Friday, July 24, 2026

Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत

Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातीळ अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात धुवांधार पावसाने नदी-नाले ओसंडून वाहत असून पुराचे संकट झाले आहे. पालघर ते गुजरात हा महामार्ग मुसळधार पावसामुळे बंद आहे. नाशिकमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने पूर आला आहे. परंतु दुसऱ्या बाजूस राज्यातील तब्बल ८ जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप हजेरी लावली नाही आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील काही भाग पाण्याखाली आहे तर काही भागातील शेतकरी थेंबाथेंबासाठी प्रतीक्षेत आहेत.(Mumabi)

पालघर आणि नाशिकला पावसानं झोडपलं पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांत पावसाचा प्रचंड हाहा:कार पाहायला मिळाला. पालघर आणि गुजरातच्या वलसाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली आहे. नदीकिनारी असलेलं प्रसिद्ध मारुती मंदिर पाण्याखाली गेलं आहे. सायखेडा पूल पाण्याखाली गेला असून चांदोरी गावातील बाजारपेठ आणि घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. हवामान विभागाने आजही या भागात 'रेड अलर्ट' जारी केला आहे.(Maharashtra)

८ जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असताना, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस रिमझीम बरसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता जुलै महिना संपायला जेमतेम आठवडा उरला आहे. अर्धा मान्सून संपला आहे तरी राज्याच्या अनेक भागात अद्याप दमदार पाऊस पडलेला नाही. पाऊस न पडल्याने पिके करपू लागली आहेत. आजही राज्यातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तिथले शेतकरी हताशपणे आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा