- मंत्री नितेश राणे यांचे परखड भाष्य; देशविरोधी शक्तींकडून 'जेन झी' तरुणांचा वापर
मुंबई : ‘नीट’ पेपरफुटीच्या आधारे देशात उभारले गेलेले आंदोलन हे निमित्त असून, परदेशी देणगी नियंत्रण कायदा (एफसीआरए) दुरुस्ती विधेयक रोखणे हा त्यामागील छुपा हेतू आहे, असा दावा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. ‘एफसीआरए’च्या माध्यमातून विविध अशासकीय संस्थांना (एनजीओ) मिळणारे आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरले जाणारे परदेशी फंडिंग बंद होणार असल्यानेच या जिहादी व फुटीरतावादी शक्तींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळेच 'नीट'च्या नावाने तरुण पिढीची दिशाभूल करून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. (Nitesh Rane)
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान; जाणीवपूर्वक भाजपची बदनामी करू नये मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) अध्यक्ष अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी ...
एका मराठी दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थी आंदोलनाचे झालेले राजकीयकरण, सोशल मीडियावरील प्रक्षोभक मोहीम आणि देशविरोधी ताकदींच्या सहभागावर जोरदार हल्लाबोल केला. राणे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार देशातील तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अत्यंत गंभीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच तरुणांना देशाचे भवितव्य मानले आहे. ‘नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न पूर्णपणे रास्त होते आणि त्याबाबत केंद्र सरकारने कठोर कायद्याचे विधेयक आणून ठोस पावलेही उचलली आहेत. परंतु, प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा ताबा देशविरोधी ताकदींनी घेतला, असा आरोप राणे यांनी केला.
"नीटच्या बहाण्याने देशात 'गजवा-ए-हिंद'ची मानसिकता रुजवण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनाच्या व्यासपीठांवरून आमच्या हिंदू देवी-देवतांवर, विशेषतः सीता मातेवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली. 'सर तन से जुदा'च्या घोषणा दिल्या गेल्या आणि 'भारत माता की जय' म्हणणाऱ्यांना रोखले गेले. उमर खालिदचे समर्थक, औरंगजेबाचे पोस्टर्स आणि 'सर तन से जुदा'च्या विकृत मानसिकतेचा नीट परीक्षेच्या प्रश्नांशी काय संबंध?" असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या सायबर सेलने नुकतीच माहिती दिली आहे की, या आंदोलनाला खतपाणी घालणारी ५०० ते ६०० सोशल मीडिया खाती पाकिस्तानातून चालवली जात होती. यावरूनच हे आंदोलन भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या अजेंड्याचा भाग म्हणून फितवले गेले होते हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. (NEET Exam)
२०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे मुंबई(Mumbai): नागपूर येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन व व्यावसायिक ...
ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली
मुंबईत पार पडलेल्या आंदोलनावरून त्यांनी ठाकरे गटावर आणि त्यात सहभागी झालेल्या कलाकारांवर जोरदार टीका केली. "ज्या व्यासपीठावर सीता मातेचा अवमान केला जातो, जिथे राष्ट्रद्रोही घोषणा दिल्या जातात, अशा लोकांना ठाकरे कुटुंबाने आपल्या व्यासपीठावर स्थान दिले हे अत्यंत खेदजनक आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे विचार जपणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना ही तिलांजली आहे. बाळासाहेब हयात असते तर अशा लोकांची गय केली नसती," असे सांगत त्यांनी कुणाल कामरासारख्या कलाकारांवर टीका केली. "जर तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणवता, तर केवळ हिंदू देवी-देवतांचाच अपमान का करता? इतर धर्मांतील श्रद्धास्थानांवर बोलण्याची हिम्मत दाखवा," असे आव्हान त्यांनी दिले. (Uddhav Thackeray)
राहुल गांधींची स्क्रिप्ट पाकिस्तानातून
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्याचा समाचार घेताना राणे म्हणाले, "राहुल गांधींची स्क्रिप्ट ही पाकिस्तानातून आणि इस्रायल-विरोधी किंवा तालिबानी विचारसरणीच्या आकांकडून येते. त्यांना देशभक्त हे 'अंधभक्त'च वाटणार, कारण राष्ट्रभक्ती काय असते हे त्यांच्या पक्षाला आणि कुटुंबाला कधीच समजले नाही", अशी टीका त्यांनी केली. त्याच वेळी, रोहित पवार यांनी राम मंदिराच्या चौकशीवर उठवलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राणे यांनी स्पष्ट केले की, "आमचा सनातन हिंदू धर्म चुकीला चूक मानण्याची आणि ती सुधारण्याची शिकवण देतो. राम मंदिराबाबत महंतांनी चौकशीची तयारी दाखवली, ती सनातन धर्माची विशालता आहे. परंतु, पश्चिम बंगालमध्ये बांधल्या जाणाऱ्या बाबरी मशिदीच्या देणग्यांमधील घोटाळ्यांवर किंवा हज यात्रेतील गैरव्यवहारांवर रोहित पवार कधी बोलण्याची हिम्मत दाखवतील का? रोहित पवारांनी भगवद्गीता नीट वाचलेली दिसत नाही," असा टोला त्यांनी लगावला. (Rahul Gandhi)
भारत ही सुसंस्कृत आणि कुटुंबकेंद्री समाजव्यवस्था
सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराबाबत बोलताना राणे म्हणाले की, भारत ही सुसंस्कृत आणि कुटुंबकेंद्री समाजव्यवस्था आहे. व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याचा अर्थ स्वतःच्याच देशाचा किंवा घटनात्मक पदांचा अपमान करणे असा होत नाही. जंतर-मंतरवरील आंदोलन किंवा त्यानंतर सोशल मीडियावर काही रील स्टार्स ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, ती संस्कृतीला कलंक लावणारी आहे. देशाच्या सुरक्षेचा आणि अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा 'राष्ट्र प्रथम' हाच विचार प्रत्येकाने ठेवला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.
'सागरमाला २.०' अंतर्गत महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळणार
मुलाखतीदरम्यान आपल्या बंदरे व मत्स्यव्यवसाय खात्याच्या कामाचा आढावा देताना मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी झालेल्या बैठकीची माहिती दिली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 'सागरमाला २.०' अंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये बंदरांना महामार्ग व रेल्वेशी जोडून मालवाहतूक अधिक जलद करण्यासाठी बहुविध लॉजिस्टिक संपर्क व्यवस्था उभी करणे, मच्छिमारांना आधुनिक सोयी-सुविधा व तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन पारंपरिक मत्स्य बंदरांचे आधुनिकीकरण करणे, किनारपट्टीवर वॉटर ट्रान्सपोर्ट आणि सागरी पर्यटनाला चालना देणे, तसेच किनारपट्टीच्या भागात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन स्थानिकांना हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेनुसार हे सर्व प्रकल्प आखले गेले असून, केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळेल आणि सागरी क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर पोहोचेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.






