मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विविध प्रकल्पांचे लोकार्पण, शुभारंभ आणि नामकरण करण्यात आले. यात सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड-टप्पा- 2चे लोकार्पण, मेट्रो मार्गिका 2-ब (टप्पा-1अ) अंतर्गत चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण, ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा रस्ता प्रकल्पातील अर्जुना TBM चे लॉन्चिंग आणि माजी मुख्यमंत्री 'बॅ. बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल'- बीकेसी कनेक्टरचे नामकरण करण्यात आले.
वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध लिंक रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. भारत नगर रोड ते अकोला जंक्शन एससीएलआरच्या दुसऱ्या टप्प्यामुळे बीकेसीकडे जाणारी वाहतूक अधिक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावरील उर्वरित वाहतूक कोंडीचे ठिकाण दूर करण्यासाठीही महापालिका आणि एमएमआरडीएने वेगाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी वातावरण भारावले पनवेल : भारताच्या ...
मुंबईतील मेट्रो नेटवर्कच्या विस्ताराबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर्षी 60 ते 70 किलोमीटर मेट्रो मार्गिका सुरू होण्याचा अंदाज आहे. मेट्रो आणि उपनगरीय रेल्वेचे एकत्रीकरण झाल्यानंतर सुमारे 90 लाख रेल्वे प्रवाशांसह अतिरिक्त 70 लाख प्रवाशांसाठी मेट्रोचे नेटवर्क उपलब्ध होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांना अधिक सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे 2027 पासून वातानुकूलित, स्वयंचलित आणि आधुनिक लोकल ट्रेनच्या निर्मितीलाही गती मिळणार आहे. नियोजनानुसार 2029 अखेर किंवा मार्च 2030 पर्यंत मुंबईच्या लोकल सेवेत आधुनिक गाड्या दाखल होतील.
ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पामुळे मुंबईच्या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे. ठाणे ते बोरिवली हे 23 किलोमीटरचे अंतर 11 किलोमीटरवर येणार असून, प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून अवघ्या 12 ते 15 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातील दुसऱ्या टीबीएम ‘अर्जुना’चे उदघाटन करण्यात आले असून, या दोन्ही बोगद्यांचे काम समांतरपणे सुरू होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील जी-ब्लॉक ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या एलिव्हेटेड कनेक्टरला राज्याचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांचे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान, मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेले निर्णय, छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठाची निर्मिती आणि गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसह राज्याच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योगदानाचे स्मरण म्हणून हा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






