महाराष्ट्र बंदला भाजपचा विरोध

मुंबई/नगर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे. या बंदमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

लखीमपूरमधील एका घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच टाळेबंदी करून यांनी मुंबईकरांची रोजी-रोटी संपवली होती. त्यातलाच हा आणखी एक प्रकार आहे. मात्र, मुंबईत भाजप प्राणपणाने या बंदला विरोध करेल. कुणी सरकारी दडपशाही करून किंवा पक्षीय दडपशाही करून मुंबईकरांना त्यांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजप रस्त्यावर उतरून याला विरोध करेल, असे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने सोमवारी, ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

आघाडीतर्फे पुकारण्यात येणाऱ्या बंदमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सहभागी होऊ, नये असे आवाहन भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याखंड झाले होते. तसेच मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. ही घटना महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. बंद पुकारणाऱ्या पक्षांकडून शेतकऱ्यांवर सतत अन्याय झाला आहे. सध्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही या सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. उलट थकीत बिलांच्या पैशासाठी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. जळालेली रोहित्र बदलून मिळत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आता कोठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली आहे. तोटा भरून काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सणासुदीच्या दिवसांत व्यवसाय सावरत आहेत. अशातच बंद पुकारण्यात आल्याने पुन्हा व्यवसायाला खीळ बसणार आहे. व्यवसाय वाढीला चालना देण्याऐवजी बंदमध्ये सहभागी करून घेत व्यापाऱ्यांचे नुकसान केले जात आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊ नये,’ असे मुंडे यांनी म्हटले आहे.

अत्यावश्यक सेवांना वगळले

आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

दुकानदारांना बंदमध्ये खेचू नका : वीरेन शहा

बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन विरेन शहा यांनी केले आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मात्र, उद्या दुकाने सुरू राहतील. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरू झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जििकरीचे झाले आहे, असे शहा यांनी सांगितले. मुंबई व्यापार संघाची भूमिका त्यांनी माडली आहे.

कोकणवासीयांसाठी आकाश झाले खुले

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन कोकणचे भाग्यविधाते व केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच देशाचे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या साक्षीने शनिवारी पार पडले. कोकणवासीयांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आकाश खुले झाले. नारायण राणे यांनी विमानतळासाठी तब्बल तीस वर्षे केलेल्या संघर्षाला अखेर फळ मिळाले. राणे आणि कोकणातील जनतेचे स्वप्न साकार झाले. देशात प्रत्येक राज्यातील दोन-चार शहरांत विमानतळ आहेत. कोणत्याही विमानतळाच्या उद्घाटनाला एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती. कोणत्याही विमानतळाच्या उभारणीला एवढी दीर्घ काळ म्हणजे तीन दशके प्रतीक्षा करावी लागली नव्हती. चिपी विमानतळ कोकणवासीयांना संपन्न आणि समृद्धीकडे नेईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. कोकण रेल्वेच्या उभारणीत मधू दंडवते यांचे जेवढे योगदान मोलाचे आहे, तेवढेच चिपी विमानतळाच्या उभारणीत नारायण राणे यांचा वाटा सर्वात मोलाचा आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या सांगण्यावरूनच १९९०मध्ये राणे यांनी सिंधुदुर्गमधून विधानसभेची निवडणूक लढवली व आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांनी या जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. रस्ते, शाळा, वीज, बसेस सर्वच क्षेत्रांत त्यांनी सिंधुदुर्गचा कायापालट घडवला. विमानतळ झाल्यावर खऱ्या अर्थाने कोकणवासीयांना समृद्धीचे दार खुले होईल, हे त्यांनी ओळखले होते. त्यांच्या आग्रहावरूनच सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यंटन जिल्हा घोषित झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून घेतल्यावर राणे यांनी पहिल्या आठवड्यातच नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित केली. विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात या प्रकल्पासाठी आपण तीस वर्षे कसा पाठपुरावा केला, त्याचा आलेख राणे यांनी आपल्या भाषणातून मांडला. याच विमानतळाला जे कोणी विरोध करीत होते, तेच आजच्या कार्यक्रमात व्यासपीठावर असल्याचे त्यांनी जोरकसपणे सांगताच, संबंधितांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.

कोकणातील महामार्गाचे काम ज्यांना दिले, त्या कंत्राटदारांना गाठून त्यांच्याकडून काय कोणी मिळवले, याची तपशीलवार माहिती राणेसाहेबांकडे आहे. हेच लोक विमानतळाचे श्रेय घेण्यासाठी पुढे नाचताना दिसतात. व्यासपीठावरून राणे जे काही बोलले ते रोखठोक होते, सत्य होते, वास्तव होते. राज्याचे मुख्यमंत्री व्यासपीठावर होते, त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी दुटप्पी व मतलबी वागत असतील, तर त्यांनी तशी त्यांना तंबी द्यायला हवी होती; पण उलट त्यांनी अशा लोकप्रतिनिधींचा मला अभिमान वाटतो, अशी फुशारकी मारली. एकीकडे कोकणचा विकास गतीमान होईल, असे म्हणायचे व दुसरीकडे विकास प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांचे कौतुक करायचे…, हा दुटप्पी प्रकार आहे. सिंधुदुर्गमधील विकासाचे प्रकल्प हे केवळ राणेसाहेबांच्या अथक परिश्रमातून, कल्पकतेतून आणि त्यांच्या पाठपुराव्याने उभे राहिले आहेत. महाआघाडी सरकारने विशेषत: शिवसेनेने कोकणासाठी काय वेगळे करून दाखवले, हे एकदा जाहीरपणे सांगावे. केवळ फुकाच्या गोष्टी सांगून व भावनिक आवाहन करून मते मिळविण्याचे दिवस संपले आहेत.

विमानतळाचे उद्घाटन झाले असले तरी महामार्ग ते विमानतळ असा अॅप्रोच रोड (जोड रस्ता) झालेला नाही, तो एमआयडीसीने तातडीने केला पाहिजे, असे राणे यांनी स्पष्ट सुनावले. त्यासाठी ३४ कोटी रुपये पाहिजेत. विमानतळावर वीज, पाणी यांची पुरेशी व्यवस्था झाली पाहिजे, याकडेही लक्ष वेधले; पण त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही. जे प्रश्न आहेत, जे विमानतळासंबंधी मुद्दे मांडले गेले, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी साधा उल्लेखही केला नाही.

खोटे बोललेले शिवसेनाप्रमुखांना आवडत नसे, असे राणेसाहेबांनी आपल्या भाषणातून खडसावून सांगितले. त्यांचा रोख शिवसेनेतील खोटे बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींवर होता. त्यावर आपल्या पक्षातील खोटे बोलणाऱ्यांची कानउघाडणी करण्याऐवजी राजकीय मल्लिनाथी करण्यातच मुख्यमंत्र्यानी धन्यता मानली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमख्यमंत्री, महलूसमंत्री, पर्यटन व पर्यावरणमंत्री, उद्योगमंत्री, पालकमंत्री असा सरकारचा मोठा ताफा या कार्यक्रमाला हजर होता. पण राणे साहेबांनी मांडलेले प्रश्न किंवा विमानतळासंबंधीच्या त्रुटी याविषयी कोणी ब्र सुद्धा काढला नाही. ते आले, त्यांचे स्वागत झाले, व्यासपीठावर आले आणि भाषण झोडून गेले… यापलीकडे या सरकारने कोकणला काय दिले? वादळ-अतिवृष्टीत ते असेच कोकणात आले होते व दोन-चार तासांतच मुंबईला परतले. कोकणातील जनता डोळे मिटून बसलेली नाही. सरकारच्या या बनवेगिरी व दिखाऊपणाला लोक कंटाळली आहेत. त्याची किंमत या सरकारला मोजावी लागणार आहे.

गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त…

अंकिता गजभिये, नवी दिल्ली

गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त/ हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त म्हणजेच धरतीवर जर कुठे स्वर्ग असेल, तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे. अमीर खुसरो यांच्या ओळीतून आजही स्वर्गरूपी काश्मीर प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर तरळतो.

“हस्त मेरा मौलिद व मावा व वतन” हिन्द कैसा है?

‘किश्वरे हिन्द अस्त बहिश्ते बर जमीन’

अर्थात, हिंद माझी जन्मभूमी आहे, भारत देश धरतीवर जणू स्वर्गच आहे. खुसरोंच्या या ओळीतून भारतभूमीचे सार्थक वर्णन दिसून येते; परंतु देशाच्या स्वातंत्र प्राप्तीनंतर गेल्या ७० वर्षांपासून या स्वर्गाला ग्रहण लागले होते. कायम अशांतता, शेजारी राष्ट्राकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला घालण्यात येणारे खतपाणी आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे कायमचा धुमसत असलेला काश्मीर आता कुठेसा शांत झाल्याचे दिसून येत आहे. खुसरोंच्या काळातील काश्मीरची ‘सादगी’ परत मिळवून देण्याचे आता सरकारने ठरवलंय. स्वर्गरूपी या केंद्रशासित प्रदेशाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतले आहे. पंतप्रधानांचे नेतृत्व आणि गडकरींचे ‘व्हिजन’ यासाठी पुरेसे आहे. अत्यंत खडतर आणि कठीण अशा भागात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा ‘झोजिला’ बोगद्याचे बांधकाम जवळपास पूर्ण करीत गडकरींनी त्यांचे ‘कमिटमेंट’ पूर्ण केले आहे.

पाकिस्तान आणि चीन या शेजारच्या राष्ट्रांच्या आगळकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा बोगदा विशेष महत्त्वाचा आहे. याचे काम पूर्ण झाल्यावर लष्कराला अत्यंत कमी वेळात सीमेवर दारूगोळा पोहोचवता येऊ शकेल. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की झोजिला बोगदा ‘ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी’अंतर्गत बांधला जात असून, हा आशियातील सर्वात लांब बोगदा असेल. जम्मू-काश्मीर आणि लडाख खोऱ्यात जवळपास १.५ लाख कोटी रुपयांच्या निधीतून ५२ किलोमीटर लांब हा भूमिगत मार्ग बनवण्यात येत आहे. या मार्गामुळे काश्मीर आणि काश्मीरवासीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतील. जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास ३२ किलोमीटर लांब २० भूमिगत मार्ग आणि २० किलोमीटरचे भूमिगत मार्ग लडाखमध्ये उभारले जात आहेत. झोजिला बोगद्यामुळे साडेतीन तासांचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांमध्ये पूर्ण होईल. केंद्र सरकारला जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये अनेक शक्यता दिसून आल्या आहेत. यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक दर्जाच्या सुविधांना विकसित केले जात आहे. येत्या काळात स्वित्झर्लंड येथील दावोसच्या धर्तीवर काश्मिरातील सोनमर्गमध्ये ‘आईस स्पोर्ट्स’ आयोजित केले जातील, याची शक्यता नाकारता येत नाही. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पर्यटनाला चालना मिळून युवकांना रोजगार मिळेल.

झोजिलासह झेड-मोड बोगदादेखील या ठिकाणी तयार केला जात आहे. हा बोगदा ६.५ किलोमीटर लांब असून झोजिला १३.५ किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांचा प्रवास सुकर होईल. हिवाळ्यात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे श्रीनगर-लेह-लडाख महामार्ग बंद होतो. ही समस्या पुन्हा कधी उद्भवू नये, यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उंचावर असल्याने सोनमर्गमध्ये हिमवृष्टी तसेच हिमस्खलनाची समस्या आहे. तीन ते चार महिने नागरिकांची येथील ये-जा बंद असते. झोजिला खोरे थेट लेह-लडाखच्या सीमेपर्यंत जात असल्याने भौगोलिकदृष्ट्या हा भाग अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. ६.२ किलोमीटर लांबीच्या झेड-मोड बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या हिवाळ्यात हा बोगदा खुला केला जाणार असल्याने अतिहिमवृष्टीमुळे स्थानिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची गरज आता राहणार नाही. झोजिला बोगद्याचे बांधकाम २ हजार ३०० कोटी रुपयांच्या निधीतून केले जात आहे. लष्कराच्या दृष्टीने धोरणात्मक महत्त्व असलेला सोनमर्गजवळील हा बोगदा श्रीनगर आणि लडाखदरम्यान प्रत्येक मौसमात संपर्क कायम ठेवण्याचे काम करेल. पर्यटक १२ महिने लेह-लडाख जाऊ शकतील. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने देखील हे बोगदे महत्त्वाची भूमिका बजावतील.

विशेष म्हणजे केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग १ हजार ६९५ किलोमीटर लांबीचा होता; परंतु तो आता २ हजार ६६४ किलोमीटरचा झाला आहे. सोनमर्गचा सुमारे ६.५ किमीचा झेड-मोड बोगदा, नीलगढ बोगदा आणि झोजिला बोगद्याला जोडला जाईल, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. या भागात बोगदा बांधल्यामुळे सुमारे तीन ते चार हजार लोकांना रोजगार मिळेल. कुठल्याही क्षेत्राच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासात रस्तांच्या जाळ्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. काश्मीर खोऱ्यात विकासाची गंगा पोहोचवण्याची केंद्राकडून करण्यात येणारी प्रामाणिक धडपड यावरून दिसून येते, यात शंका नाहीच. मात्र, गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरमधील विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचे कामही यानिमित्ताने केले जात आहे, हे नाकारून चालणार नाही.

निर्बंध शिथिल, पण भीती कायम

@ महानगर : सीमा दाते

जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने अद्यापही मुंबईची पाठ सोडलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसू लागली की, मनात धस्स होतं. गेल्या काही महिन्यांतील मुंबईसह राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला की, लक्षात येईल कोरोना रुग्णसंख्याही कमी झाली होती. म्हणून राज्य सरकारने राज्यातील, तर महापालिकेने मुंबईतील निर्बंध शिथिल केले होते; मात्र आता पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्ण वाढतील की काय, ही भीती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबई महापालिकेनेही आपली नियमावली जाहीर केली होती. मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्याने, मैदाने, चौपाट्या, हॉटेल, धार्मिक स्थळे या सगळ्यांसाठी ती नियमावली आहे. गेले दीड वर्षे हे सगळं बंद होतं; मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हळूहळू सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले. लोकल प्रवासाला काही अंशी परवानगी दिल्यानंतर उद्याने, मैदाने चौपाट्या सामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या. कार्यालये सुरू झाली, मंदिरे खुली झाली. पुन्हा एकदा लोकांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या आणि म्हणूनच पुन्हा एकदा भीती वाढू लागली.

ज्या पद्धतीने कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे आणि लसीकरण वेगाने होत आहे, हे ध्यानी घेऊन मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वाटत नाही, असे सांगितले होते. मात्र असे असतानाही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती संपलेली नाही. राज्य आणि मुंबईतील निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाची भीती कायम आहे आणि म्हणून नागरिकांनी देखील गाफील राहून चालणार नाही, जबाबदारीनेच वागणं गरजेचं आहे.

मुंबईत सध्या २००च्याही आत गेलेली कोरोना रुग्णसंख्या ५०० पार जाताना दिसत आहे. दोन वेळा रुग्णसंख्येने ५००चा आकडा पार केला होता. त्यानंतर बुधवारी, दि. ६ ऑक्टोबर रोजी ६२९ इतकी रुग्णसंख्या मुबंईत होती; त्यामुळे पुन्हा एकदा भीती वाढली आहे. गेल्या महिन्यात नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा झाला. निर्बंधही पूर्णपणे शिथिल न करण्यात आल्याने कदाचित गणेशोत्सव काळात रुग्णसंख्या वाढताना दिसली नाही. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत चढ-उतार दिसू लागला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणं, हे आव्हान पालिकेसमोर आहे.

नवरात्रोत्सवात मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मुंबईत देवीची स्थापना होते. हा नवरात्रोत्सव देखील नियमांचे पालन करत सुरू आहे. पालिकेने यावर्षी देखील या उत्सवासाठी कडक नियमावली जारी केली आहे. याच नियमावलीचं पालन करत उत्सव सुरू आहे. मंडळातील कार्यकर्ते देखील गर्दी होऊ नये, याची काळजी घेत आहेत. मात्र कोरोना रुग्णसंख्येतील चढ-उतार लक्षात घेता, पुढील एक महिना हा काळजीचाच आहे.

दसरा, दिवाळी हे मोठे सण सध्या येऊ घातले आहेत. या सणांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील बाजारात गर्दी होऊ शकते किंवा सणानिमिताने लोक एकमेकांना भेटतात. यामुळे रुग्णसंख्या देखील वाढण्याची भीती आहे आणि म्हणूनच पालिकेने देखील याच पार्श्वभूमीवर कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पालिकेने २६०हून अधिक केंद्रं देखील सुरू ठेवली आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, नागरिकांना देखील आता काळजी घेणं गरजेचं आहे. पालिकेने जरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं असलं तरी, वाढती रुग्णसंख्या ही पालिकेसाठी देखील आव्हानात्मकच आहे. लसीकरण वेगाने सुरू असताना पालिकेने तिसऱ्या लाटेसंदर्भात पूर्वनियोजन देखील केले आहे. ऑक्सिजन, रुग्णालये, खाटा यांचा पुरवठा करून ठेवला आहे. पण पालिकेसोबतच आता मुंबईकरांनाही आपलं भान जपत सण साजरे करायचे आहेतच. मुंबईकरांना जबाबदारीने, पालिकेचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तरच तिसरी लाट आलीच, तर मुंबईकर तिलाही थोपवू शकतात.

[email protected]

चोळाप्याचे निर्वाण व भक्तांचे रक्षण

विलास खानोलकर

एक वेळ श्री समर्थांची स्वारी सेवेकऱ्यांसह वाडी गावी गेली. तेथे देशपांडे यांनी येऊन सर्व सेवेकऱ्यांसह भोजन घातले. सर्व सेवेकरी भोजन करून रात्री निद्रिस्त झाले. तेथे एक देवीचे उग्रस्थान होते. ती देवी उग्ररूप धारण करून जिकडे तिकडे त्रास देऊ लागली. त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांस त्रास होऊ लागला. इतक्यात समर्थ जागृत होऊन म्हणाले, देवीला उशास घेतो. श्रींनी चोळाप्याचे भविष्य पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे मध्यान्ह रात्रीच्या समयास चोळाप्पास उपद्रव झाला. चोळाप्पा घाबरलेला पाहून सर्व मंडळीही घाबरली. चोळाप्पाच्या प्रेमाकरिता समर्थास भयंकर ताप भरला. नंतर देशपांडे यांनी समर्थास आपल्या गाडीतून अक्कलकोटास आणले. इकडे चोळाप्पाला अधिक त्रास होऊन (तो) शके १७९९ अश्विन शुद्ध नवमीस दिवसा इहलोक सोडून परलोकांत गेला. त्या दिवशी महाराजांस चैन नसून वृत्ती उदास होती.

राजपत्नीने श्रींस विचारले, महाराज, आज आपली वृत्ती उदास का झाली? समर्थ हळूहळू म्हणाले, काय करू? चोळ्याची संगत तुटली! तो वियोग सहन होत नाही गं! चोळ्यावाचून कोठे धावू? लीला कोणास दाखवू? आज सात जन्माचा सांगाती गेला गं! असे आम्हीही लवकरच जाऊ। हे ऐकून राणी साहेबांस फार वाईट वाटले. चोळाप्पा हा श्रींचा एकनिष्ठ भक्त होता. म्हणूनच महाराज चोळाप्पाची काळजी वाहत असत. असो. श्रींचे जे सेवक झाले, त्याची सर्वस्वी काळजी समर्थासच आहे. कितीही झाले, तरी आई-बाप क्षमा करतात. तसे समर्थाचे आहे. आमच्या हातून कितीही अपराध झाले, तरी निष्ठुरपणा किंवा विषमता या आईच्या (समर्थाच्या) हातून होत नाही. अशी श्रींची लीला अगाध होती.

स्वामींनी हाताळले अनेक रुग्ण
स्वामींची भक्ती सुटका करे रुग्ण
स्वामींच्या सेवेत जर असेल मनोरुग्ण
भिऊ नको मंत्रजपाने पळत जाई रुग्ण ।। १।।

स्वामीभक्त चोळाप्पा झाला आणि रुग्ण
अहोरात्र स्वामी त्याला वाचविण्यास मग्न, शेवटी यमराज घाबरला नेण्यास चोळाप्पा रुग्ण
स्वामींनी परवानगी
देता स्वर्गगमनाचे पूर्णस्वप्न ।। २।।

भक्त चोळाप्पा स्वामींचा दूतखास
स्वामी आणि भक्त एकजीव एकमास
चोळाप्पा करी स्वामी सेवा बारोमास
कृष्णसुदामा कृष्णार्जुन सोळा
तोळा खास ।। ३।।

रामभक्त हनुमान तसा त्याचा मान
सर्व कारभार स्वामी करिती देऊन मान
चोळाप्पाने न राखीला दुराभिमान
चोळाप्पाने झेंडा रोविला चंद्रावर
घेऊन चंद्रयान ।। ४।।

भक्तजन घ्या स्वामींचे नाम
सातासमुद्रापार नेईल स्वामींचे नाम
वल्हवा तुम्ही नाव घेऊन देवाचे नाम
सुवर्णक्षरांनी कोरले
हृदयात राम ।। ५।।

स्वामी समर्थ महाराज की जय

[email protected]

कोण, कुणाचा पत्ता कापणार?

शारजा (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२१ हंगामातील प्ले-ऑफ (बाद) फेरीतील दुसऱ्या सामन्यात एलिमेशनमध्ये सोमवारी (११ ऑक्टोबर) शारजा क्रिकेट मैदानावर बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या लढतीतील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने कोण, कुणाचा पत्ता कापणार, याची उत्सुकता आहे.

ताज्या गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले संघ एलिमिनेशनमध्ये भिडतात. १४ सामन्यांत ९ विजयांसह (१८ गुण) विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी तिसरे स्थान मिळवले. त्यांचे आणि दुसऱ्या स्थानावरील चेन्नई सुपर किंग्जचे गुण समसमान आहेत. मात्र, सरस धावगतीच्या (रनरेट) जोरावर धोनीच्या संघाने दुसरे स्थान पटकावले. साखळीतील १४पैकी निम्मे सामने जिंकून १४ गुणांसह कोलकाताने चौथे स्थान नक्की केले. पाचव्या स्थानी असलेला गतविजेता मुंबई इंडियन्स आणि त्यांचे समान गुण असले तरी सरस रनरेट नाइट रायडर्सना तारून गेला. पॉइंट्स टेबलमधील तळातील दोन संघांमध्ये असलेल्या संघांना फायनल प्रवेश तितका सोपा नसतो. त्यांना किमान दोन सामने जिंकावे लागतात. एलिमिनेटरमध्ये जिंकल्यानंतर क्वॉलिफायर १मध्ये अव्वल दोन संघांतील पराभूत संघाशी दोन हात करावे लागतात. कुठलाही संघ एका वेळी एकाच सामन्याचा विचार करतो. त्यामुळे बंगळूरु आणि कोलकातासमोर आजच्या सामन्यात खेळ उंचावण्याचे आव्हान आहे.

आमने-सामनेचा विचार केल्यास यंदाच्या हंगामातील दोन्ही लढतींपैकी प्रत्येकाने एकेक सामना जिंकला आहे. बंगळूरुने पहिल्या टप्प्यात बाजी मारली. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोलकाता वरचढ ठरला. युएईत झालेल्या उर्वरित हंगामाचा विचार करता बंगळूरुने सातपैकी चार सामने जिंकले. सलग दोन पराभवांनंतर विजयाची हॅटट्रिक साधताना विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी जबरदस्त कमबॅक केले. तळातील सनरायझर्स हैदराबादने विजयी मालिका खंडित केली तरी शेवटच्या साखळी लढतीत पंजाब किंग्जला हरवत रॉयल चॅलेंजर्सनी अव्वल चार संघांत दिमाखात स्थान मिळवले. इयॉन मॉर्गन आणि कंपनीने उर्वरित हंगामात सर्वोत्तम सांघिक खेळ करताना सातपैकी पाच सामने जिंकण्याची करामत साधली. तसेच बाद फेरी गाठली. साखळीतील शेवटचे दोन सामने जिंकत कोलकाताने कामगिरीत सातत्य राखले आहे. तळातील दोन संघांमध्ये चार गुणांचा फरक असला तरी एलिमिनेटरमध्ये एक रंगतदार लढत अपेक्षित आहे.

बंगळूरु आणि कोलकाताच्या इथवरच्या वाटचालीमध्ये डोमेस्टिक क्रिकेटपटूंचा मोठा वाटा आहे. बंगळूरूकडे कर्णधार विराट कोहलीसह एबी डेविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल असले तरी आघाडी फळीतील देवदत्त पडिक्कलने फलंदाजी उंचावण्यात मोठे योगदान आहे. गेल्या चार सामन्यांत मॅक्सवेलला सूर गवसला. शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्ध यष्टिरक्षक, फलंदाज श्रीकर भरतने अफलातून बॅटिंग केली. गोलंदाजीतही मध्यमगती हर्षल पटेल तसेच लेगस्पिनर युझवेंद्र चहलने सातत्य राखले आहे. कोलकात्याला शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठीने फलंदाजीमध्ये तारले आहे. मात्र, कर्णधार मॉर्गन तसेच माजी कर्णधार दिनेश कार्तिकचा बॅडपॅच चिंतेचे कारण आहे. वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसन तसेच प्रसिध कृष्णाने गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. मात्र, अन्य गोलंदाजांकडून त्यांना चांगली साथ अपेक्षित आहे.

एलिमिनेटरमधील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने प्रत्येक प्रमुख क्रिकेटपटूंची कामगिरी निर्णायक ठरेल.

वेळ : सायं. ७.३० वा.

 

ऑर्केस्ट्रा कलाकारांना कोरोनाचा फटका

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सलग दुसऱ्या वर्षी नवरात्रोत्सवात गरब्यावर बंदी असल्याने त्याचा फटका ऑर्केस्ट्रा कलाकारांना बसला आहे. आम्ही पोट कसे भरायचे? असा सवाल हे कलाकार करत आहेत. गरब्यावर बंदी आणल्याने गरबा रसिकांचा हिरमोड झाला आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवात गरबा मोठ्या प्रमाणात होतो. गरब्यादरम्यान ऑर्केस्ट्रा कलाकारांना सुगीचे दिवस असतात. नऊ दिवस विविध ठिकाणी ऑर्केस्ट्रादरम्यान या कलाकारांना कामे मिळतात. मात्र गत वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे गरब्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही जगायचे कसे? असा सवाल हे कलावंत करत आहेत. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे एका वेबसाईटने म्हटले आहे.

राज्य सरकारने गरब्यावर बंदी घातल्याने दांडियाप्रेमींसह वस्त्र पुरवणारे व्यावसायिक, विद्युत रोषणाई, डीजे वाद्यवृंद, कलावंत, गायक, गरबा नृत्य प्रशिक्षकांमध्ये नाराजी आहे.

कोरोना महामारीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यभरातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत आम्ही जगायचे कसे? असा सवाल कलावंत करत आहेत. नवरात्र उत्सव सुरू आहे. या दिवसांमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांना खूप मागणी असते. मात्र, यंदा राज्य सरकारने गरब्याला परवानगी न दिल्यामुळे या कलाकारांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आलेली आहे.

राज्यात साडेआठ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शनिवारी दिवसभरात सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-१९ लस देण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रविवारी दिली.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘मिशन कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, शनिवारी दिवसभरात ६ हजार ४७ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ६३५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ८ कोटी ७२ लाख ९३ हजार ८४४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९९ हजार ७१ लस देण्यात आली. त्यापाठोपाठ ठाणे (९०,१३९) आणि मुंबईमध्ये (८८,९९१) लस देण्यात आल्या.

शहरात लसीकरणाबाबत काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील महानगरपालिका आयुक्तांकडून नियोजन केले जात आहे. शहरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी डॉ. व्यास विशेष आढावा घेत आहेत.

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्वाचे : राज्यपाल

मुंबई (प्रतिनिधी) : केवळ शारीरिक आरोग्य उत्तम असणे पुरेसे नाही. मानसिक आरोग्य तितकेच, किंबहुना अधिक महत्त्वाचे आहे. कोरोना काळात अनेक लोकांना शारीरिक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचा देखील सामना करावा लागला. कोरोना आला आणि जाईल देखील, परंतु मानसिक आरोग्य जपणे आवश्यक असून डॉक्टरांनी रुग्णांना आत्मविश्वास व नवी उमेद देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवारी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ व डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोढा फाऊंडेशन व लोढा लग्झरीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयरा लोढा या मुलीने मानसिक आरोग्य या विषयावर तयार केलेले ‘व्हाट आर यू वेटिंग फॉर’ हे गीत सादर केले.

राज्यपालांच्या हस्ते मानसोपचार तज्ज्ञ डॉ. झिराक मार्कर, डॉ. झरीर उदवाडीया, डॉ. शशांक जोशी, डॉ. मुझफ्फल लकडावाला, डॉ. चेतन भट, डॉ. अब्दुल अन्सारी, डॉ. गौतम भन्साळी, डॉ. पंकज पारेख, डॉ. मनोज मश्रू, डॉ. अंजली छाब्रिया, डॉ. मिलिंद कीर्तने यांसह ४० डॉक्टर्स व तज्ज्ञांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

लसीकरणात नवी मुंबईची आघाडी

नवी मुंबई (वार्ताहर) : कोरोनाला हरवायचे असेल आणि संभाव्य लाटेला थांबवायचे असेल, तर लसीकरणावर भर देऊन, नागरिकांना संरक्षित करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आता शहरात शंभराहून अधिक लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पहिली आणि दुसरी मात्रा दिली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ५० टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली असून ९७ टक्के नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.

लसीकरणाच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेला शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. कोरोनापासून संरक्षित होण्यासाठी सुरक्षा नियम पाळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लसीकरण करून स्वतःला संरक्षित करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

त्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून नवी मुंबईत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत महापालिकेने हा टप्पा गाठला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबरपर्यंत १६ लाख १६ हजार ११३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ९७ टक्के आहे. दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. यावरून लसीकरणात महापालिका पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.