काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह ३८४ प्रवासी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पुरात आतापर्यंत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, रसुवा जिल्ह्यातील तिबेट सीमेजवळील भागाला मोठा फटका बसला आहे. परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानेही खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक यादीनुसार, बेपत्ता असलेल्या ३८४ प्रवाशांमध्ये २९१ परदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. परदेशी नागरिकांमध्ये १०५ भारतीय आहेत. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही या यादीत समावेश आहे. मात्र, ही यादी प्राथमिक असून तिची पडताळणी सुरू असल्याचे पर्यटन मंडळाने स्पष्ट केले आहे. (Nepal Flood )

भारतातही सतर्कतेचा इशारा
नेपाळमध्ये नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यानंतर भारत सरकारने बिहार आणि उत्तर प्रदेशला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नेपाळच्या फुर्के खोला परिसरातील त्रिशूली नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. पुराचे पाणी पुढे गंडक नदीमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता असून, भारतात येईपर्यंत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गंडक नदीलगतच्या भागात आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, गंडक बॅरेजचे दरवाजे संभाव्य पूरपाणी सुरक्षितपणे वाहून जाईल अशा पद्धतीने चालवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. (Nepal Flood )
काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे निसर्गाचा मोठा कहर पाहायला मिळाला. अचानक ...
अमित शाहांचा बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन अमित शाह यांच्याकडून देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकांनाही सज्ज करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही नेपाळमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून, महाराजगंज आणि कुशीनगरसह संभाव्य प्रभावित जिल्ह्यांमधील प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. गंडक आणि नारायणी नद्यांच्या पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Nepal Flood )
पुराचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामान विभागानुसार, रसुवा परिसरातील पावसामुळे हा पूर आलेला नसल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. तिबेटच्या बाजूला ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड (GLOF), भूस्खलन किंवा नदीचा प्रवाह तात्पुरता अडवल्यानंतर अचानक पाणी सोडले जाणे यापैकी कोणते कारण आहे, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, भारतीय पर्यटकांच्या बेपत्ता होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने बेपत्ता प्रवाशांची प्राथमिक यादी पडताळणीसाठी पाठवली असून, ट्रॅव्हल एजन्सी, स्थानिक प्रशासन, मार्गदर्शक आणि सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून माहितीची खातरजमा केली जात आहे. पडताळणी पूर्ण होईपर्यंत कुटुंबीयांनी कोणताही निष्कर्ष काढू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Nepal Flood )




