ठाणे (प्रतिनिधी) : हवामानाच्या लहरीपणाचा फटका मिरचीच्या उत्पादनाला बसला असून तुटवडा निर्माण झाल्याने भाव प्रति क्विटल ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सध्या मिरचीच्या भावात ६० ते ७० टक्के दरवाढ झाली आहे. ऐन पीक हाती येण्याच्या काळातच अवकाळी पावसाने उत्पादन घटले. परिणामी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भाव वाढ झाली होती. त्यात पुन्हा वाढ झाली आहे. सततची इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी लावल्याने मोठी भाव वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्यांनी जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच वाढत्या महागाईचा फटका लाल मिरचीलाही बसला आहे.
वर्षभर साठवणीसाठी अनेकजण नोव्हेंबर, डिसेंबरपासून लाल मिरचीचा मसाला तयार करून ठेवतात. काहीजण प्रत्येक महिन्याला करतात. मात्र, सहा महिन्यातच मिरचीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. देशात आंध्रप्रदेशात सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक, मध्य प्रदेशात, तेलंगणा, कर्नाटकात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्याशिवाय आसाम आणि पश्चिम बंगाल, पंजाब राज्यांमध्ये उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात खानदेश, कोल्हापूर येथे उत्पादन घेतले जाते. हिरवी तिखट मिरची १२० ते १६० रुपये किलो दराने विक्रीस आहे.
गेल्या वर्षी मिरचीला चांगले भाव मिळाल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले. परिणामी, मिरचीचे भाव घसरले. त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस, वादळाने आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील मिरचीचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले. नोव्हेंबरपासून हंगामास सुरुवात होते. तेव्हापासून दरवाढीला सुरुवात झाली. नोव्हेंबरमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेशातून तर आंध्र प्रदेश तेलंगणातून डिसेंबरमध्ये मिरचीची बाजारात येते. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने मिरचीचा तुटवडा निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.