कोणाला मिळणार संधी आणि कोणाचा होणार पत्ता कट?
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्यात भाजप मिशन ४५ च्या (BJP Mission 45) दृष्टीने रणनीती आखत आहे. भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याच दृष्टिकोनातून भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात ज्या मतदारसंघांवर भाजपचा विशेष डोळा आहे, त्या ठिकाणी भाजपच्या लोकप्रिय चेहर्यांना संधी मिण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपकडून काही जणांची नावे चर्चेत आहेत व ती नावे आता समोर आली आहेत.
मिशन ४५ साठी चंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार, जळगावच्या रावेरमधून गिरीश महाजन, वर्धामधून चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर किंवा रविंद्र चव्हाण, दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर, अकोल्यातून आकाश फुंडकर तर मुंबईतून विनोद तावडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर लोकसभेची उमेदवारी ठरणार आहे.
अलीकडेच मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत ३ केंद्रीय मंत्री, ४ खासदारांना आमदारकीचे तिकीट भाजपाने दिले. याच धर्तीवर जिंकून येण्याची क्षमता हा निकष ठेवून भाजपा उमेदवारी देणार आहे. इतकेच नाही सध्या मित्रपक्ष असलेल्या खासदारांच्या मतदारसंघातही भाजपाने उमेदवारासाठी चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेसाठी भाजपाने सर्व्हेक्षण केले. त्यात प्रचाराची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असतील. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या मतदारसंघात गुंतवणूक ठेवले जाणार नाही.
खासदारांच्या जागी येणार नवे चेहरे
मागील काही दिवसांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महाराष्ट्र दौरे करुन या ठिकाणच्या खासदारांचा आढावा घेतला होता. यातील सुमार कामगिरी करणार्या खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्या जागी भाजप नव्या चेहर्यांना संधी देऊ शकते. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा बदल करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांतच यावर चर्चा होऊन त्या नावांची यादी समोर येणार आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra