Friday, August 28, 2026

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई

मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक (पश्चिम) परिसरातील २४ गाळ्यांवर कारवाई करून संपूर्ण परिसर पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या गाळेधारकांना पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, तसेच पदपथ मोकळा करण्यात यावा, अशाही सूचना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिल्या. तसेच दुसऱ्या टप्प्यात लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भट्टीपाडा जंक्शन येथील २६ गाळे आणि पेपरमिंट चाळ येथील २७ गाळ्यांवर कारवाई करून पदपथ पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे भांडुप,विक्रोळी,कांजूरमार्ग या एस विभागअंतर्गत एकूण १४ मार्गांवर २०.५० कि.मी. लांबीचे पदपथ चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग याठिकाणच्या स्थानक परिसरात २७ ऑगस्ट २०२६ रोजी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी भिडे यांनी निर्देश दिले.

सुगम्य पदपथ धोरणांतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रात ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. तसेच, कचरा साचण्याची संवेदनशील ठिकाणे निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने पूर्व उपनगरातील एन, एस व टी या विभागात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कार्यवाहीची महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गुरुवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सुमारे तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या या पाहणी दौऱ्यात भिडे यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. परवान्यात नमूद क्षेत्रफळाव्यतिरिक्त जागेवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड,उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर,उपायुक्त (परिमंडळ- ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त ( टी विभाग) योगिता कोल्हे, सहायक आयुक्त (एस विभाग) समरीन सय्यद, सहायक आयुक्त (एन विभाग) जयदीप मोरे आदी उपस्थित होते.

‘टी’ विभागातील एकूण मार्गांपैकी १३ मार्ग ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत हाती घेण्यात आले आहेत. या १३ मार्गांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत. मुलुंड पश्चिम परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याकामी प्राधान्य देण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील पदपथांची पाहणी केली. पदपथांशी संलग्न अशा विविध उपयोगिता वाहिन्यांच्या अनुषंगाने अभियांत्रिकी विभागाच्या मदतीने पदपथ चालण्यासाठी सोयीस्कर होतील, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. पदपथांची निवड करून त्याठिकाणी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही निर्देश आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.

भांडुप रेल्वेन स्थानक (पश्चिम) येथे 'बेस्ट' बसेसच्या नियमित वाहतुकीसाठी आणि रस्ते वाहतूकीच्या अनुषंगाने पदपथ व वाहतूक मार्ग नियोजनासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना आश्विनी भिडे यांनी दिल्या. भांडुप स्थानक (पश्चिम) परिसरात एकूण ९४ गाळेधारकांना पर्याय जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पदपथांवरील जागा उपलब्ध करून देत रेल्वे स्थानकापर्यंत पोहचण्यासाठीचा पदपथ सुलभपणे वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

'एन' विभागातील पंतनगर (घाटकोपर) येथील शिवाजी तंत्रशिक्षण शाळा परिसरातील पदपथांची आयुक्त आश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या परिसरातील पाच मार्गावरील पदपथांवरील अतिक्रमण निष्कासन करण्याची कार्यवाही नियोजित करण्यात आली आहे. त्या्चा आढावा भिडे यांनी घेतला. श्रद्धानंद मार्ग, झुनझुनवाला मार्ग, अंकुश गावडे मार्ग, हरिश्चंद्र देसाई मार्ग या पाच मार्गांतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या कार्यवाही अंतर्गत एकूण ३ कि.मी. लांबीचे पदपथ चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >