सुप्रिया सुळेंच्या टीकेला गिरीश महाजन यांचं चोख प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय; ठाकरेंनाही लगावला टोला
मुंबई : बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील (Mumbai) घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. गोळीबार प्रकरणावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. आता सुप्रिया सुळेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे यांना उद्देशून गिरीश महाजन म्हणाले, ‘या घटनेवरून काही जण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत. आपल्या सरकारच्या काळात तर गृह खात्याचा सर्रास लिलाव सुरू होता. त्यामुळे दीड वर्ष तुमच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा थेट हल्लाबोल गिरीश महाजन यांनी सुप्रिया सुळेंवर केला.
उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना नकली आहे. मात्र याचा राग येऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत जे आक्षेपार्ह विधान केले यावरून उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यावरून राजकारणाचा स्तर किती खाली चालला असून आज जर ही उद्धव ठाकरेंची परिस्थिती असेल तर उद्या निकाल लागल्यावर काय होईल असा चिमटाही गिरीश महाजन यांनी काढला आहे.
दरम्यान, सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नसून या घटनेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री हे स्वतः लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.