे. सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं की, माझ्या वडिलांचं विमानतळाचे एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केले, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून संवाद साधताना म्हटले.

कोकणचे ऐश्वर्य काकणभर जास्तच : उद्धव ठाकरे

शिवसेना आणि कोकणचे नाते मी सांगायला आलो नाही. चिपी विमानतळाच्या उद्घाटनानंतर कोकणची निसर्ग संपन्नता जगासमोर येणार आहे. याठिकाणी जगातले लोक यावे असे वाटत असेल तर सुविधा हव्यात. पर्यटन म्हटले की गोव्याचे नाव येते, आपण काही गोव्याच्या विरोधात नाही पण कोकणचे आपले ऐश्वर्य काकणभर जास्तच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रेवस-रेडी मार्गासाठी केंद्राची मदत घेऊ : पवार

रेवस ते रेडी पर्यंत जाणारा नवा मार्ग राज्यसरकारने जाहीर केला आहे.या मार्गासाठी केंद्र सरकारची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बाळासाहेबांना खोटे न बोलणारी माणसे आवडत होती : नारायण राणे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खोटं बोलणारी माणसे आवडत नव्हती, असे केंद्रीयमंत्री राणे यांनी चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी शनिवारी म्हटले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना याला प्रोटोकॉल म्हणतात का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला जी माहिती मिळते ती खरी नाही, तुमचे लोकप्रतिनिधी याठिकाणी काय करतात, याची तुम्ही गुप्त माहिती घ्या, असा सल्ला राणेंनी दिला आहे.

आदित्यने कन्सल्टन्सीच्या अहवालाचा अम्यास करावा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तरुण आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी टाटा कन्सल्टन्सीने तयार केलेला अहवाल वाचावा, त्याचा अभ्यास करावा आणि जिल्ह्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यावेत.

अलीकडच्या काळात येथील धरणांना एक रुपयाही मिळाला नाही, मी केलेल्या कामानंतर धरणाचं १ टक्का काम देखील पुढे गेलेलं नाही. आज विमानतळ सुरु होत आहे, मात्र या विमानतळाला रस्ता नाही, वीज नाही आणि पाणीही नाही. या विमानतळावर दाखल होणाऱ्या पर्यटकांनी येथील खड्डे पाहावेत का ? या रस्त्यासाठी ३४ कोटी निधीची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नारायण राणे यांनी केली.

आठवलेंच्या कवितेने वातावरण हलके फुलके

सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार कमान, कारण मुंबई वरून आले आहे विमान…, असे सांगताना सिंधुदुर्गसाठी हे विमानतळ महत्त्वाचे आहे.

या विमानतळाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होईल. पर्यटक येतील रोजगार वाढेल, असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

“एकत्र आले ठाकरे आणि राणे, मला आठवले महायुतीचे गाणे..” अशी दुसरी चारोळी करत आमने सामने असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये हशा पिकविला आणि वातावरण हलके फुलके केले.

या सिंधुदुर्ग मध्ये येणार आहे विकासाची नांदी, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया. माझ्या खात्यांतर्गत सर्वतोपरी मदत केली जाईल, असे यावेळी मंत्री आठवले यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासाठी प्रेरणास्रोत

डेन्मार्कच्या पंतप्रधानांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, असे डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी म्हटले आहे. त्यात तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. फ्रेडरिक्सन यांचे काल नवी दिल्लीमध्ये आगमन झाले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांचे स्वागत करत आदरातिथ्य केले.

परराष्ट्र राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिल्ली विमानळावर दाखल होत मेट फ्रेडरिक्सन यांचे स्वागत केले. उल्लेखनीय म्हणजे, डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मोदी यांनी मेट यांचं स्वागत केल्यानंतर राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत सोहळा झाला. मोदी आणि फ्रेडरिक्सन यांच्या द्विपक्षीय चर्चेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेदेखील सहभागी झाले होते.

भारत आणि डेन्मार्कनं पाणी आणि पर्यावरणशील इंधनावर काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. तसंच आम्ही आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांतही सोबत काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. हा हरित सहयोग महत्त्वकांक्षी आहे, असं यावेळी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी म्हटले. आम्ही भारताकडे एक जवळचा सहकारी देश म्हणून पाहतो, असंही यावेळी मेट यांनी सांगितले. मेट यांनी मोदींचे कौतुक करताना त्यांना डेन्मार्कला येण्याचे आमंत्रणही दिले.

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन आणि माझी ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असली तरी कोरोना काळात भारत आणि डेन्मार्क दरम्यान संपर्क आणि सहकार्याची गती कायम होती, असं यावेळी मोदी यांनी म्हटले.जवळपास वर्षभरापूर्वी आम्ही व्हर्च्युअल समिटमध्ये भारत आणि डेन्मार्क दरम्यान ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. हा निर्णय उभायदेशांच्या दीर्घकालीन विचार आणि पर्यावरणाप्रती सन्मानाचं प्रतिक आहे, असेही मोदी पुढे म्हणाले.

चेन्नईसमोर दिल्लीचे आव्हान

दुबई (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२१च्या प्ले-ऑफ फेरीला (बाद फेरी) रविवारपासून (१० ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. त्यातील क्वॉलिफायर-१मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आहेत.

क्वॉलिफायर-१मधील लढतीतील विजेता थेट अंतिम फेरीत पोहोचेल. पराभूत संघ स्पर्धेतून बाद होत नाही. गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांतील विजेत्यांसोबत क्वॉलिफायर-२मध्ये (दुसरी उपांत्य लढत) त्यांना खेळण्याची संधी मिळते. थेट फायनल प्रवेशाची संधी असल्याने क्वॉलिफायर-१मध्ये खेळणारा प्रत्येक संघ कामगिरी उंचावण्यासाठी उत्सुक असतो. यंदाही त्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघांमध्ये तशी चुरस असेल.

दिल्लीने १४ सामन्यांत १० सामने जिंकून २० गुणांनिशी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. कॅपिटल्सनी उर्वरित हंगामातील सहा सामन्यांपैकी ४ सामने जिंकत बऱ्यापैकी फॉर्म राखला आहे. शेवटच्या सामन्यांत बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सकडून मात खावी लागली असली तरी दिल्लीने पहिले स्थान कायम राखले. चेन्नईला १४ सामन्यांत ९ सामने जिंकता आलेत. युएई हंगामातील सलग चार सामने जिंकणारे धोनी आणि सहकारी अव्वल स्थानी कायम राहतील, असे वाटले. मात्र, शेवटच्या तीन सामन्यांत पराभव झाल्याने दुसऱ्या स्थानी घसरले. ताज्या क्रमवारीत चेन्नई आणि बंगळूरुचे समसमान गुण आहेत. मात्र, सरस रनरेटवर चेन्नईने अव्वल दोन संघांत स्थान राखले.

साखळी फेरीचा शेवट पराभवाने झाला तरी सांघिक कामगिरी उंचावल्याने क्वॉलिफायर-१मध्ये चेन्नईविरुद्ध दिल्लीचे पारडे जड आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या ओपनर्ससह श्रेयस अय्यर, कर्णधार रिषभ पंत तसेच शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉइनिसमुळे सातव्या क्रमांकापर्यंत बॅटिंग आहे. वेगवान दुकली कॅगिसो रबाडा आणि अॅन्रिच नॉर्ट्ज तसेच आर. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीला अवेश पटेल, मार्कस स्टॉइनिसची चांगली साथ मिळाल्याने गोलंदाजीतही चिंतेची बाब नाही.

चेन्नई हा आयपीएलमधील एक यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सनंतर त्यांनी सर्वाधिक जेतेपदे पटकावली आहेत. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने जबरदस्त फॉर्म राखला तरी गेल्या तीन सामन्यांत चेन्नईची फलंदाजी ढेपाळली आहे. गोलंदाजीतही तीच तऱ्हा आहे. पराभवाच्या हॅटट्रिकमुळे क्रिकेटपटू निश्चितच निराश झाले आहेत. निराशा झटकून स्पर्धेत परतण्याचे आव्हान चेन्नईसमोर आहे.

वेळ : सायं. ७.३०

लखीमपूर; सहानुभूती की भांडवल?

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हत्याकांडाने भाजप विरोधकांना आक्रोश करायला एक नवे हत्यार प्राप्त झाले. लखीमपूरमध्ये घडले ते अतिशय दुर्दैवी होते. ज्या निरपराध शेतकरी व भाजपच्या कार्यकर्त्यांचे बळी पडले त्याला नेमके कोण जबाबदार आहेत, हे पोलीस आणि न्यायालयीन चौकशीत बाहेर येईल. पण या घटनेनंतर काँग्रेस, सपा, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेट देण्यासाठी रांगा लागल्या आहेत, त्या पाहता या घटनेला राजकीय रंग फासला जात आहे, हे लक्षात येते. लखीमपूरला लागलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम काही जण करीत आहेत आणि ही आग धुमसत राहावी यासाठी काहींचा प्रयत्न चालू आहे. या घटनेचे राज्यावर व देशावर काय दुष्परिणाम होतील याची कुणाला फारशी पर्वा नाही. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामे द्यावेत, या एकाच मागणीचा भाजप विरोधकांनी घोशा लावला आहे.

हाथरसमध्ये बलात्कार करून हत्या केलेल्या निर्भयाच्या मृतदेहावर पोलिसांनी तिच्या परिवाराची संमती न घेताच परस्पर अंत्यसंस्कार केला होता. वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेने सारा देश हादरला होता. लखीमपूरमध्ये तर मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वेगवान मोटारीने शेतकरी आंदोलकांना चिरडून टाकले. या घटनेचे गांभीर्य ओळखून योगी आदित्यनाथ यांनी प्रशासन व शेतकरी नेते यांच्याबरोबर तत्काळ संवाद साधला. शेतकरी संघटनेच्या मागण्या मंजूर केल्या. लखीमपूरकांडाची चौकशी करण्याचे काम हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडे सोपविण्याचे जाहीर केले. मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पंचेचाळीस लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली. तसेच त्यांच्या परिवारातील एकाला शासकीय नोकरी देण्याचेही योगींनी आश्वासन दिले. शेतकरी नेते व सरकार यांच्यात या निर्णयावर सहमती झाली. आठवडाभरात दोषींना अटक करण्याचेही सरकारने आश्वासन दिले. अशा सर्व मुद्द्यांवर सरकार राजी झाले आणि शेतकरी संघटनांचेही समाधान झाले.

पण काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला समाधान नाही, याचेच आश्चर्य वाटते. लखीमपूर घटनेचा राजकीय लाभ उठविण्यासाठी हे दोन्ही पक्ष कसोशीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी आंदोलनाची ढाल पुढे करून उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात कोणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, त्याचाही पोलिसांनी छडा लावला पाहिजे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चौघांना चिरडून ठार केले, असा एक आरोप आहे. तसेच भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना आंदोलकांनी मोटारीतून खाली खेचून बेदम मारहाण करून ठार केले, असाही आरोप आहेच. ज्या तीन शेतकरी कायद्यांना विरोध म्हणून गेले नऊ महिने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन चालू आहे, त्या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

तोडगा सुचविण्यासाठी समिती नेमली आहे. मग शेतकरी कोणाच्या विरोधात आंदोलन करीत आहेत, असा प्रश्न न्यायालयानेच विचारला आहे. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर घुसून सशस्त्र आंदोलकांनी जो धुडगूस घातला, नंग्या तलवारी नाचवल्या, त्याबद्दल कोणत्याही संघटनेने आजवर जबाबदारी घेतलेली नाही. लखीमपूरला भाजपच्या कार्यकर्त्यांना खाली खेचून कोणी ठार केले, त्यासंबंधी कोणतीही संघटना ‘ब्र’ काढत नाही. आंदोलकांचे नेते शांततेची भाषा करीत असतात, पण हिंसाचार झाला की, त्याबद्दल बोलायला तयार होत नाहीत.

लखीमपूरला अशी घटना का घडली, हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता का, याचाही तपास झाला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री व स्थानिक खासदार अजय मिश्रा यांना दोन आठवड्यांपूर्वी आंदोलकांनी काळे झेंडे दाखविले होते, तेव्हा मंत्रीमहोदयांनी, मी तुमच्या मागे लागलो, तर तुमची पळता भुई थोडी होईल, अशी त्यांनी धमकी दिली होती. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा कार्यक्रमासाठी येत आहेत समजताच शेतकरी त्यांच्यापुढे निदर्शने करण्यासाठी पुन्हा निघाले होते. अजय मिश्रांवरील राग म्हणून हिंसाचार घडवला गेला का? शेतकरी आंदोलक व भाजप कार्यकर्ते यांच्यात बदला घेण्यापर्यंत मजल जाईल, याची पोलिसांना अगोदर कल्पना नव्हती का? मोटारीच्या ड्रायव्हरची, पत्रकाराची, भाजप कार्यकर्त्यांची हत्या कोणी केली?

ज्या मोटारीखाली चार आंदोलकांचा चिरडून मृत्यू झाला, त्या मोटारीत आपला पुत्र आशीष नव्हताच, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केला आहे. व्हीडिओमध्ये क्लिपमध्ये मोटारीतून उडी मारून पळालेला दुसराच आहे व त्यानेही तशी प्रसार माध्यमांसमोर कबुली दिली आहे. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवताना मंत्री पुत्र आशीष त्या मोटारीत असल्याची नोंद केली आहे. मग खरे काय, हे गूढ आहे.

लखीमपूरमधील हिंसाचाराचे पडसाद पिलभित, शहाँजहापूर, हरदोई, सीतापूर, बहराईच, या लगतच्या जिल्ह्यातही पडू शकतात, सीमेवरील या जिल्ह्यांमध्ये २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला भरोघोस यश मिळाले. या भागातील ४२ पैकी ३७ विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आले आहेत.

लखीमपूर हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. उच्चवर्णीय, विशेषत: ब्राह्मण समाजाचा येथे प्रभाव आहे. मुस्लीम, कुर्मी, शीख समाजही संख्येने मोठा आहे. राज्याच्या सीमेवरील सहा जिल्ह्यांत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. लखीमपूरमध्ये ज्या ठिकाणी हिंसाचार झाला व हत्याकांड घडले, तेथे १९९३पासून भाजपचा आमदार निवडून येत आहे.

लखीमपूर खेरी हा अजय मिश्रांचा गड म्हणून ओळखला जातो. यूपीमधील तेराई पट्ट्यातील ते शक्तिशाली नेते आहेत. टेणी महाराज म्हणून ते परिचित आहेत. खेरीमधून ते दोन वेळा खासदार झाले. राजकारणात येण्यापूर्वी ते व्यवसायाने वकील होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सपाच्या उमेदवाराचा सव्वा दोन लाखांनी पराभव केला. केंद्र सरकारमधील यूपीचा ब्राह्मण चेहरा ही आणखी ओळख आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका वड्रा, पंजाबचे मुख्यमंत्री चरजितसिंग चन्नी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बहेल यांनी मोठ्या लवाजम्यासह मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मृतांच्या परिवाराला काँग्रेसच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी एक कोटीची मदत जाहीर केली. ही मदत हिंसाचारात मरण पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांनाही मिळणार का?

राहुल व प्रियंका गांधींच्या यूपी भेटीच्या वेळी लखनऊमध्ये शीख समाजाने फलक लावले होते.

नहीं चाहिए फर्जी सहानुभूती,
खून से भरा है दामन तुम्हारा,
तुम क्या दोंगे साथ हमारा,
नहीं चाहिए साथ तुम्हारा…

[email protected]

खादी व ग्रामोद्योग – रोजगाराची संधी

कोकणी बाणा : सतीश पाटणकर

ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी, खादी व ग्रामोद्योगासाठी पतपुरवठा, कच्चा माल पुरवठ्याची शिफारस, कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन, तयार मालाच्या विक्रीस मदत, निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण, खादी ग्रामोद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ठरविण्याबाबत शासनाशी प्रभावी संपर्क, स्थानिक साधन संपत्तीचा वापर करून ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगार मिळवून देणे हे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उद्दिष्ट आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची ही संक्षिप्त माहिती

प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकारतर्फे सूक्ष्म उद्यम उभारण्यासाठी पहिल्या पिढीच्या उद्योजकांना सक्षम बनविणारी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडे कार्यान्वित असलेली प्रधानमंत्री रोजगार योजना व खादी आयोगाची आर.ई.जी.पी. मार्जिन मनी योजना या दोन्ही योजना एकत्रित करून ही नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

वयाची १८ वर्षं पूर्ण झालेली व्यक्ती, किमान सातवी पास व्यक्ती रुपये ५ लाखांच्या वरील प्रकरणासाठी पात्र, स्वयंसहाय्यता बचत गट पात्र, १८६०च्या सोसायटी नोंदणी कायद्यान्वये रजिस्टर्ड झालेल्या संस्था, १९६०च्या सहकारी कायद्यान्वये नोंदणी झालेल्या सहकारी सोसायट्या, १९५० च्या सार्वजनिक विश्वस्त कायद्यान्वये नोंदणी झालेल्या संस्था, एक कुटुंबांतील पती किंवा पत्नी एकच व्यक्ती लाभधारक होऊ शकते. या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रकल्प मर्यादा ही उत्पादन युनिट / उद्योग रुपये २५ लाखांपर्यंत, सेवा उद्योग रुपये १० लाखांपर्यंत आहे.

अर्थसहाय्याचे स्वरूप-लाभार्थ्यांची वर्गवारी १) सर्वसाधारणसाठी स्वगुंतवणूक १० टक्के, अनुदानाचा भाग २५ टक्के, बँक कर्ज ६५ टक्के, लाभार्थ्यांची वर्गवारी २) विशेष (अनु. जाती/अनु.जमाती/इमाव/महिला / माजी सैनिक / शारीरिकदृष्ट्या अपंग / एनईआर/ डोंगरी आणि सीमा भागातील धरून स्वगुंतवणूक ५ टक्के, अनुदानाचा भाग ३५ टक्के, बँक कर्ज ६० टक्के ही योजना जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोग या तिन्ही यंत्रणेमार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे – रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, लोकसंख्या, उद्योग ना-हरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक), शैक्षणिक दाखले (टी.सी./सनद/प्रवेश निर्गम उतारा), जातीचे प्रमाणपत्र (असल्यास), उद्योगाचे अनुभव/प्रशिक्षण प्रमाणपत्र, उद्योगास आवश्यक हत्यारे – अवजारे, मशीनरीचे दरपत्रक (कोटेशन) ज्या ठिकाणी उद्योग प्रस्तावित होणार आहे त्या जागेचा पुरावा (नमुना नं. आठ व सातबारा) तसेच जागा स्वत:ची नसल्यास जागा मालकासोबत केलेले करारपत्रक, बांधकाम असल्यास मंजूर प्लान व इस्टिमेट (इंजिनीअर) व बांधकाम परवानगी (ग्रामपंचायत), वीज उपलब्धता दाखला (एमएसईबी), उद्योगास आवश्यक परवाने घेण्याची जबाबदारी उद्योजकाची राहील, प्रकल्प राशी रुपये एक लाखांच्या वर असल्यास प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट), शासनाने विहीत केलेले शपथपत्र रुपये शंभरच्या बाँडवर नोटरी करून देणे.

विशेष घटक योजना

शासनाच्या २० कलमी कार्यक्रमांतर्गत कलम ११ अ अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकातील दारिद्र्यरेषेखालील लाभधारकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना दारिद्र्यरेषेच्यावर आणण्याकरिता मंडळ राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभधारकांना त्यांच्या ग्रामोद्योगाच्या उभारणीकरिता त्यांच्या गरजेइतपत वित्तसहाय्य वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून देते. या कर्जावर मंडळामार्फत विशेष केंद्रीय साहाय्यातून दहा हजार रुपयांपर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या ५० टक्केपैकी कमी असणारी रक्कम लाभधारकास अनुदान स्वरूपात मंजूर करण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे – रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, शैक्षणिक दाखले (टी.सी. / सनद / प्रवेश निर्गम उतारा), जातीच्या प्रमाणपत्राची प्रमाणित सत्यप्रत, चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (प्राधिकृत अधिकारी यांचे), (उत्पन्न मर्यादा शहरी भाग ५१ हजार ५०० रुपये व ग्रामीण भाग ४० हजार ५०० रुपये), संबंधित महामंडळाचे प्रमाणपत्र (अनुदानाचा लाभ घेतला नसल्याचे), उद्योगास आवश्यक हत्यारे-अवजारे, मशीनरीचे दरपत्रक (कोटेशन), ज्या ठिकाणी उद्योग प्रस्तापित होणार आहे त्या जागेचा पुरावा (नमुना नं. ८ , ७/१२, घरपट्टी, टॅक्स पावती), तसेच जागा स्वत:ची नसल्यास जागा मालकासोबत केलेले करार पत्रक, उद्योगाचे अनुभव / प्रशिक्षण प्रमाणपत्र. प्रतिज्ञापत्र (रुपये २०/- कोर्ट फी लावून नोटरी केलेले).

कारागीर रोजगार हमी योजना

ग्रामीण भागात विखुरलेल्या कारागिरांना संघटित करून रोजगार उपलब्ध करून गटस्तरावर शासनाच्या सहकार्याने १९६०च्या सहकार कायद्यान्वये राज्यात एकूण ३११ विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची स्थापना केली आहे.

या संघामध्ये आतापर्यंत ५ लाख ८१ हजार ४८ सभासद नोंदविण्यात आले आहेत. त्याच्या ग्रामोद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारा कर्ज पुरवठा हा ग्रामोद्योग संघाच्या माध्यमाद्वारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून नाबार्डच्या पुनर्वित योजनेतंर्गत संकलित व मध्यम मुदत स्वरूपात सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध करून दिला जातो.

गट संस्थेतील अनु. जाती व नवबौद्ध घटकातील कारागिरांना जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा राष्ट्रीयीकृत बँक यांनी वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिल्यास त्या कर्जवर मंडळामार्फत विशेष केंद्रीय सहाय्यातून १० हजार रुपयांपर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या ५० टक्केपैकी कमी असणारी रक्कम उद्योजकास अनुदान स्वरूपात मंजूर करण्यात येते. उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, आवश्यक त्याठिकाणी संघामार्फत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे सभासदामार्फत उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या संस्थामार्फत तसेच मंडळामार्फत मदत केली जाते.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

डोक्याला त्रास कशाला?

सेल्फी : चंद्रकांत बर्वे

मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. रोजची आवश्यक छोटी-मोठी खरेदी स्वतःच करत असतो. गल्लीतल्या डेअरीवाल्याकडे गेलो, छान ताजं पनीर दिसलं. काय भाव? ३२० रु. किलो.

म्हटलं १०० ग्रॅम दे.

दुधाची एक पिशवी दे… त्याचे २३ रु. झाले आणि ती कोल्ड ड्रिंकची मोठी बाटली?

तिचे ५० रु. OK, मी मनातल्या मनात हिशेब केला. १०५ रु. झाले. मी २०० रुपयांची नोट व एक पाचचे नाणे हातात घेतले. म्हटलं आता तो लगेच १००ची नोट परत देईल. पण नाही. त्याने हातात कॅल्क्युलेटर घेतला. ३२० भागिले १० बरोबर ३२ अधिक २३ अधिक ५० असं गणित करून १०५ रु. मागितले. माझ्या हातात आधीच २०० रु. आणि ५ चे नाणे पाहून त्याला कौतुक वाटलं.

जवळच्या पोळी-भाजी केंद्रावर गेलो. ७ रुपये किमतीच्या ५ पोळ्या, ४० रु. सुकी भाजी आणि इतक्यात ताजे आलेलं एक ५५ रुपयांचे भाजणीच्या पिठाचे पाकीट घेतलं. मी आपलं मनातल्या मनात हिशेब करून हातात १३० रु. काढले. पण काऊंटरवरच्या मुलीने मात्र लगेच कॅल्क्युलेटर घेऊन ७ गुणिले ५ बरोबर ३५ अधिक ४० अधिक ५५ असे एकूण १३० रु. बिल सांगितले, पण माझ्या हातात आधीच १३० रु. बघून तिने स्मित केलं.

आता असे प्रकार आपण सगळेच अनुभवतो. असं काही आहे का? की आमची पिढी फार हुशार आणि ही नवी पिढी साधारण बुद्धीची? नाही अजिबात नाही! एखादा मोठा मेसेज मोबाईलवर ते आमच्या दुप्पट वेगाने टाईप करू शकतात, पण या असल्या फालतू हिशेबाकरिता ते कॅल्क्युलेटर घेतात कारण तो स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे, मग डोक्याला तो बेरीज- वजाबाकीचा त्रास कशाला घ्या?

आता चला मी माझ्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईल क्रांती झालेली नव्हती, तेव्हा ठिकठिकाणी टेलिफोन ऑपरेटर आपलं टेलिफोन बुथ चालवत असत. बरेचदा काही अंध मंडळी हे चालवत असत. आपण नंबर सांगितला की, डायल फिरवून तो फोन लागताच आपल्या हातात देत. एका ३ मिनिटांच्या कॉलचे २५ पैसे या हिशेबाने पैसे घेत. बिल दीड रुपया झाले, आपण दहाची नोट दिली की, ती नोट हातात घेताच त्या नोटेच्या आकारावरून, त्या नोटेला स्पर्श करून ते ती नोट खरी आहे आणि कितीची आहे हे ओळखत आणि आपल्या गल्ल्यातून बरोबर पाचची एक नोट, एकेकच्या तीन नोटा व पन्नास पैशाचं नाणं ते परत देत. लॉटरी तिकीट विकणारा अंध देखील अशी नोटांची अगदी अचूक देवाण-घेवाण करत असे. आम्हाला ते जमलं नसतं मग त्यांना का जमायचं? कारण त्यांना अंधत्व असल्याने त्यांचं नकळत किंवा प्रयत्नपूर्वक इतर इंद्रियांचा अधिक चांगला वापर करण्याचे ट्रेनिंग झालं होतं. आम्हाला दृष्टी असल्याने हे बाकी गुण विकसित करण्याची आम्हाला कधी गरजच भासली नाही. आम्हीही ते करू शकलो असतो. आजच्या तरुणांना देखील साध्या बेरीज-वाजबाकीसाठी डोक्याला त्रास न देता हातातलं यंत्र त्यांना पसंत आहे.

आता आपण सहाशे वर्षे मागे जाऊ या. स्थळ : मॉरिशस. तेव्हा त्या निर्जन बेटावर ‘डोडो’ नावाचे पक्षी होते. त्यांचं अन्न बेटावर भरपूर उपलब्ध होतं, शिवाय त्या पक्षांना खाणारे प्राणी नव्हते. मग काय? त्यांचा उद्योग पोटभर खाणे, प्रजोत्पादन करणे आणि आराम करणे. त्यांना आता जोरात धावण्याची, उडण्याची गरज उरली नाही. अंड्यांच्या देखील संरक्षणासाठी आवश्यकता नव्हती. त्यामुळे त्यांच्या पायातली, पंखातली ताकद कमी होत गेली. पुढे डच लोकांना ते बेट सापडले. त्यांनी वसाहत केली. त्यांना हा गब्दुल पक्षी खायला आयताच मिळाला. त्यांच्याबरोबर त्यांनी पाळलेले कुत्रे होतेच, शिवाय बोटीतले उंदीर बेटावर उतरले. बिचारे डोडो, माणसांपासून किंवा कुत्र्यांच्या विरोधात प्रतिकार करणे सोडाच ते पळून किंवा उडून आपला जीवही वाचवू शकले नाहीत. उंदरांनीही त्यांच्या अंड्यांवर ताव मारला आणि बघता बघता जगातून डोडो हा पक्षी नामशेष झाला.

[email protected]

धरती

कथा : डॉ. विजया वाड

घरती, तुझे बाबा लग्न करतायत, दिवेकर मॅडम सोबत.” अंजली हलकासा धक्का देत म्हणाली.

“ठाऊकाय मला, शी इज माय रिप्लेसमेंट मदर.” धरतीचा स्वर कडवट होता. पुरुष लग्नाशिवाय… म्हणजे स्त्रीशिवाय जगू शकत नाहीत. १३-१४च्या वयात धरतीला कष्टाने कबूल करावे लागत होते.

“धरती, शाळा सुटल्यावर बोलू. इथेच आणि याच बाकावर.” चिठ्ठी पावली. थांबणे भाग होते. दिवेकर मॅडम विसूभाऊंना विनंती करून वर्गात शिरल्या. शाळेचे प्यून! वर्दी द्यावीच लागते ना.

“खूप रागावलीयस ना माझ्यावर?”

“नाराज आहे.” धरती स्पष्ट म्हणाली.

“तू आता मोठी आहेस.”

“मला सगळं समजतं. आठवीच्या विज्ञानाच्या पुस्तकात सारं आहे.”

“पण बलात्कार पाठ्यपुस्तकात नसतो. “बलात्कार?” हे धरतीच्या मनोशक्तीच्या बाहेरचं होतं.

“तूच म्हणालीस, तुला सारं समजतं म्हणून सांगते, मोकळेपणानं… धरती, तुझे बाबा देव माणूस आहेत. हे तुला ठाऊक आहे ना?” “हो.” एकाक्षरी उत्तर देऊन धरती गप्प बसली.

“देशपांडे साहेब, संस्कार वर्गाला यायचे… तिथेच आमची मैत्री झाली. मोठा संशयी गं तो नराधम. कुलूप लावून जायचा शक्तिशाली.” हे धरतीला नवे होते. “बाहेरून” ओठ गच्च आवळून दिवेकर मॅडम म्हणाल्या. “विश्वास नावाची चीज आहे ना मॅडम जगात.” “अपवादात्मकच”

ऑफिसातून आल्या शोधमोहीम चालूच. तासन् तास! “कोण आलं होतं? कसं आलं होतं कबूल कर. इनक्वायरी ऑफीसर जणू.” दिवेकर मॅडम म्हणाल्या “एक दिवस चौकशी सम्राटांवर मी बरसले.” तुम्ही गेलात नि चार गुंड शिरले चौघांनी आळीपाळीने मजवर बळजोरी केली. मी ओरडले… आरोळी ठोकली. “वाचवा! वाचवा!” “इथे बळजोरी करताहेत” “मग काय झालं मॅडम.” “काय होणार?” देवमाणूस म्हणून लग्न केलं. येणारा जाणारा प्रत्येक माणूस! तीच गोष्ट… तीच तीच! तेच आख्यान, मी म्हणूनच सहन केलं एक दिवस भरदुपारी घरातून?”

“पळून गेलात?” “पोलीस कंप्लेट केलीत?” धरतीनं विचारलं कुतुहल हो!

“पळून गेले. कंप्लेंट केली, पण ती टिकली नाही!”

“पैसा? अस्थानी वापरलेला!” दात ओठ खात धरती म्हणाली. किशोरवयीन राग उसळला. धरतीचे गाल कुरवाळीत दिवेकर मॅडम गोड हसल्या. म्हणाल्या, “ज्याचा शेवट गोड ते सारे गोड! दिवेकर मॅडम बोलल्या मुलाखतीत मी स्पष्ट मिस्टर दिवेकरांना सांगितलं.मला कशाचा वीट आला होता ते” “दिवेकर सरांनी ऐकून घेतलं मॅडम?” “तुला सांगते ना! जगात सुष्ट.. दुष्ट दोन्ही प्रकारची माणसं असतात तो दुष्ट होता, पण दिवेकर साहेब मानवतावादी होते. त्यांची पत्नी वेड्यांच्या इस्पितळात! पदरी छोटं बाळ! मी राजसचा स्वीकार आनंदान केला. ते सुखी! अन् मीही सुखी…” आयुष्य सोप्पं करुन टाकणाऱ्या दिवेकर मॅडमकडे धरती बघतच राहिली.

“प्रॉब्लेम कधीच मोठा नसतो. हाऊ डु यू लुक अॅट इट इज डिफरंट…” धरती विस्मयाने बघत राहिली. दिवेकर मॅडमकडे. “तुझे बाबा देवमाणूस आहेत. आम्ही ४ वेळा भेटलो. ४ वेळा! प्रत्येक वेळी धरतीची परवानगी असेल तरचं! हीच रट लावलीय” “पण बाबा…!” “धीर झाला नसेल… गं!” “मग मी विचारते..” धरती म्हणाली. “नको नको..” बाई, घाईने म्हणाल्या.

“बाबा माझे मन दुखवायला घाबरतात.” पण मी देखील त्यांचीच लेक आहे… धरती. त्यांच्या मायेचा पाऊस माझ्या स्वप्नांची फुले फुलवीत आला आजवर.. आता माझी पाळी आहे, त्यांचे आभाळ बनायची… मी माझा होकार त्यांना कळवणार.. माझे बाबा माझे असतील आणि ही लेक त्यांची धरती त्यांच्या सुखाची धरा बनेल.