Wednesday, August 26, 2026

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या मैदानावरील आक्रमक वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्या मैदानावरील घटनांचा संदर्भ देत मांजरेकर यांनी थेट बीसीसीआय आणि आयसीसीला टॅग करत अशा प्रकारच्या गैरवर्तनावर वेळीच कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका मांडताना, युवा खेळाडूंना अशा प्रकारच्या वर्तनानंतर वारंवार मोकळीक दिल्यास त्यांना तेच वर्तन पुन्हा करण्याची सवय लागू शकते, असा इशारा दिला. हे भारतीय क्रिकेटसाठीच नव्हे, तर संबंधित खेळाडूंच्या भविष्यासाठीही योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणाचा संदर्भ :

भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामन्यात सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले होते. अवघ्या १५ वर्षांच्या वैभवच्या मैदानावरील या वर्तनाची त्यावेळी क्रिकेट वर्तुळात चर्चा झाली होती. याच घटनेचा संदर्भ देत मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा खेळाडूंना शिस्तीचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज व्यक्त केली आहे.

यशस्वी जयस्वालही वादात :

कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल ४५ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडोने आक्रमक सेलिब्रेशन केल्याने वातावरण तापले.

जयस्वालने (Yashasvi Jaiswal) पॅव्हेलियनकडे जाण्याऐवजी मागे वळून फर्नांडोकडे धाव घेतली. दोघांमध्ये झालेल्या चकमकीत जैस्वालच्या हेल्मेटचा भाग फर्नांडोच्या कपाळाला लागला. त्यानंतर धनंजय डी सिल्वाने हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. या घटनेनंतर आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर कारवाई केली. जैस्वाल आणि फर्नांडो यांना सामना मानधनाच्या २५ टक्के दंडासह प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला. (Sanjay Manjrekar)

मांजरेकर यांच्या मागणीनंतर चर्चेला उधाण :

मैदानावरील आक्रमकता ही क्रिकेटचा भाग असली तरी तिचे रूपांतर गैरवर्तन किंवा शारीरिक चकमकीत होऊ नये, अशी भूमिका मांजरेकर यांनी घेतली आहे. युवा खेळाडूंवर वेळीच शिस्तभंगाची कारवाई झाली नाही, तर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते, असा त्याचा सूर आहे. मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या या भूमिकेनंतर बीसीसीआय आणि आयसीसी या प्रकरणांकडे कशा पद्धतीने पाहतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >