Saturday, August 29, 2026

Jalgaon News : ...'जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा' ! 'सगळं सांभाळून घे दीदी, मी जातो' भावनिक मेसेज अन् रक्षाबंधनाच्या दिवशीच तरुणाचं टोकाचं पाऊल

Jalgaon News : ...'जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा' ! 'सगळं सांभाळून घे दीदी, मी जातो' भावनिक मेसेज अन् रक्षाबंधनाच्या दिवशीच तरुणाचं टोकाचं पाऊल

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सर्वत्र रक्षाबांधन या भाऊ- बहिणीच्या सणाचा उत्साह असताना जळगावमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 'सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो' असा भावनिक मेसेज सोशल मीडियावर बहिणीला पाठवून एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. रोहित साहेबराव धनगर असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. (Jalgaon Crime News)

राखी बांधून आला अन्...

रोहित धनगर हा अकरावीत कला शाखेत शिक्षण घेत होता. शुक्रवारी रक्षाबंधनाचा मोठा उत्साह होता. हाच सण साजरा करण्यासाठी रोहित आपल्या वडिलांसोबत आत्याच्या घरी गेला होता. तिथे मोठ्या उत्साहात बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर तो वडिलांची दुचाकी घेऊन जुना आसोदा रोड परिसरातील स्वतःच्या घरी परतला. मात्र घरी आल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) बहिणीसोबतचा फोटो अपलोड करत 'हॅपी रक्षा बंधन ताई... सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो' असा भावनिक संदेश लिहिला. (Jalgaon Crime News)

...जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा

महत्त्वाचे म्हणजे रोहितने जीवनयात्रा संपवण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर आणखी एक भावनिक स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने लिहिले होते की, "अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा, जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा, ना मेरी आखे नम होगी ना दिल मे कोई गम लेके आऊंगा! शुक्रिया..." याशिवाय, ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याचे सांगणारा एक व्हिडिओ त्याने आपल्या मित्राला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात रोहितचे स्टेटस आणि हे मेसेज पहिल्यांनंतर त्याच्या मित्रांच्या पायाखालची वाळू सरकली.(Jalgaon Crime News)

मित्रांनी धाव घेतली, पण उशीर झाला होता

रोहितच्या मित्रांनी तातडीने त्याच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. रोहितने घरात गळफास घेतला होता. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात (Shanipeth Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रक्षाबंधनासारख्या आनंदाच्या दिवशीच ऐन उमेदीच्या मुलाने जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे तर घडलेल्या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >