Monday, August 10, 2026

Nitesh Rane : मनोज जरांगेंचा मुद्दा बरोबर, पण भाषा चुकीची!

Nitesh Rane : मनोज जरांगेंचा मुद्दा बरोबर, पण भाषा चुकीची!

- मंत्री नितेश राणे; मराठा समाजाच्या हिताशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांचा 'कार्यक्रम' करू

मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मराठा समाजाबाबतची भूमिका आणि त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे पूर्णपणे बरोबर आहेत, मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांविषयी वापरलेली भाषा चुकीची आहे, असे मत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी व्यक्त केले. मराठा समाजातील तरुण-तरुणींवर कोणत्याही अधिकाऱ्याच्या चुकीमुळे अन्याय होत असेल, तर मनोज जरांगे यांच्याआधी स्वतः नितेश राणे त्या अधिकाऱ्याचा 'कार्यक्रम' करेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, शेवटी मीही मराठा समाजाचा एक भाग आहे. माझ्या समाजातील तरुण-तरुणींवर कुठेही अन्याय होत असेल, तर मीही पेटून उठणार. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या प्रक्रियेत काही सडके आंबे किंवा अधिकारी खोडा घालत असतील, तर त्यांना अजिबात सोडले जाणार नाही. जरांगे जे विषय मांडत आहेत ते निश्चितच समाजहिताचे आहेत आणि त्या मुद्द्यांवर मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहण्यास तयार आहे.

मात्र जरांगे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) किंवा पक्षाच्या अन्य प्रमुख नेत्यांवर ज्या भाषेत टीका केली आहे, ती अत्यंत चुकीची आहे. अशा वक्तव्यांमुळे मूळ विषयावरून लक्ष भरकटते. मराठा समाजाच्या मुला-मुलींचे भले करायचे असेल, तर राज्य सरकारशी योग्य संवाद ठेवूनच मार्ग काढणे सोपे आणि व्यावहारिक ठरेल. त्यामुळे जरांगे यांनी आपल्या भाषेत सुधारणा करावी आणि समाजाच्या हक्कासाठी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी (Nitesh Rane) केले.

अंबादास दानवे यांच्या भूमिकेचे स्वागत :

उबाठा गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीवर बोलताना राणे म्हणाले की, दानवे हे मूळचे स्वयंसेवकच होते आणि संघाच्या शाखेत जात होते. ते कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा जेव्हा हिंदुत्वाविरोधी भूमिका घेतली, तेव्हा दानवे यांना मनस्वी वेदना झाल्याचे त्यांनी मला (Nitesh Rane) अनेकदा वैयक्तिकरित्या सांगितले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा संघाच्या आणि हिंदुत्वाच्या दिशेने येत असतील, तर त्यांचे मनापासून स्वागत आहे.

राज ठाकरेंना सिंधुदुर्गमध्ये येण्याचे निमंत्रण :

- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची केलेली पाहणी आणि दौऱ्यावर बोलताना मंत्री राणे म्हणाले की, प्रत्येकाला पाहणी करण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. राज साहेबांना जर कुठे खड्डे दिसले असतील, तर त्यांनी शासनाला नक्की मार्गदर्शन करावे, आम्ही चुका सुधारण्यास तयार आहोत. यासोबतच त्यांनी राज ठाकरे यांना सिंधुदुर्ग दौऱ्याचे आमंत्रण दिले. आमच्या सिंधुदुर्गात आल्यास त्यांना एकाही खड्ड्याची तक्रार सापडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटल्याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना भेटून कामांची निवेदने देणे यात काहीही वावगे नाही. उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरेही अनेकदा विधानसभेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून कामे घेऊन येतात, तसाच हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. (Nitesh Rane)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा