- उच्च न्यायालयाचा सवाल; दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण, निकाल ठेवला राखून
मुंबई : बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती भोसले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान १४ व्या मजल्यावरून पडूनही मृतदेहावर अपेक्षित गंभीर जखमा का दिसत नाहीत, असा कळीचा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणातील सर्व बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. ( Disha Salian death case)
सुनावणीदरम्यान सरकारी वकील शिशिर हिरे यांनी युक्तिवाद करताना दिशा सालियन हिच्या मृत्यूशी संबंधित पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि तपासातील तपशील न्यायालयासमोर मांडले. हॉस्पिटलमधील पंचनाम्यात मृतदेहावर कपडे नसल्याचा उल्लेख असल्याचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला असता, हा पंचनामा घटनास्थळावरील नसून हॉस्पिटलमधील असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. तसेच, दिशा उंचावरून पडताना तोंडावर पडल्यामुळे कवटीला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती त्यांनी दिली. मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचाराच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही सुरू असलेले आंदोलन हे काँग्रेसच्या ...
दिशाचे वडील सतीश सालियन यांचे पोलिसांनी पाच वेळा जबाब नोंदवले असून, जानेवारी २०२४ मधील जबाबात त्यांनी मुलीने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. तसेच, राजकीय नेते किंवा सेलिब्रिटींबाबत विचारले असता, ते प्रसिद्ध असल्यामुळे आपण त्यांना ओळखत असलो तरी ते दिशाच्या संपर्कात होते की नाही, याची माहिती नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले होते. दिशाचा प्रियकर रोहन राय याच्या जबाबानुसार, दिशा प्रचंड तणावाखाली होती आणि वडिलांसोबत वाद झाल्यानंतर ती त्याच्याकडे राहण्यासाठी आली होती. दारूचे सेवन केल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. ( Sushant Singh Rajput) आदित्य ठाकरेंच्या वकिलाचा युक्तिवाद
दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद करताना याचिकेच्या वैधतेवर आक्षेप घेतला. यापूर्वीही याच स्वरूपाची याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र दिशाच्या वडिलांनी त्यावेळी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती, असे त्यांनी निदर्शनास आणले. ऐकीव माहितीच्या आधारे गंभीर आरोप केले जात असून या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा दावा त्यांनी केला. दिशाच्या कुटुंबीयांबद्दल पूर्ण संवेदना व्यक्त करत, मृत मुलीवरून सुरू असलेले राजकारण आता थांबायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. ( Bombay High Court)





