Saturday, July 25, 2026

Ahilyanagar : पहाटेच्या अंधारात निघाला अन् होत्याचं नव्हतं झालं... बालाजी गाडीवर गेला तो परत जिवंत आलाच नाही ; काय घडलं ?

Ahilyanagar : पहाटेच्या अंधारात निघाला अन् होत्याचं नव्हतं झालं... बालाजी गाडीवर गेला तो परत जिवंत आलाच नाही ; काय घडलं ?

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जामखेड-माहीजळगाव महामार्गावरील भातोडी येथील बांधकाम सुरू असलेल्या पुलावर कोणतीही प्रभावी खबरदारी नसल्याचा आरोप होत असताना, अंधारात पुलाच्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं मोटारसायकलस्वार तरुण थेट पुलाखाली कोसळला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. बालाजी विलास पागिरे (रा. मतेवाडी, हल्ली मुक्काम पोकळे वस्ती, जामखेड) असे मृताचे नाव आहे. (Ahilyanagar Accident News)

पहाटेच्या अंधारात निघाला अन् होत्याचं नव्हतं झालं

बालाजी पागिरे हा पहाटे हरिनारायण आष्टी येथून जामखेडकडे मोटारसायकलवरून येत होता. भातोडी गावाजवळ नदीवरील पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं रस्त्यात मोठा खड्डा होता. मात्र, पहाटेच्या अंधारात या खड्ड्याचा अंदाज त्याला आला नाही. आणि इथे नियतीने डाव साधला. बालाजीची मोटारसायकल थेट पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यानं बालाजीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Ahilyanagar Accident News)

सकाळी उजेड पडल्यानंतर ग्रामस्थांची ये-जा सुरू झाली. यावेळेस पुलाखाली मोटारसायकलसह तरुण पडल्याचं ग्रामस्थांना दिसून आलं. ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी मृताच्या मोबाईलवर जामखेड येथील अवधूत हॉटेलच्या मालकाचा फोन आला. ग्रामस्थांनी फोन उचलून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच हॉटेलमालक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. तरुणाला जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर बालाजीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. (Ahilyanagar Accident News)

कुटुंबीयांचा आधार हिरावला

बालाजी पागिरे हा जामखेडमधील अवधूत हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावामुळे तो सर्वांच्या परिचयाचा होता. त्याच्या आकस्मिक निधनानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जामखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान आष्टी पोलीस (Ashti Police) पुढील तपास करीत आहेत.

या दुर्घटनेनंतर बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ पुरेसे इशारा फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि रात्रीसाठी प्रकाशव्यवस्था होती का ? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अपूर्ण पुलांवर सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची भावना व्यक्त होत असून, संबंधित ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >