नितीन नबीन यांच्याकडून नव्या 'टीम'ची घोषणा; महाराष्ट्राला मानाचे स्थान
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Naveen) यांनी सोमवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या नव्या रचनेत महाराष्ट्रातील नेत्यांना अत्यंत महत्त्वाची पदे देऊन राज्याचे स्थान अधिक बळकट करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार विनोद तावडे (Vinod Tawde) यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी पुनर्निवड करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची तर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.
मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात आलेल्या व्यावहारिक मराठी भाषेच्या ...
भाजपच्या नव्या केंद्रीय संघटनेत राष्ट्रीय उपाध्यक्षपदी एकूण १३ नेत्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा आणि डी. पुरंदेश्वरी यांच्यासोबत महाराष्ट्रातील डॉ. भारती प्रवीण पवार यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे यांच्यासह सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, डॉ. सतीश पूनिया आणि हरीश द्विवेदी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. बी. एल. संतोष यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद कायम ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय स्तरावरील या फेररचनेत पक्षाच्या आर्थिक व्यवहारांची धुरा पीयूष गोयल यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात गोयल यांचे मंत्रिपद अन्य नेत्याकडे दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्यासोबत राजस्थानचे राजेश मंगल हे राष्ट्रीय संयुक्त कोषाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय सोशल मीडिया विभागात महाराष्ट्रातील प्रीती गांधी यांची को-कन्व्हेनर (सह-संयोजक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
युवकांना अधिकाधिक संधी
- भाजपने आपल्या विविध मोर्चांच्या अध्यक्षांचीही नावे जाहीर केली आहेत. यात भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी गुजरातचे डॉ. हेमंग जोशी, महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी छत्तीसगडच्या रूप कुमारी चौधरी आणि ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे अमरपाल मौर्य यांची निवड झाली आहे. - किसान मोर्चाची जबाबदारी मध्य प्रदेशचे बन्सीलाल गुर्जर, एससी मोर्चाची बिहारचे शिवेश कुमार राम, एसटी मोर्चाची डॉ. मन्नालाल रावत आणि अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी उत्तर प्रदेशचे कुँवर बासित अली यांच्याकडे देण्यात आली आहे. - केंद्रीय कार्यालय प्रभारी म्हणून तरुण चुघ आणि मीडिया कन्व्हेनर म्हणून अनिल बलुनी काम पाहणार आहेत.





