Wednesday, August 12, 2026

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल
मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी केली आहे. जाणूनबुजून भेसळ करणाऱ्यांविरोधात ‘हत्येचा प्रयत्न’ केल्यासारखा गंभीर गुन्हा दाखल करावा, असे बेदी यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या व्हिडिओमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

राकेश बेदी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये अन्नपदार्थ, पेये आणि मद्यामध्ये होणाऱ्या कथित भेसळीवर चिंता व्यक्त केली. केवळ अधिक पैसे कमावण्यासाठी उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांमुळे असंख्य ग्राहकांचे आरोग्य आणि जीव धोक्यात येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

“लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही?” असा सवाल उपस्थित करत बेदी यांनी भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्याची गरज व्यक्त केली. एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक अन्न किंवा पेयामध्ये भेसळ करत असेल आणि त्यामुळे अनेक लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर अशा कृत्याकडे अत्यंत गंभीर गुन्हा म्हणून पाहिले पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

बेदी यांच्या मते, ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची आणि पेयांची गुणवत्ता ही केवळ व्यावसायिक बाब नसून थेट सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषय आहे. त्यामुळे आर्थिक फायद्यासाठी जाणूनबुजून भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Rakesh Bedi (@therakeshbedi)

दरम्यान, राकेश बेदी गेल्या काही काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सार्वजनिक विषयांवर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात बेदी यांची कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. ‘चश्मे बद्दूर’, ‘कुली नंबर 1’, ‘गदर 2’ आणि ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

टेलिव्हिजनवरील ‘श्रीमान श्रीमती’, ‘येस बॉस’, ‘भाबी जी घर पर हैं!’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधूनही ते घराघरात पोहोचले.

अलीकडे ‘धुरंधर’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळेही ते चर्चेत आले आहेत. आता भेसळीविरोधातील त्यांच्या या आक्रमक मागणीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >