विक्रमगड : तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वारा व विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून परतीच्या पावसाने शेतात कापलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या विक्रमगड तालुक्यातील शीळ, ओंदे, आपटी, झडपोली, केव, म्हसरोळी, मलवाडा, दादडे, साखरे, कऱ्हे-तलावली, तलवाडा व विविध भागांतील भातशेती कापणीसाठी तयार झाली असून भात कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतामध्ये ठेवले आहे. दिवाळीपूर्वी पिवळे सोने घरच्या अंगणात किंवा खळ्यावर नेऊन ठेवण्याचे स्वप्न बळीराजाने बघितले होते. मात्र, अचानक आलेल्या परतीच्या पावसाने कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली होती. परतीच्या पावसाने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.
या पावसाने तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हा पावसाने हिरावून घेतला आहे. परतीचा पाऊस आणखी दोन ते तीन दिवसांत थांबला नाही तर कापलेले भातपीक खराब होऊन वर्षभराची मेहनत पाण्यात जाण्याची चिन्हे असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या वर्षी परतीच्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील कापणीसाठी तयार झालेल्या भातपीक खाली पडल्याने भातपिकांची धूळधाण झाली आहे.वर्षभराच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. – प्रमोद विश्वनाथ पाटील, शेतकरी, आपटी
डोंबिवली : लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. डोंबिवलीत मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाआघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते बंदमध्ये फ्रंटफुटवर येऊन बंद यशस्वी करण्यासाठी पुढे आले. मात्र महाआघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या दरम्यान दिसून आले नाहीत. यामुळे शिवसेनेचा बंदमध्ये सहभाग यावर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याची चर्चा डोंबिबलीत होती.
डोंबिवली पश्चिम येथील स्थानक परिसरात आणि मासळीबाजार दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, लाल बावटा, रिपब्लिकन सेना तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहभागी होत नारेबाजी केली. जे नागरिक कामासाठी जात होते त्यांना बंदची आठवण करून दिली जात होती. दुकानदारांस दुकाने बंद करा, असेही सांगितले जात असल्याचे समजते.
महाराष्ट्र बंद म्हणून मुंबईला जाणारा चाकरमानी घरातून बाहेर पडताना रिक्षा मिळेल का, या विचारात होता; परंतु सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा चालकांची गर्दी दिसून आल्याने चाकरमान्यांना हायसे वाटले आणि चाकरमानी सुखरूप रेल्वे स्थानकात पोहोचला. पश्चिमकडील जुनी डोंबिवली, देवीचा पाडा, महाराष्ट्र नगर, राजूनगर, गरिबाचा वाडा, कोपरगाव तर पूर्वेकडील आयरे, गांधीनगर, निवासी विभाग, स्टार कॉलनी, पाथर्ली, मानपाडा, सुनीलनगर आदी ठिकाणी रिक्षा धावत होत्या. तर निवासी आणि लोढा विभागात पालिका परिवहन सेवा व्यवस्थित सुरू होती, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
भिवंडीत संमिश्र प्रतिसाद
भिवंडी : लखीमपूर शेतकरी हत्याकांडाविरोधात महाराष्ट्र बंदमध्ये भिवंडी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोठेही दुकाने बंद करण्याबाबत कार्यकर्त्यांकडून जबरदस्ती करण्यात आली नाही, तर पोलिसांनी ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार महाराष्ट्र बंद दरम्यान घडला नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.
उल्हासनगरात अल्प प्रतिसाद
सोनू शिंदे
उल्हासनगर : लाखीमपूर हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; परंतु या बंदला उल्हासनगर शहरात अल्प प्रतिसाद मिळाला.
उल्हासनगर शहरात काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं; परंतु उल्हासनगर शहरात बंदला अल्प प्रतिसाद दिसून आला.
कोरोनामुळे गेले दीड-दोन वर्षं व्यापारी वर्ग मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत सुरू झाले आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांना हा महाराष्ट्र बंद परवडणारा नाही, अशी माहिती भाजपच्या आमदारांनी दिली. बंदच्या विरोधात भाजप आमदार कुमार आयलानीसह अनेक नगरसेवक रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी आवाहन करताना दिसत होते. यावेळी भाजप आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष जमनू पुरासवणी, नगरसेवक राजेश वधारिया, प्रदीप रामचंदांनी, अमित वाधवा, मनीष हिंगोराणी, समाजसेवक मनोज साधनांनी आणि कपिल अडसूळ हे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते.
मीरा-भाईंदरमध्ये फज्जा
भाईंदर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा फज्जा उडाला. यावेळी भाईंदरमध्ये सकाळपासून शहरातील व्यापारी, दुकानदार यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. रिक्षा, बस, खासगी वाहने यांची वर्दळ होती. शहरात सर्व काही सुरू असताना दिसून आले.
पोलिसांनी जागोजागी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांनी दुचाकी, गाड्या घेऊन मिरवणुकीने दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते; परंतु तो ताफा थोडासा पुढे जाताच खाली केलेली शटर पुन्हा उघडून दुकाने सुरू करण्यात आली होती. कोरोनाने आधीच व्यापलेल्या व्यापाऱ्यांचा या बंदला कमी प्रतिसाद दिसून आला.
गोल्डन नेस्ट चौकात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कोविडच्या काळात मनाई असताना देखील मोर्चा व बाईक रॅली काढल्याबद्दल नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले. तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष श्रीनिवास निकम यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर बसून आंदोलन केले.
आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
कल्याण : लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात कल्याण पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्याण पूर्व मध्यवर्ती कार्यालयापासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मनोज नायर, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष अर्जुन नायर, सारिका गायकवाड, मीनाक्षी आहेर आदींसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोलंबो (वृत्तसंस्था) : आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठीच्या श्रीलंका संघात चार बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त असलेल्या लहिरू मदुशंका आणि नुवान प्रदीप यांच्यासोबत प्रवीण जयाविक्रमा आणि कामिंदु मेंडिस यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पथुम निसंका, अकिला धनंजय, लहिरू कुमारा आणि बिनुरा फर्नांडो यांना संधी मिळाली आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकन निवड समितीने सोमवारी १५ खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी जाहीर केली. अकिला हा श्रीलंकेच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय संघात खेळला आहे. गोलंदाजीच्या अॅक्शनमध्ये बदल केल्यानंतर त्याच्या कामगिरीवर फरक पडला आहे. मागील नऊ टी-ट्वेन्टी सामन्यात त्याने फक्त ६ विकेट बाद केले आहेत. मात्र त्याचा अनुभव पाहता त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, कामिंदु मेंडिसला संघात स्थान मिळालेलं नाही. त्याच्याऐवजी पथुम निसंकाला संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज मदुशंका आणि प्रदीप यांचा दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे.
टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत स्थान मिळवण्यासाठी श्रीलंका संघाला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. १८ ऑक्टोबरला नामिबिया संघाविरुद्ध पात्रता फेरीच्या पहिला सामना होणार आहे. त्यानंतर २० आणि २२ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे आयर्लंड आणि नेदरलँडविरुद्ध सामने होतील.
सोलापूर : नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि उजनी धरण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून सोडण्यात येत असलेले ४० हजार क्युसेक पाणी यामुळे पंढरपूरमधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी. तसेच संभाव्य पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
उजनीचा विसर्ग सायंकाळी चाळीस हजार क्युसेक होता; तर वीरमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया दुपारी बंद करण्यात आली आहे. भीमा सोलापूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहत असून नृसिंहपूर येथे ४९ हजार क्युसेकचा विसर्ग मिळत होता. तर पंढरीत नदी तीस हजार क्युसेकहून अधिकने वाहात होती. त्यामुळे जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
संभाव्य आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावनिहाय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रत्येक गावची लोकसंख्या, शाळा-कॉलेज, मंगल कार्यालय, रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी दवाखाने, आरोग्य केंद्रे, जनावरांचे दवाखाने, सेवाभावी संस्था, पोहणाऱ्या व्यक्ती, औषध दुकाने यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. धान्य वितरण व गॅस वितरण व्यवस्थेबाबत नियोजन करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाकडून नदीकाठचे वीज वाहक खांब तसेच रोहित्र सुरक्षित स्थळी लावण्यात आले आहे. औषधसाठा मुबलक उपलब्ध राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.
चंद्रभागा नदी पात्रात येणाऱ्या वारकरी व भाविकांना नगरपालिका प्रशासनाकडून ध्वनीक्षेपकाव्दारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. पूरपस्थितीत बोट व्यवस्था, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, तसेच स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांची पथके तयार करण्यात आली आहेत. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही गुरव यांनी केले आहे.
वाडा (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यासह मंत्री भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यावरून प्रवास करत होते. मात्र, प्रचारात कुठेही रस्त्यांची कामे मार्गी लावतोय, असे भाषणातून ऐकायला मिळाले नाही. दरम्यान, आता निवडून आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीकडून वाड्यातील विकासाची कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.
अनेक प्रश्नांपैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली चाळण. आजवर शेकडो आंदोलने झाली. रास्तारोको, बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करणे झाले. निवेदने दिली, मात्र प्रतिसाद देईल ते कसले बांधकाम खाते, असा आरोप स्थानिक करत आहेत. दुसरीकडे, आजवर केवळ या रस्त्याच्या दुरूस्तीवर हजारो कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, सदर रस्ता खड्ड्यातच आहे. मग हा दुरूस्तीवरचा पैसा नेमकी कुठे जात आहे, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
वाड्यात रस्ते, पाणी या प्रश्नांबरोबर बेरोजगारी हा प्रश्न भेडसावत आहे. कारखाने आले, मात्र त्यांना पाणी, रस्ते आणि वीज पुरेशा प्रमाणात मिळत नाही. स्थानिक युनियनमुळे कंपन्या बंद अथवा स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, नाका परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण वाढत असून वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, पण यांना पोलिसांची भीती वाटत नाही, की ग्रामपंचायत कारवाई करत नाही. असे अनेक प्रश्न आहेत आता नव्यानेच निवडून आलेल्या सदस्यांनी या प्रश्नांवर विचार करून योग्य ती कारवाई करावी व या समस्या सोडवाव्यात याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाणे (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकरी, व्यापारी, किरकोळ वस्तूंचे विक्रेते आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर का सोडले, असा सवाल भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे, ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोपही डावखरे यांनी केला आहे.
वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर अशा संकटात महाराष्ट्रातील शेतकरी व जनता त्रस्त असताना, केवळ मदतीच्या कोरड्या आश्वासनांपलीकडे सरकारने काहीही दिलेले नाही. गेल्या वर्षीच्या निसर्ग आणि या वर्षीच्या तोक्ते वादळात नुकसान झालेल्यांना सरकारने जाहीर केलेली मदतही अजून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेली जनता अजूनही मदतीची वाट पाहत आहे.
शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहत आहे आणि ठाकरे सरकार उत्तर प्रदेशातील घटनांची काळजी दाखवत आहे. लखीमपूर खेरीमध्ये काय झाले, त्यावर काय कारवाई करायची, ते पाहण्यास उत्तर प्रदेश सरकार सक्षम आहे. ही घटना दुर्दैवी आहे, पण महाराष्ट्रात रोज शेतकऱ्याचे मरण ओढवत असताना त्यावर मात्र ठाकरे सरकार चकार शब्द बोलत नाही. ठाण्यातील व्यापाऱ्यांना एका दमडीचीही राज्य सरकारने मदत केली नाही. सतत निर्बंध लादण्यात आले. अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारला व्यापाऱ्यांपेक्षा लखीमपूर खेरीवर जास्त रस आहे. मंत्रिमंडळात मात्र लखीमपूर घटनेवर राजकारण केले जाते, हा केवळ राजकीय स्टंट आहे. ज्यातील संकटग्रस्तांना वेठीस धरू नका, असा इशाराही डावखरे यांनी दिला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनाग्रस्तांना श्रद्धांजली वाहणाऱ्या ठाकरे सरकारला महाराष्ट्रातील संकटांमध्ये मृत्यू पावलेले शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनता आठवली नाही का, त्यांच्यासाठी श्रद्धांजलीचे दोन शब्द सरकारने मंत्रिमंडळात का काढले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. अगोदरच कोरोनाकाळात कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रात बंद पुकारून जनतेच्या हलाखीत या राजकारणामुळे भर पडणार आहे, असेही आमदार डावखरे म्हणाले.
सरकारी यंत्रणांचा बंदसाठी वापर
महाविकास आघाडी सरकारने सरकारी यंत्रणेचा बिनदिक्कतपणे बंदसाठी वापर केला. पोलिसांकडून व्यापारी संघटनांना फोन करून दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले. तर एमआयडीसीकडून उद्योग बंद ठेवण्याचे आदेश दिले जात होते. `टीएमटीची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. सामान्य जनतेचे हालाकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.
कल्याण : नवरात्र उत्सव म्हटला की, सर्वत्र डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावलं. दांडियाच्या रासक्रीडेत रममान होऊन तल्लीन झालेली जनता असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात जरिमरी मित्रमंडळाच्या नवरात्र उत्सवात गेल्या २८ वर्षांपासून घुमतोय फक्त टाळ मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष.
नुकतीच घटस्थापना झाली असून, नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधूम सर्व भारतभर सुरू रहाणार आहे. डीजेच्या तालावर ठेका धरून नाचणाऱ्या तरुणाईसह, लहानांपासून अबाल वृद्धांपासून सर्वच गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत नाचताना दिसून येतात; परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात मात्र गेल्या २८ वर्षांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळते. येथील जरिमरी मित्रमंडळात नवरात्र उत्सवात मात्र दांडिया ऐवजी टाळ मृदंगाचा आवाज घुमत असून हरिनामाचा जयघोष येथे सुरू आहे.
येथे रोज भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यंदा देखील त्याच उत्साहात हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व व्याख्यानकारांचे कार्यक्रम नऊ दिवस या ठिकाणी संपन्न होत असतात. रोज अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात. कल्याण तालुक्यातील नवरात्र उत्सवात हरिनामाचा जयघोष करणारे जरीमरी मित्र मंडळ, फळेगाव म्हणून जिल्हात ओळखले जात आहे.
या मंडळाची एक विशेष बाब प्रकर्षाने दिसून येते की, यांचे सर्व कार्यकर्ते हे तरुण आहेत. असे असून देखील या ठिकाणी दांडियाऐवजी धार्मिक कार्यक्रम राबवित आहेत. महाराष्ट्रातील नामांवत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने या ठिकाणी रोज होत असतात. यंदा देखील फळेगावातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस टाळ-मृदंगाचा नाद घुमणार असून हरिनामाचा जयघोष सुरू आहे.
आम्हाला आमच्या तरुण मुलांचा अभिमान आहे. गेल्या २८ वर्षांपासून आमची मुलं हा कार्यक्रम अविरतपणे राबवित आहेत. अशाच प्रकारे हा कार्यक्रम अखंड तेवत राहणार आहे. आम्ही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहोत. असे मत मंडळाचे जेष्ठ सल्लागार कमलाकर महाराज व कृष्णा महाराज जाधव यांनी व्यक्त केले.
मुंबई (प्रतिनिधी) : टेस्टली जीएसटीए एस २०० आयटीएफ मुंबई २०२१ टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत आदित्य खन्ना, नितीन कीर्तने आणि मयूर वसंत यांनी दुहेरी मुकुट पटकावला. निखिल रावचे हे पहिले आयटीएफ जेतेपद पटकावले.
एल अँड टी म्युच्युअल फंडच्या सहकार्याने प्रॅक्टेनिस (अंधेरी, पश्चिम) येथे झालेल्या स्पर्धेत दुहेरीत ३५ वर्षांवरील गटात आदित्यने त्याचा सहकारी विपिन सिरपॉलसह अजाज सेल्वराज आणि रेवंत दत्ता जोडीवर ट्रायब्रेकरमध्ये विजय मिळवला. ४० वर्षांवरील गटात कीर्तनेने निखिल रावसह मुर्ती आणि भाटिया जोडीवर ६-१, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. ५० वर्षांवरील गटात भूषण अकुत आणि निशित पांडे तसेच ६० वर्षांवरील गटात मयूर वसंत आणि राकेश कोहली जोडीने बाजी मारली.
एकेरीत ३५ वर्षांवरील अव्वल मानांकित आदित्यला संदीप पवारकडून पहिल्या सेटमध्ये थोडी चुरस लाभली. मात्र, ६-३, ६-० असा विजय मिळवला. ४० वर्षांवरील गटात पाचवा मानांकित नितीन कीर्तनेने एन. चौधरीला ६-१, ६-१ अशा फरकाने हरवले. ५० वर्षांवरील गटात नीलकांत डमरे, ६० वर्षांवरील माणेक एम., ७० वर्षांवरील गटात जी. कुमार विजेते ठरले.
महिला एकेरित डॉ. ज्योत्स्ना पटेल अजिंक्य
महिला एकेरीत डॉ. ज्योत्स्ना पटेल अजिंक्य ठरल्या. त्यांनी अंतिम फेरीत नाझनीन रहमानवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. दुहेरीत नाझनीन रहमानने प्रियंका मेहतासह ज्योत्स्ना पटेल आणि नेहा शाहवर ६-२, ६-४ अशी मात केली.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी प्रकरणाचे निमित्त घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत महाराष्ट्र बंदचा पुरता फज्जा उडाला. अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदार व व्यावसायिकांना दमदाटी करून दुकाने बंद पाडली. त्यानंतर पोलिसांची भर पडली. अनेक ठिकाणी राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठिय्या मांडून बंदचा आग्रह धरताना दिसले.
सोमवारी सकाळपासूनच मुंबईसह अनेक शहरांमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी बंद पाळण्यासाठी भाग पाडले. ठाण्यात तर शिवसैनिकांनी एका रिक्षाचालकालाही बेदम मारहाण केली. मुंबईत मालवणी परिसरात काही ठिकाणी बेस्टच्या बसवर दगडफेक झाली. त्यानंतर पोलीस संरक्षण देत असतील तरच आपण बसगाड्या चालवू, असा इशारा देत बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले.
राज्यात अनेक ठिकाणी शाळांना सुट्टीच जाहीर करण्यात आली. तशी सुट्टी जाहीर करावी म्हणून शाळांना सरकारकडून अघोषित आदेश दिले गेले होते, असे कळते. पोलीस बळाचाही तुफान वापर बंद यशस्वी करण्याच्या प्रयत्नात केला गेला.
ठाण्यात शिवसैनिकांच्या हाती काठ्या, उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण
लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सोमवारच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान ठाण्यात शिवसेनेची दादागिरी पाहायला मिळाली.
बंद यशस्वी करण्यासाठी सेना-राष्ट्रवादी उतरली. रस्त्यावर बाजारपेठेत एकत्र फिरून दुकाने बंद केली. मात्र रिक्षाचालक प्रतिसाद देत नसल्याने टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रम भागात उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे कार्यकर्त्यांसह स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र बंद करण्यासाठी ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर जांभळी नाका ते स्टेशन परिसर, नौपाडा या भागात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद केली. तसेच रिक्षा चालकांना चोप देऊन रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे यामध्ये पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना गाडीत टाकले आणि त्यांना मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना देखील पोलिसांनी चित्रीकरण करण्यासाठी मज्जाव केला. एकूणच या बंदमध्ये सहभागी झालेल्या मोठे पदाधिकारी बाजूला राहिले असून अन्य पदाधिकाऱ्यांना मात्र पोलिसांकडून चोप मिळाला.
‘सत्ताधारी रस्त्यावर येऊन दादागिरीने रिक्षा व दुकाने बंद करतात, ही अत्यंत चुकीची पद्धत आहेत. शाखाप्रमुख, उपमहापौरांचे पती हे दादागिरीने रिक्षाचालकांवर काठी मारुन त्यांच्या काचा फोडतात. दुकानांचे शटर बंद करतात, हा कुठला कायदा? कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी पाळायची आहे. त्यांनीच कायदा हातात घेतला आहे, हे निषेधार्ह आहे, असे मत भाजपचे ठाण्यातील गटनेते मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.
टीएमटी बंद असल्याने रिक्षासाठी मोठ्या रांगा
बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेची (टीएमटी) बस सेवा बंद होती. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिक रिक्षाचा पर्याय वापरत होते. बसेस नसल्याने कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी सकाळपासूनच रिक्षासाठी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मुंबईत अज्ञात व्यक्तींकडून आठ बेस्ट बसवर दगडफेक
महाराष्ट्र बंददरम्यान अज्ञात व्यक्तींनी सोमवारी मध्यरात्री दगडफेक करून आठ बेस्ट बसेसचे नुकसान केलं आहे. त्यानंतर पोलीस संरक्षणाने मुंबईत बस चालवण्याची योजना हाती घेण्यात आली.
बेस्टच्या धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनऑर्बिट मालाड या परिसरातील बसेसची तोडफोड झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून ही तोडफोड झाल्याचे कळते. एकुण सात ठिकाणी बेस्ट बसेसचे नुकसान झाल्याची माहिती बेस्ट जनता संपर्क विभागाचे मनोज वऱ्हाडे यांनी दिली आहे.
काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
… हा तर सरकारी दहशतवाद : फडणवीस
आज महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते आहे. लखीमपूरसाठी बंद आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत नाही. राज्यात २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. ना कर्जमाफी, ना कोणती मदत. आजचा सारा प्रकार म्हणजे सरकारपुरस्कृत दहशतवाद आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या नेत्यांना शेतकऱ्यांची खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. सरकारने अनेक योजना बंद केल्या. अनेक योजनांना स्थगिती दिली. गेले दीड वर्षे बंदच पाळला. पण, आताकुठे थोडे उघडले, तर पुन्हा बंद. हे अख्खे सरकारच ‘बंद सरकार’ आहे.
आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात, तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले. आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलीसही बघ्याची भूमिका घेतात. तमाशा पाहतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे. मंत्रिमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होते आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी बंद, चंद्रकांत पाटील यांची टीका
राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम बंद घोषणा केली. नेहेमीप्रमाणे आघाडीतील इतर सर्वांना फरफटत जावे लागले. शिवसेनेलाही सत्ता टिकविण्यासाठी पवारांचे ऐकावे लागले, असा टोला त्यांनी हाणला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपाची व्यापार आघाडी न्यायालयात गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबारावेळी कुठे होतात? : दरेकर
गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? मावळला ज्यावेळी भयानक क्रूर पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून गोळीबार शेतकऱ्यांवर केला, त्यावेळा आपल्या संवेदना भावना कुठं होत्या? पालघरला साधुंचं हत्याकांड झालं, त्यावेळी दोन शब्दांचा आपण त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला नाही, संप केला नाही, त्यावेळी आपल्या संवेदना कुठं होत्या, असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
पांढरा रंग : पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढरा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंदमाताची पूजा करावी.
मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे. तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे [email protected] आणि [email protected] या ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.
कन्झ्यूमर फॅसिलिटेशन सेंटर, भांडूप ॲन्टॉप हिल आरोग्य सेविका आम्ही साऱ्या सखी (भांडुप-पूर्व) एमएसईडीसीएल वागले इस्टेट, ठाणे एमकेट्टे ऍनालिस्टिक एलटीडी, ठाणे क्लाऊडनाईन हॉस्पीटल, नवीमुंबई घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कर्मचारी ब्रीज कँडी हॉस्पीटल, फूड अँड बेवरेज टीम भक्ती सागर को.आँप.हौ भविष्य निर्वाह निधी भवन, बांद्रा-पूर्व भिवंडी मनपा शाळा महेंद्र गुरव आणि मित्रमंडळ, नालासोपारा मेहता अँड मेहता मंगलम प्लेसमेंट रेडिक्स, अंधेरी लिलावती हॉस्पीटल