मुंबई : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याच्या मुद्द्यावरुन आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी चांगलेच सुनावले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर आम्ही पोटनिवडणुकीत त्यांचा मतदारसंघ जिंकू, असे आशिष शेलार यांनी डिवचले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Molestation : विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा
यावेळी आशिष शेलार यांनी आव्हाड यांच्यावर टीकेची तोफ डागली. जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणे आणि त्यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा यांचा काय संबंध आहे. जितेंद्र आव्हाड निर्दोष असतील तर त्यांनी कायदेशीरपणे आपली बाजू लढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानात प्रत्येकाला निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा आहे. जेव्हा निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही तेव्हा असे वेडेचाळे केले जातात. आव्हाडांच्या राजीनाम्याचा आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा काहीही संबंध नाही. जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. आम्ही ती जागा जिंकू, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
Molestation : जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
तसेच जितेंद्र आव्हाडाच्या राजीनाम्यास पूर्णपणे गृहमंत्री जबाबदार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. यावर बोलताना शेलार म्हणाले की, होय हे खरे आहे, गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणसाला, मराठी कुटुंबाला त्यावर कोणी आरोप, प्रत्यारोप, जबरदस्ती, विनयभंग, दादागिरी आणि मारहाण करू नये. केल्यास त्याला कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवलं आहे. त्यासाठी गृहमंत्र्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतो, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.