Wednesday, August 12, 2026

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की धरती’, ‘कर चले हम फिदा’ यांसारखी अनेक गाणी आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागवतात. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीत देशभक्तीपर गाण्यांची परंपरा नेमकी कुठून सुरू झाली, याचा इतिहासही तितकाच रंजक आहे. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ चित्रपटातील ‘वतन की राह में वतन के नौजवां शहीद हो...’ या गाण्याला हिंदी सिनेमातील सुरुवातीच्या प्रभावी देशभक्तीपर गीतांपैकी एक मानले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या एका वर्षाने हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिलीप कुमार यांच्या प्रमुख भूमिकेने सजलेल्या ‘शहीद’मध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या तरुणांची कथा मांडण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या काळातील प्रेक्षकांच्या मनावर मोठा प्रभाव पाडला.

या चित्रपटातील ‘वतन की राह में वतन के नौजवां शहीद हो...’ हे गाणे विशेष लोकप्रिय झाले. गाण्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या तरुणांचे शौर्य, त्याग आणि मातृभूमीवरील प्रेम प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतातील देशभक्तीची भावना व्यक्त करणाऱ्या महत्त्वाच्या गाण्यांमध्ये या गीताचा उल्लेख केला जातो.या गीताला मोहम्मद रफी आणि खान मस्ताना यांनी आवाज दिला होता. त्यांच्या दमदार गायकीला संगीतकार गुलाम हैदर यांच्या संगीताची साथ लाभली. तर गीताचे शब्द राजा मेहंदी अली खान यांनी लिहिले होते. या दिग्गज कलाकारांच्या योगदानामुळे हे गाणे काळाच्या ओघातही स्मरणात राहिले.

विशेष म्हणजे, या गाण्याचे चित्रीकरण दिलीप कुमार यांच्यावर करण्यात आले होते. त्यांच्या अभिनयातील भावनिक ताकद आणि रफींच्या आवाजातील जोश यामुळे गाण्याचा प्रभाव आणखी वाढला. आज ७८ वर्षांनंतरही हे गीत भारतीय चित्रपटसृष्टीच्या देशभक्तीपर संगीताच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जाते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जुन्या काळातील ही गाणी पुन्हा ऐकताना केवळ संगीताचा आनंद मिळत नाही, तर देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांची आठवणही जागी होते. १९४८ मधील ‘शहीद’पासून सुरू झालेली ही देशभक्तीपर गीतांची परंपरा आजही बॉलिवूडमध्ये विविध रूपांत पुढे सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >