Thursday, August 6, 2026

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jalgaon Accident News)

भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

बुधवारी दुपारच्या सुमारास जळगाव शहरातील जुन्या महामार्गावर दुर्दैवी घटना घडली. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी घडलेल्या अपघातात भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा या भीषण अपघातात जखमी झाला. टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मंगला अर्जुन माळी (५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर या भीषण अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (२९) किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग करून त्याला पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने शहरात शोककळा पसरली होती. त्यानंतर सायंकाळी आणखी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने दुःखात भर पडली. (Jalgaon Accident News)

तरुणाचा तलावात बुडाल्याने मृत्यू

जळगाव शहरातील हनुमान नगर परिसरात राहणारा ऋषिकेश उत्तम कचरे (२८) हा बुधवारी सायंकाळी काही मित्रांसह शिरसोलीजवळील शामाफायर कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या चंभारदरी पाझर तलाव परिसरात पार्टीसाठी गेला होता. परिसरात फिरत असताना ऋषिकेशने आपल्याला पोहता येत असल्याचे सांगत तलावात उतरायचा निर्णय घेतला. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने काही अंतर गेल्यानंतर तो अचानक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. काहींनी तलावात उड्या मारल्या, तर काहींनी मदतीसाठी परिसरातील नागरिकांना बोलावले. मात्र, पाण्याची खोली जास्त असल्याने त्याला बाहेर काढण्यात अपयश आले. (Jalgaon Accident News)

घरी परतत असताना काळाचा घाला

तर तिसरी घटना नशिराबाद शहरालगत टोलनाक्यासमोर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात सोनू रामा बागले (२९, रा. भवानी नगर, नशिराबाद) याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू बागले साकेगाव येथे दिवसभर बांधकाम मजुरी करून पिकअप वाहनाने घरी परतत होता. टोलनाक्याजवळ पोहोचताच मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॉलाने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की सोनू पिकअपमधून रस्त्यावर फेकला गेला. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोनू बांधकामावर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा