बोईसर (वार्ताहर) : केंद्र सरकारतर्फे प्लास्टिक बंदीसाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सदर प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र पालघर ग्रामीणमध्ये या निर्णयाला हरताल फासण्यात येत आहे. येथील बोईसर, सरावली, खैरापाडा, पस्थळ या चार प्रमुख ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये ग्रामपंच्यात च्या दुर्लक्षामुळे प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत आहे. या चार ग्रामपंचायत क्षेत्रात प्लास्टिक वापरण्यास बंदी असलेल्या हलक्या प्लास्टिक पिशव्याचा वापर सर्रास रोज सुरू आहे. किराणा मालाची दुकाने, बेकरी, जनरल स्टोअर्स, भाजीपाला, दुकाने व घराघरातून प्लॉस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायत मधील डम्पिंग ग्राउंड वर जमा होत असताना याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे.
शहरातील खाद्यपदार्थ आणि फळविक्रेते त्याचबरोबर मटण आणि चिकन शॉपवरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. या ग्रामपंचायत हद्दीमध्ये व्यापारी दुकानांची संख्याही अधिक आहे. बोईसर, सरावली, खैरपाडा क्षेत्रात बाजारपेठा विकसित झाल्याने या ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिक वापर आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चार ग्रामपंचायतींच्या अखत्यारित असलेल्या बाजारपेठ परिसरामध्ये कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. कडक निर्बंध लादण्यासाठी ग्रामपंचायतीचे हात तोकडे पडत असल्याने बंदी असतानाही सिंगल यूज प्लास्टिक वापरले जात आहे.
या चार ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिकचा वापर होत असताना, ग्रामपंचायत आधिकारी वर्ग प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यास टाळाटाळा करत असल्याने शहरातील बहुतांश दुकाने प्लॉस्टिकचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. ग्रामपंचायत घंटागाडीच्या माध्यमातून जो कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये पडतो, त्यात सर्वाधिक प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याची बाब लक्षात येत आल्याने प्लास्टिक वापरास बंदी असली तरी प्लॅस्टिकचा संचय होतो कोठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे.