Thursday, August 20, 2026

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; गारपिटीचीही शक्यता

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; गारपिटीचीही शक्यता

मुंबई : राज्यात सध्या काही भागांत पावसाची हजेरी सुरू असली, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बीड, परभणी, अहिल्यानगर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धाराशिव, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update)

दरम्यान, हरदोई आणि कर्नाल परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम काही भागांतील हवामानावर होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Weather Update)

१५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा :

हवामान विभागाच्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील सुमारे १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. डोंगराळ भागांत मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका असून, काही नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

नंदुरबारमध्ये धरणे अद्याप तहानलेली :

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा अद्याप झालेला नाही. अक्कलकुवा-वडफळे परिसरातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. नदी-नाल्यांना अद्याप मोठा प्रवाह आलेला नसल्याने धरणे भरण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. सध्या काही भागांतील पिकांना विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा आधार मिळत असला, तरी भूजलपातळी वाढण्यासाठी आणि आगामी सिंचनाची गरज भागवण्यासाठी पुरेशा पावसाची गरज आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात काही भागांत पाऊस सुरू असला, तरी अनेक ठिकाणी अद्याप दमदार सरींची प्रतीक्षा आहे. त्यामुळे खरीप हंगामासह धरणे आणि जलसाठे भरण्यासाठी शेतकरी आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (Maharashtra Weather Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >