Saturday, July 25, 2026

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रात्रीचे जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, मळमळ आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या मेळघाट दौऱ्यावर असतानाच ही घटना घडल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. (Amravati News)

जेवणानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली :

टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (२५ जुलै) रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही वेळातच ३० ते ४० विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच आश्रमशाळा प्रशासनाने तातडीने त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे. (Amravati News)

'सेंट्रल किचन'च्या जेवणावर संशय; तपासाला वेग :

या आश्रमशाळेला 'सेंट्रल किचन'मधून जेवणाचा पुरवठा केला जातो. याच स्वयंपाकगृहातून परिसरातील आठ ते नऊ शाळांमध्ये अन्न पाठवण्यात आले होते. मात्र, विषबाधेची घटना केवळ टीटंबा येथील आश्रमशाळेतच घडल्याने नेमके कारण काय, याचा शोध प्रशासन घेत आहे. एकादशीनिमित्त दिलेले उपवासाचे पदार्थ, दूषित पाणी किंवा अन्नातील बिघाड यापैकी कोणत्या कारणामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Amravati News)

प्रशासनाचे स्पष्टीकरण; परिस्थिती नियंत्रणात :

प्रकल्प बालविकास अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून कोणत्याही विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पालकांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता रुग्णालयात अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Amravati News)

अन्न सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह :

या घटनेनंतर आश्रमशाळांमधील अन्नाचा दर्जा, 'सेंट्रल किचन'ची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना स्थानिक पालकांमध्ये व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Amravati News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >